Operation Sindoor News: जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एका परदेशी पर्यटकासह २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळ ऑपेरेशन सिंदूरच्या माध्यमातून उद्ध्वस्त केले होते.
यानंतर पाकिस्तानने भारताच्या लष्करी कारवाईला प्रत्युत्तर देण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. यासाठी पाकिस्तानने चीन आणि तुर्कीये यांच्या शस्त्रांचा आधार घेतला होता. मात्र, चीन आणि तुर्कीयेची ही सर्व शस्त्रे भारताविरोधात निष्प्रभ ठरली.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ने ऑपरेशन सिंदूरबाबत नुकताच मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने उत्कृष्ट कामगिरी केली. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय लष्करी कारवायांमध्ये तांत्रिक स्वावलंबनाच्या दिशेने एक मैलाचा दगड ठरले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ही कारवाई अचूक आणि धोरणात्मकपणे केलेली कारवाई होती.
चीनची हवाई संरक्षण प्रणाली निष्प्रभ
दरम्यान प्रेस इन्फॉर्मेश ब्युरोने नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने दहशवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले तेव्हा पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तेव्हा, भारतीय हवाई दलाने चीनकडून पाकिस्तानला मिळालेली हवाई संरक्षण प्रणाली अचूकपणे नष्ट केली. अवघ्या २३ मिनिटांत हे अभियान पूर्ण करून भारताने तांत्रिकदृष्ट्याही आघाडी घेतली.
तुर्कीयेचीही पाकिस्तानला मदत
या मोहिमेदरम्यान, भारताने चीनचे पीएल-१५ क्षेपणास्त्र, यिहा किंवा यिहाव नावाचे तुर्की ड्रोन आणि व पल्ल्याचे रॉकेट, क्वाडकॉप्टर आणि व्यावसायिक ड्रोन नष्ट केले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताला या शस्त्रांचे अवशेषही सापडले आहेत. तपासात असे समोर आले की, पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी परदेशातून मिळवलेल्या शस्त्रांचा वापर केला. परंतु, भारताने याला चोख प्रत्युत्तर देत आपली स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध नेटवर्क उत्कृष्ट असल्याचे सिद्ध केले.
इस्रोचे योगदान
पीआयबीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) देखील योगदान दिले होते. ११ मे रोजी एका कार्यक्रमात बोलताना इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन म्हणाले होते की, “देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी किमान १० उपग्रह अहोरात्र काम करत आहेत. या उपग्रहाने सात हजार किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीचे आणि संपूर्ण उत्तरेकडील भागाचे सतत निरीक्षण केले.”
ऑपरेशन सिंदूरमध्ये पेचोरा, ओएसए-एके आणि ‘आकाश’चा वापर
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पेचोरा, ओएसए-एके, एलएलएडी तोफा आणि आकाश क्षेपणास्त्र यासारख्या हवाई संरक्षण प्रणालींचा वापर केला. आकाश ही एक कमी पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे जी हवाई हल्ल्यांपासून संवेदनशील भागांचे रक्षण करते. आकाश शस्त्र प्रणाली ग्रुप मोड किंवा ऑटो मोडमध्ये एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करू शकते.