Operation Sindoor Not Over Says PM Modi: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हवाई हल्ले केले होते. यामध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांची तब्बल नऊ तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तानने सीमेलगतच्या भारतीय शहरांवर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले होते. जे भारतीय लष्कराने परतावून लावले होते. इतकेच नव्हे तर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हवाई तळांचेही मोठे नुकसान केले होते. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा देत, ऑपरेशन सिंदूर अद्याप संपले नसल्याचे म्हटले आहे.
दहशतवाद आणि नरसंहार ही पाकिस्तानी सैन्याची कौशल्ये
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “पाकिस्तान जेव्हापासून अस्तित्वात आले आहे, तेव्हापासून त्यांनी फक्त दहशतवादालाच पोसले आहे. दहशतवाद आणि नरसंहार ही पाकिस्तानी सैन्याची सर्वात मोठी कौशल्ये आहेत. जेव्हा थेट युद्ध केले जाते तेव्हा त्यांचा पराभव निश्चित असतो. यामुळेच पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांची मदत घेते. पाकिस्तानने हे समजून घेतले पाहिजे की, तीन वेळा घरात घुसून मारले आहे. बंगाल टायगरच्या भूमीतून १४० कोटी भारतीयांची घोषणा आहे की, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही.”
पाकिस्तानने कल्पनाही केली नव्हती
या सभेत पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूरतेनंतर पश्चिम बंगालमध्ये खूप संताप होता. तुमचा राग आणि संताप मला चांगल्या प्रकारे समजला होता. दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींचे सिंदूर पुसण्याचे धाडस केल्याने, आपल्या सैन्याने त्यांना सिंदूरची ताकद दाखवून दिली. आम्ही दहशतवादाचे असे अड्डे नष्ट केले, ज्याची पाकिस्तानने कल्पनाही केली नव्हती.”
पाकिस्तानकडे काहीही सकारात्मक नाही
“दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानकडे जगाला देण्यासाठी काहीही सकारात्मक नाही. जेव्हापासून ते अस्तित्वात आले तेव्हापासून त्यांनी फक्त दहशतवादाला पोसले आहे. १९४७ मध्ये फाळणी झाल्यापासून त्यांनी भारतावर दहशतवादी हल्ले केले आहेत. काही वर्षांनी, आजच्या बांगलादेश या शेजारील देशात त्यांनी दहशत माजवली होती. पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशात बलात्कार आणि खून कसे केले हे कोणीही विसरू शकत नाही”, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला फटकारले.