Operation Sindoor Indian Airstrike: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानस्थित दहशवाद्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे चोख प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर हे भारतीय लष्कराने ही कारवाई केली आहे. भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर देशभरातून समाधन व्यक्त केले जात आहे. दरम्यान भारताने दिलेल्या या प्रत्युत्तराचे सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळातील नेत्यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे.

या हवाई हल्ल्यानंतर देशाचे संरक्षण मंत्री यांनी सर्वप्रथम एक्सवर एका ओळीची पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी “भारत माता की जय”, असे म्हटले आहे. याचबरोबर काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही, “आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. जय हिंद!”, अशी पोस्ट केली आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. अमित शहा यांनी एक्स वर पोस्ट करत म्हटले आहे की, “ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे. भारत आणि भारतीय नागरिकांवरील कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध आहे.”

दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरमध्येही भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ पार पाडल्यानंतर स्थानिकांनी ‘भारतीय सेना झिंदाबाद’ आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणा दिल्या आहेत. तर राजस्थानमध्ये नागरिकांनी फटाके फोडत लष्कराने पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. हे हवाई हल्ले २०१९ मध्ये बालाकोटमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर आणि २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताने केलेला सर्वात मोठा हवाई हल्ला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर बॉम्ब टाकले आहेत, ज्यामुळे संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय हवाई दल आणि लष्कराचे ऑपरेशन होते. एकीकडे, आयएएफच्या लढाऊ विमानांनी हवाई हल्ले केले, तर दुसरीकडे, लष्कराने क्षेपणास्त्रांचा वापर देखील केला. भारतीय सैन्याच्या हल्ल्यांची ताकद इतकी प्रचंड होती की पाकिस्तानी हवाई दलाला भारतीय हवाई दलाने क्षेपणास्त्रे डागल्याचे लक्षातही आले नाही.