Pondicherry University annual cultural fest: पुद्दुचेरी विद्यापीठातील वार्षिक सांस्कृतिक सोहळ्यातल्या नाटकामुळे वाद निर्माण झाला आहे. एझिनी या सांस्कृतिक सोहळ्यात सोमानयम नावाचं नाटक सादर करण्यात आलं. या नाटकात सीता रावणाला गोमांस देते आणि त्याच्यासह नाच करते असं दाखवण्यात आलं. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली आहे. तसंच विद्यापीठातील हिंदू विद्यार्थी संघटनांनी या नाटकावर आक्षेप घेतला आहे. अभाविपने या प्रकरणी पोलीस कारवाईचीही मागणी केली आहे.
नेमका वाद काय आहे?
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमायनम या नाटकातल्या प्रसंगांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. या नाटकांत काल्पनिक व्यक्तिरेखांच्या माध्यमांतून सीता आणि हनुमान यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या नाटकावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. २९ मार्च या दिवशी आवाज उठवण्यात आला होता. नाटकांत रामायणाची खिल्ली उडवणारे प्रसंग आहेत असंही अभाविपने म्हटलं आहे.
नाटकात कुठले प्रसंग आक्षेपार्ह असल्याचा आरोप?
प्रभू रामाचा निरोप घेऊन हनुमान सीतेला शोधण्यासाठी जातो त्यावेळी प्रभू राम त्याला फोन करतात. हनुमान फोन उचलतो. मात्र रेंज सिग्नल नसतो. त्यामुळे आवाज ऐकू येण्यात अडथळा येतो. त्यानंतर हनुमान आपली शेपूट उंचावतो तेव्हा रेंज येते असं दाखवण्यात आलं आहे.
सीता रावणाला गोमांस खायला देते आहे, त्यानंतर रावण आल्यानंतर त्याच्यासह तुमको पाया है तो जैसे खोया हूँ हे गाणं सुरु होतं. या गाण्यावर सीता आणि रावण नाच करु लागतात.
प्रभू राम रावणाचा वध करतात. तेव्हा रावणाच्या मृतदेहाजवळ सीता बसून शोक करु लागते. तिला प्रभू राम ओढत नेतात, तिची येण्याची इच्छा नसते तरीही तिला ओढत नेतात.
नाटकांत दाखवण्यात आलेल्या या प्रसंगांवरुन प्रचंड गदारोळ आणि वाद निर्माण झाला आहे. अभाविपने या तीन प्रसंगांना आणि नाटकात केलेल्या हिंदू देवदेवताच्या अपमानावर आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. नाटकाच्या माध्यमातून त्यांच्याकडून हिंदू धर्मातील रुढी-परंपरांच्या पावित्र्याविषयी शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विद्यापीठातील काहीजणांकडून धार्मिक भावना आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या गोष्टींचे विडंबन केले जाते, असे ‘अभविप’च्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
गीता नावाचे हे पात्र रावणासोबत नाचताना दाखवण्यात आले आहे. सीतेच्या अपहरणाच्या प्रसंगापूर्वी सीता रावणाला गोमांस खाण्याविषयी विचारते, असे दाखवण्यात आले आहे. तसेच सीता रावणाला म्हणते की, मी विवाहित आहे, पण आपण मित्र होऊ शकतो. हा प्रसंग म्हणजे सीतेच्या पावित्र्याविषयी शंका उपस्थित करणार आहे. हे सर्व हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेला तडा देणारे आहे, असे ‘अभिवप’च्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.