शाहरुख खान व दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटाचा वाद चांगलाच पेटला आहे. चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यावरून हा वाद सुरू आहे. सोशल मीडियावरही याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. तर काहींनी या चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवला आहे. याशिवाय काही राजकीय मंडळींनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून, विश्व हिंदू परिषदेने शाहरुख खानने माफी मागावी अशी मागणी केली आहे. भाजपाने दिपिका पदुकोणवर टीका केली आहे. या घडामोडी सुरू असताना आता तृणमूल काँग्रेसने या वादाला आणखी हवा देण्याचे काम केल्याचे दिसत आहे.

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रिजू दत्ता यांनी, १९९८ मधील एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मिस इंडिया ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये स्मृती इराणी भगव्या रंगाचे छोटे कपडे घालून रॅम्प वॉक करताना दिसत आहेत.

यावरून आता भाजपा आणि टीएमसीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भाजपा खासदार लॉकेट चॅटर्जींनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, “टीएमसीच्या राष्ट्रीय प्रवक्ता पदावर अशा महिलाविरोधी पुरुषाची नियुक्ती केल्याबद्दल ममता बॅनर्जींना लाज वाटली पाहिजे. त्यांना स्त्रियांबद्दल आदर नाही. त्यांना यशस्वी महिला आणि त्यांच्या प्रगतीचा हेवा वाटतो. महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीला त्यांच्यासारखे पुरुष जबाबदार आहेत.“

रिजू दत्ता काय म्हणाले? –

“भगवा रंग भाजपाची खासगी संपत्ती आहे का?, त्यांना यावर कोणी अधिकार दिला आहे? दिपीका पदुकोण सारख्या महिलेवर जर तिने भगव्या रंगात तिच्या आवडीचे कपडे घातले म्हणून टीका केली जात असेल, तर मग त्यांनी हेही पाहीले पाहिजे की त्यांच्या केंद्रीय मंत्रीने १९९८ मध्ये भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती.” असं रिजू दत्ता म्हणाले आहेत.

याचबरोबर “स्मृती इराणी काय परिधान करतात याबद्दल तृणमूल काँग्रेसला कोणतीही अडचण नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण आम्ही त्यांच्या ठराविक लोकांवरील टीकेचा विरोध करतो. मी त्यांना नुकताच आरसा दाखवला आहे.” असंही रिजू दत्ता म्हणाले आहेत.

याशिवाय ‘आज तक’च्या वृत्तानुसार ‘बेशरम रंग’ गाण्यासाठी भगव्या रंगाचा वापर करून या चित्रपटाने हिंदू धर्म आणि संपूर्ण भारत देशाचा अपमान केला असल्याचं विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव सुरेंद्र जैन यांचं म्हणणं आहे. तसेच विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोदी बंसल यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, “भगव्या रंगाला ‘बेशरम’ म्हणणं मुर्खपणाचं व आक्षेपार्ह कृत्य आहे. हिंदू विरोधी मानसिकतेच्या सगळ्या सीमा यांनी ओलांडल्या आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुखने कोलकाता चित्रपट महोत्सवामध्ये हजेरी लावत भाषण केलं. त्यामुळे ‘पठाण’चा वाद आणखीनच चिघळला असल्याचं पाहायला मिळत आहे.