भाजापचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी मध्य प्रदेशमधील इंदुर येथे माध्यमांशी बोलताना, बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार व तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला.

“पश्चिम बंगालमध्ये एक-एक व्यक्तीवर २० ते ५० केसेस लावल्या आहेत. जसं अर्जुन सिंह हे आमचे खासदार आहेत, १२० केसेस त्यांच्यावर आहेत. हत्या, दरोडा, भ्रष्टाचार आदींसह एवढ्या खोट्या केस दाखल करण्यात आलेल्या आहेत. माझ्यावर किमीत कमी २० केस आहेत. आमच्या प्रचारकांना देखील अडकवलं गेलं आहे. अशाप्रकारे जेव्हा सरकार विरोधकांना पूर्णपणे नष्ट करायला लागते, तर त्या ठिकाणी व्यक्ती कसा जगू शकेल. त्यामुळे जे पण कोणी तिथे जात आहेत… मला तर एक घटना आठवते. या देशात इस्लाम देखील तलावरीच्या बळावर आला आणि बंगालमध्ये जे तृणमूलमध्ये लोक जात आहेत, ते देखील तलावारीच्या बळावरच जात आहेत. मला वाटतं की दोन्ही घटना एक सारख्या आहेत.” असं कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमधील भाजपाचे नेते राजीब बॅनर्जी यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत येथील सभेत बॅनर्जी स्वगृही परतले.

ममता बॅनर्जी सरकारमध्ये राजीब हे मंत्री होते. ममतांनी सूचना करूनही त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे गेल्याच आठवडय़ात भाजपाने राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य म्हणूनही त्यांची निवड केली होती. भाजपाची विचारसरणी तसेच द्वेषाचे राजकारण मला मान्य नाही. व्यक्तिगत आरोप करणे चुकीचे आहे, हे पक्षनेतृत्वाला नेहमीच सांगितले होते, असे राजीब यांनी स्पष्ट केले. तृणमूल काँग्रेस सोडण्यात चूक झाल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी हावडा जिल्ह्य़ातील डोमजूर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. निवडणूक निकाल लागल्यापासून ते भाजपाच्या कार्यक्रमांपासून दूरच होते.