पीटीआय, कनॅनान्स्किस (कॅनडा)
‘भारताचा शेजारी देश दहशतवाद पसरवणारी भूमी झाला आहे. तेथूनच दहशतवादाला खतपाणी मिळते. याकडे कानाडोळा केला, तर तो मानवतेचा विश्वासघात ठरेल,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी-७’ या संघटनेच्या सदस्य देशांना संबोधित केले. सीमापार दहशतवादासाठी चिथावणी देणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध कारवाई करावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
मोदी म्हणाले, ‘पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेला हल्ला हा प्रत्येक भारतीयाचा आत्मा, त्याची ओळख, प्रतिष्ठेवरील हल्ला होता. कुठलाही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल, तर त्याला त्यासाठी जबाबदार धरले पाहिजे आणि त्याची किंमत त्याने मोजली पाहिजे. दहशतवादाचा सामना करताना कुठेही दुटप्पीपणा नसावा. जे देश दहशतवाद पसरवतात आणि त्याचा फटका ज्यांना बसतो, त्याचे समान स्तरावरच मोजमाप करणार का,’ हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकी महत्त्वाची आहे,’ असे ते म्हणाले.
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला निधी दिला होता. पाकिस्तानचे लष्करप्रमुख सध्या अमेरिकेत आहेत. याचे थेट उल्लेख न करता मोदींनी दहशतवादाच्या दुटप्पीपणावर भाष्य केले.
विविध देशांशी द्विस्तरावर चर्चा
परिषदेत मोदी यांनी ‘जी-७’ संघटनेच्या सदस्य देशांबरोबर चर्चा केली. तसेच विविध देशांबरोबर द्विस्तरावरील चर्चेत सहभाग घेतला. व्यापार, गुंतवणूक, दहशतवादाला विरोध आदी विषयांवर चर्चा झाली. दक्षिण कोरिया, फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, इटलीच्या पंतप्रधान मेलोनी, मेक्सिकोच्या अध्यक्ष क्लॉडिया पार्डो, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ दा सिल्व्हा यांची त्यांनी भेट घेतली.
भारत-कॅनडातील उच्चायुक्तालये लवकर सुरू
भारत आणि कॅनडाने दोन्ही देशांमध्ये उच्चायुक्तालये पुन्हा सुरू होणार असून, त्यावर दोन्ही देशांनी एकमत दर्शवले. लवकरात लवकर ही उच्चायुक्तालये सुरू होतील आणि दोन्ही देशांतील महत्त्वाचे असे संबंध पुन्हा प्रस्थापित होतील, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी यांनी सांगितले. गेल्या वर्षी खलिस्तानी फुटिरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणाचा संबंध उच्चायुक्तांशी जोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर भारताने उच्चायुक्तांना मायदेशी बोलावले होते. पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे मिस्राी यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मोदींचे प्रश्न
‘दहशतवादाबाबत आपण गंभीर आहोत का, आपल्या दरवाजापर्यंत संकट येईल, तेव्हाच आपण जागे होणार आहोत का, जे दहशतवाद पोसतात आणि जे या दहशतावादाचे शिकार होतात, अशा दोघांनाही एकाच मापात आपण तोलणार आहोत का? आंतरराष्ट्रीय संस्था त्यांची विश्वासार्हता गमावत आहेत का,’ असे प्रश्न उपस्थित करून मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध निर्णायक कृती करण्याची गरज अधोरेखित केली. मानवतेविरुद्ध असलेल्या दहशतवादाबाबत आपण कृती केली नाही, तर तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.