मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांनी निर्धाराने केलेल्या आंदोलनानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी यावर ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. या ट्वीटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या सत्याग्रहामुळे अहंकाराची मान झुकल्याचं म्हटलं. तसेच शेतकऱ्यांचं अभिनंदनही केलं. सोबतच आपला जानेवारी २०२१ चा एक व्हिडीओ रिट्विट करत ‘माझे शब्द लिहून ठेवा’ म्हणत असलेला एक व्हिडीओ पोस्ट केलाय.

राहुल गांधी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले, “देशाच्या अन्नदात्याने केलेल्या सत्याग्रहामुळे अहंकाराची मान झुकली. अन्यायाविरोधातील या विजयासाठी शेतकऱ्यांचं अभिनंदन. ‘जय हिंद, जय हिंद का किसान’!

दरम्यान, राहुल गांधी यांनी आपला १४ जानेवारी २०२१ चा आपला एक जुना व्हिडीओ रिट्विट केलाय. यात त्यांनी माझे शब्द लिहून ठेवा सांगत मोदी सरकारला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील असं म्हटलं होतं.

हेही वाचा : “प्राण्याचा मृत्यू झाला तरी दिल्लीतील नेते श्रद्धांजली वाहतात, पण…”, राज्यपाल मलिक यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

या व्हिडीओत राहुल गांधी म्हणाले होते, “शेतकरी जे करत आहेत त्यावर मला अभिमान आहे. माझा शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा आहे. मी त्यांच्यासोबत उभा आहे. मी माझ्या पंजाबमधील दौऱ्यात त्यांचा विषय मांडला. आम्ही यापुढेही हे करतच राहू. माझे शब्द लिहून ठेवा, मोदी सरकारला हे कृषी कायदे मागे घ्यावे लागतील. मी काय म्हटलोय ते लक्षात ठेवा.”

हेही वाचा : Farm Laws Live : “आंदोलन तात्काळ मागे घेणार नाही”; पंतप्रधानांच्या घोषणेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांची प्रतिक्रिया

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर अहंकार तुटून माझ्या देशाचा शेतकरी जिंकल्याचं म्हटलंय. तसेच राहुल गांधी यांनी अनेक महिन्यांपूर्वीच मोदी सरकारला झुकावं लागेल असं म्हणत व्हिडीओ ट्विट केलाय.

प्रियंका गांधी यांनी देखील राहुल गांधी यांचं ट्वीट रिट्विट केलंय.

नवाब मलिकांकडूनही मोदी सरकारवर हल्लाबोल

नवाब मलिक यांनी या निर्णयाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “आदरणीय मोदीजींनी लोकांना संबोधित केलं, आपल्या कामांची माहिती दिली आणि घोषणा केली की तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात आले आहेत. आजपासून हे तिन्ही कायदे देशात राहणार नाहीत. सगळ्यात आधी मी सर्व शेतकरी बांधवांचं अभिनंदन करतो, जे गेल्या वर्षभरापासून आपल्या मागण्यांवर ठाम राहिले, कितीही प्रयत्न केले तरी ते मागे हटले नाहीत, त्यांच्यावर लाठीचार्ज केला, आतंकवादी असल्याचा आरोप केला पण तरीही त्यांनी सात वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारला झुकवण्याचं काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की देश एकजूट असेल तर कुठलाही निर्णय बदलता येतो”.

मलिक पुढे म्हणाले, “हीच गोष्ट आम्ही वारंवार सांगत होतो की सरकारला जसा कायदे करण्याचा अधिकार आहे तसंच कायदे मागे घेण्याचाही अधिकार आहे. आम्ही म्हणत होतो की नव्याने सुरुवात करुन चर्चा करायला हवी. पण जसंजश्या निवडणुका जवळ आल्या तसतसं हे स्पष्ट होऊ लागलं की भाजपा आता हरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरण्याच्या भीतीने पंतप्रधानांनी तिन्ही कायद्यांना मागे घेतलं. मी सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो. तुमचा विजय हा देशाचा विजय आहे. या आंदोलनात जे शेतकरी शहीद झाले, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करत आहे. पुन्हा एकदा सांगतो, देशातला शेतकरी महान आहे. त्यांनी मोदीजींना झुकवलं”.