नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील कथित घोळावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघामध्ये ५ महिन्यांमध्ये आठ टक्के मतदार वाढले असून देखील केंद्रीय निवडणूक आयोग मूग गिळून गप्प बसला आहे, असा आरोप करून राहुल गांधींनी राजकीय खळबळ उडवून दिली. त्यावर,‘‘किती दिवस हवेत बाण मारत राहणार’’, असा प्रतिप्रश्न करत फडणवीस यांनी राहुल गांधींवर उपहासात्मक टीका केली. आयोगाने मात्र, राहुल गांधींना चर्चेचे निमंत्रण देत आरोपांचे गांभीर्य अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले.
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाबद्दल प्रश्न
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वत:च्या मतदारसंघात, मतदारयादीत फक्त ५ महिन्यांत आठ टक्के वाढ झाली. काही बूथवर तर २० ते ५० टक्के वाढ झाली. काही ब्लॉक स्तरावरील निवडणूक अधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचा मुद्दा मांडला होता. त्याबद्दल प्रश्न उपस्थित करत, आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करतो, असे राहुल गांधींनी ‘एक्स’वरील संदेशामध्ये नमूद केले.
पाच महिन्यांत २३,४२१ मतदारवाढ
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील कथित घोळासंदर्भात ‘ईगल’ नावाची सत्यशोधन समिती काँग्रेसने स्थापन केली आहे. या समितीचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील गेल्या तीन विधानसभा निवडणुकीतील मतदारांतील वाढ व घट यांची आकडेवारी दिली आहे. या मतदारसंघात २०२४मध्ये पाच महिन्यांत २३ हजार ४२१ मतदार वाढले. त्याउलट पाच वर्षांतील वाढ ६ हजार ९९६ होती.
आयोगाचे चर्चेसाठी निमंत्रण
मुख्यमंत्री फडणवीस टीकेचे धनी होताच, मंगळवारी आयोगाने तातडीने राहुल गांधींच्या आरोपांना प्रतिसाद दिला. निवडणूक नियमाअंतर्गत झाल्याचे स्पष्ट करत आयोगाने राहुल गांधींचे आरोप पुन्हा फेटाळले. तसेच निवडणुकीशी निगडीत वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोगाने राहुल गांधींना निमंत्रण दिले.
‘किती काळ हवेत बाण सोडणार?’
मुंबई : महाराष्ट्रात किमान २५ लोकसभा-विधानसभा मतदारसंघांमध्ये आठ टक्क्यांहून अधिक मतदार वाढूनही काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. किती काळ हवेत बाण सोडणार, असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले. फडणवीस यांनी सांगितले की, पश्चिम नागपूर (७ टक्के), उत्तर नागपूर (७ टक्के), वडगाव-शेरी (१० टक्के) मालाड (प.) (११ टक्के), मुंब्रा (९ टक्के) येथे मतदारसंख्या वाढली असूनही तिथे काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले.
लोकसभेत चर्चेची मागणी
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील मतदारयाद्यांमध्ये गोंधळ झाल्याच्या आरोपांची संसदेत चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. निवडणुकीच्या संदर्भात फेरफार व गोंधळ झाल्याचा आरोप होणे गंभीर आहे, असे मत सुळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यांमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप होत आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी लोकसभेत चर्चा आवश्यक आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे गांधी यांना होत असलेला त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. निवडणूक निकालाबाबत मतप्रदर्शन करण्याआधी किमान काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यांशी तरी चर्चा केली असती, तर काँग्रेसमध्ये संवाद नसल्याचे जाहीर प्रदर्शन होण्याचे टाळता आले असते.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांनी पडताळणी केल्यानंतर हजारो मतदारांनी दिलेले निवासाचे पत्ते बनावट असल्याचे उघड झाले. आणि तरीही निवडणूक आयोग गप्प आहे? की, या प्रकारात सहभागी आहे? हे काही अपवादात्मक-तुरळक घोळ नव्हेत. ही मतचोरी आहे. या सगळ्या प्रकारावर पडदा टाकणे ही घोटाळ्याची अप्रत्यक्ष कबुली आहे. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस