आरसीबीने १८ वर्षांनी आयपीएलचा अंतिम सामना जिंकला. ४ जूनला त्यांची विजयी परेड निघाली. या विजयी परेडच्या आधी चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीत ४७ जण जखमी झाले आहेत, चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी दिली आहे. या घटनेचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आता या प्रकरणी कर्नाटक सरकारवर टीका केली आहे. कर्नाटक सरकारने चेंगराचेंगरी प्रकरणात पोलीस दलातील उच्च अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवलं आहे अशी टीका आता इतिहासकार रामचंद्र गुहांनी केली आहे.
काय म्हटलं आहे रामचंद्र गुहांनी?
“बुधवारी चिन्नास्वामी मैदानाच्या बाहेर जो गदारोळ आणि चेंगराचेंगरी झाली त्या घटनेसाठी कर्नाटक सरकार, क्रिकेट प्रशासन हे देखील बरोबरीने जबाबदार आहेत. मात्र या प्रकरणात फक्त पोलीस दलातील उच्च अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्यात आलं आहे. ११ लोकांचा बळी गेला आहे. या घटनेत प्रसिद्धीलोलुप वृत्ती दिसून आली. त्या वृत्तीतून ही सगळी घटना घडली आहे. ” या आशयाची पोस्ट रामचंद्र गुहा यांनी केली आहे.
मैदानाबाहेर गर्दी नेमकी कशी वाढत गेली?
काही लोक झाडांवर चढून बसले. काहींनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या इमारतीत जाण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे बघता बघता गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली. या ठिकाणी गर्दी झाल्याने या भागात थांबणाऱ्या मेट्रोनेही मेट्रो या भागात थांबणार नाही असं जाहीर केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ जूनच्या दुपारी ३ च्या सुमारास १ किमीच्या परिसरात साधारण ५० हजार लोक जमा झाले होते. अनेकांकडे व्हिक्टरी परेडची तिकिटं होती, बहुतांश गर्दीकडे ही तिकिटं नव्हती. फ्री तिकिटं मिळतील यासाठी ते आले होते. आपल्या आवडत्या क्रिकेटर्सनला आणि खास करुन विराट कोहलीला डोळे भरुन बघावं ही या सगळ्यांचीच इच्छा होती. मात्र प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरुन आता रामचंद्र गुहा यांनी कर्नाटक सरकारवर टीका केली आहे.
४ जूनच्या दिवशी संध्याकाळी पावणेपाचच्या दरम्यान काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरी संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी सुरु झाली. चिन्नास्वामी स्टेडियम तिकिटधारकांसाठी खुलं होतं. अशात गेट क्रमांक १ उघडलं गेलं आणि फ्री येणाऱ्यांना तिथून प्रवेश देण्यास सुरुवात झाली ज्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली. महेश, इनयानाथ या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार प्रत्येकजण त्या गेटच्या दिशेने धावत जाऊ लागले. अलोट गर्दी एकाच दिशेने धावली. सुरुवातीला तीन मुली खाली पडल्या आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली.