पणजी : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो झरदारी हे दहशतवाद उद्योगाचे प्रवर्तक, समर्थक आणि प्रवक्ते आहेत, असा आरोप भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) परिषदेतील बैठकीनंतर केला. 

एससीओ बैठकीत बिलावल भुत्तो, यांनी भाषणात दहशतवादाला ‘‘राजनैतिक लाभाचे शस्त्र बनवले जाऊ नये’’ असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून जयशंकर यांनी भुत्तो यांच्यावर तीव्र टीका केली. जयशंकर म्हणाले की, भुत्तो यांच्या, दहशतवादाचा शस्त्रासारखा वापर करण्याच्या विधानांतून त्यांची मानसिकता नकळतपणे प्रकट झाली.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Arvind Kejriwal
केजरीवालांच्या अटकेचा धक्का कोणाला आणि का?
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?

एससीओ सदस्य देशाचे परराष्ट्र मंत्री म्हणून भुत्तो यांना त्यांच्या पदाप्रमाणे वागणूक दिली गेली. पाकिस्तानचा मुख्य आधार असलेल्या दहशतवाद उद्योगाचा प्रवर्तक, समर्थक आणि प्रवक्ता असा त्यांचा उल्लेख आम्ही केला आणि बैठकीतच त्यांच्या वक्तव्याचा प्रतिवाद करण्यात आला, असे जयशंकर यांनी पत्रकारांना सांगितले. ‘‘दहशतवादपीडित दहशतवादाच्या प्रवक्त्यांशी चर्चा करू शकत नाही,’’ असे खडेबोलही जयशंकर यांनी भुत्तो यांना ‘एससीओ’ परिषदेत सुनावले. ‘‘काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील,’’ असा पुनरूच्चारही जयशंकर यांनी केला. दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानची विश्वासार्हता त्याच्या परकीय गंगाजळीपेक्षाही वेगाने घसरत आहे, असा टोलाही जयशंकर यांनी पाकिस्तानला लगावला.  

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची शिखर परिषद शुक्रवारी येथे सुरू झाली. यावेळी अपेक्षेप्रमाणे दहशतवादाचा मुद्दा उपस्थित झाला. परिषदेच्या सुरुवातीला भाषण करताना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर पाकिस्तानचे नाव न घेता म्हणाले की, दहशतवादी कृत्यांसाठी केला जाणारा अर्थपुरवठा कोणत्याही भेदभावाविना थांबला पाहिजे आणि सीमापार होणाऱ्या दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबला पाहिजे. यावेळी उपस्थितांमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांचाही समावेश होता.

दहशतवादाच्या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष करणे एससीओच्या सदस्य देशांच्या सुरक्षिततेसाठी हानीकारक ठरेल असे जयशंकर म्हणाले. दहशतवादाचे कधीही समर्थन केले जाऊ शकत नाही यावर भारताचा ठाम विश्वास आहे आणि या संकटाचा सामना करणे हे एससीओच्या मूळ उद्दिष्टांपैकी एक आहे अशी आठवण त्यांनी करून दिली. तसेच अफगाणिस्तानातील परिस्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे असेही त्यांनी सांगितले.

सर्व देशांमधील दळणवळण प्रगतीसाठी आवश्यक असले तरी त्यासाठी सर्व सदस्य देशांची स्वायत्तता आणि प्रादेशिक अखंडता यांचा आदर केला गेला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. चीनचे परराष्टमंत्री चीन गांग, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव आणि इतर परराष्ट्रमंत्री यावेळी उपस्थित होते.

भुत्तो यांची टीका

यानंतर भाषण करताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनी भारतावर अप्रत्यक्ष टीका केली. काश्मीरचा मुद्दा अप्रत्यक्षपणे उपस्थित करताना आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होता कामा नये असे आवाहन त्यांनी केले. तसेच मुत्सद्देगिरीत चढाओढीसाठी दहशतवादाचा हत्यार म्हणून वापर करू नये असे ते म्हणाले. दहशतवादाशी लढा देताना सामूहिक दृष्टिकोन बाळगावा, हा जागतिक सुरक्षेला धोका असून त्याच्याशी लढा देण्यास पाकिस्तान कटिबद्ध असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुत्तो यांचा दहशतवादाने बळी घेतल्याचीही आठवण करून दिली.

हस्तांदोलन नव्हे, नमस्ते!

एससीओ परिषद सुरू होताना सर्व परराष्ट्रमंत्र्यांचे स्वागत करताना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी प्रथेप्रमाणे हस्तांदोलन न करता नमस्ते म्हणून पाहुण्यांचे स्वागत केले. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी, चीनचे परराष्ट्रमंत्री चीन गांग आणि इतर पाहुण्यांनाही पारंपरिक भारतीय पद्धतीने अभिवादन करण्यात आले.