शिवसेना नेते खासरदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर तसेच, राष्ट्रीयपातळीवरील सध्या सुरू असलेल्या राजकाणावर चर्चा केली. याचबरोबरत राहुल गांधी यांनी शिवसेनेची कार्यपद्धती व जडणघडणी विषय़ी देखील जाणून घेतले असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

”राहूल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामा विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी जाणून घेतले.” असं संजय राऊत यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.

तर, दुसरीकडे संजय राऊत यांनी महाविकासआघाडीत विविध मुद्यांवरून काहीशा कुरबुरी सुरू असताना, राहुल गांधींची भेट घेतल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे. मागील काही दिवसांमध्ये काँग्रेस व ठाकरे सरकारमध्ये काहीसे मतभेद झाल्याचेही दिसून आले होते. विशेष करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यांमुळे महाविकासआघाडामधील धुसफूस समोर आली होती. तर, संजय राऊत यांनी देखील वेळोवेळी नाना पटोलेंच्या विधानांवर प्रतिक्रिया दिली होती.

“राज्याच्या मदतीसाठी तातडीने निधी मंजूर करा”; शिवसेना, राष्ट्रवादीची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी

तर आजच राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदरांनी आज केंद्रीय अर्थमंत्र्यांची दिल्लीत भेट घेतली होती. महाराष्ट्रातील महापुराच्या संकटात विमा कंपन्यांनी व्यापाऱ्यांच छळ थांबवावा आणि राज्याच्या मदतीसाठी केंद्राने तत्काळ निधी मंजूर करावा, अशा दोन मागण्या केंद्रीय अर्थमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या खासदारांमध्ये शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व सुनिल तटकरे यांचा देखील समावेश होता.