Sanjay Raut : आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. याबाबत भाजपाने संविधान हत्येचा दिवस म्हणत निषेध नोंदवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ता या दैनिकात आणीबाणीच्या पन्नाशीबाबत लेखही लिहिला आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी भाजपाला कुठल्याही गोष्टीची नौटंकी करायची सवय आहे असं म्हणत भाजपावर टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
भाजपाला नौटंकी करण्याचं व्यसन लागलं आहे. ही त्यांची एक नशा आहे. काहीही झालं तरी ते नौटंकी करतात. पहलगाम, पुलवामा याचाही त्यांनी उत्सव केला. आणीबाणीला ५० वर्षे झाली आहेत. भूतकाळात जे झालं ते विसरुन पुढे गेलं पाहिजे. आणीबाणी हा संविधान हत्या दिवस कसा काय? याचं विश्लेषण भाजपा आणि संघाच्या तज्ज्ञांनी केलं पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. त्यांचा पत्रव्यवहार आहे तसा, देवरस यांना अटक केली होती. पण इंदिरा गांधी यांना जी पत्रं पाठवली होती त सगळं इंटरेस्टिंग आहे असं संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता-संजय राऊत
भाजपा आणि स्वतःला शिवसेना म्हणवणारे लोक बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावतात. त्यांना सांगू इच्छितो की बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचं खुलं समर्थन केलं होतं. आणीबाणी ही शिस्त लावणारी एक व्यवस्था होती. भारतीय घटनेतील तरतुदीनुसार जेव्हा देशात अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्ती काम करतात तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करुन देशावर नियंत्रण मिळवलं जातं. याची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत आहे. घटनापीठानेही त्या तरतुदीला मंजुरी दिली. याचा अभ्यास या लोकांनी केला पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले.
दहा वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी-राऊत
संजय राऊत पुढे म्हणाले, इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली होती खुलेआम लावली होती. आणीबाणीचा प्रस्ताव घेऊन त्या संसदेत गेल्या होत्या त्यांनी संसदेचं विशेष अधिवेशन घेतलं होतं. गेल्या दहा वर्षांत देशात अघोषित आणीबाणी आहे. लाडक्या उद्योगपतींसाठी संपत्ती लुटली जाते आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात टाकलं जातं आहे. तिहार आणि उत्तर प्रदेशच्या तुरुंगात असंख्य लोक अडकून आहेत. हे सगळं इंदिरा गांधींनी केलं नव्हतं. इंदिरा गांधींनी घोटाळे करुन निवडणुका जिंकल्या नाहीत. आणीबाणी लावल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यात त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पराभव झाला तो कौल त्यांनी स्वाकीराला, आज हे होतं आहे का? तेव्हाची आणीबाणी अधिकृत आणि आत्ताची आणीबाणी अघोषित आहे. आता या अघोषित आणीबाणीविरोधात लढलं पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले आहेत.