Shashi Tharoor Slams Pakistan: अमेरिका-पाकिस्तान यांच्यात ६ जून रोजी झालेल्या चर्चेनंतर, अमेरिकन काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शेरमन यांनी सोशल मीडियावर दहशतवादविरोधी चर्चांवर प्रकाश टाकणारी महत्त्वाची माहिती दिली आहे. शेरमन यांच्या पोस्टला उत्तर देताना काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी डॉ. शकील आफ्रिदी यांच्या सुटकेसाठी अमेरिकेने केलेली मागणी “पाकिस्तानच्या दहशतवादा विरोधातील स्वागतार्ह पाऊल” असल्याचे म्हटले आहे.
खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे की, “पाकिस्तान हा असा देश आहे ज्याने केवळ दहशतवादी सूत्रधार ओसामा बिन लादेनला आश्रय दिला नाही तर अमेरिकेला त्याला पकडून देणाऱ्या धाडसी डॉक्टरला अटक करून शिक्षाही दिली. पाकिस्तानमध्ये, तुम्हाला दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याबद्दल बक्षीस दिले जाते आणि दहशतवाद्याविरोधात बोलल्यास छळ केला जातो!”
पाकिस्तानने दहशतवादाविरोधात प्रयत्न केले पाहिजेत
२००२ मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करून, पाकिस्तानी शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेदरम्यान ब्रॅड शेरमन यांनी दहशतवादाशी लढण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “पर्ल यांचे कुटुंब अजूनही माझ्या जिल्ह्यात राहते, पाकिस्तानने या नीच गटाला संपवण्यासाठी आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत.”
शेरमन यांनी पुढे असेही नमूद केले की, या चर्चेत सिंधू पाणी करार आणि भारताकडे जाणारे पाणी रोखण्यात चीनची भूमिका यांचा समावेश होता.
डॉ. शकील आफ्रिदी कोण आहेत?
डॉ. शकील आफ्रिदी हे एक पाकिस्तानी डॉक्टर आहेत ज्यांनी अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला शोधण्यात सीआयएला मदत केली होती. २०११ मध्ये अबोटाबादमध्ये अमेरिकन नेव्ही सीलने केलेल्या यशस्वी कारवाईत ओसामा बिन लादेनला ठार मारण्यात आले होते. यानंतर आफ्रिदीला पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अटक केली होती. मे २०१२ मध्ये, देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना ३३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ अमेरिकेत
भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शेरमन यांनी हे विधान केले आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर सध्या वॉशिंग्टनमध्ये ऑपरेशन सिंदूर आउटरीच शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.
भारतीय शिष्टमंडळाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी दहशतवादाविरुद्धच्या सुरू असलेल्या लढाईत भारताच्या भूमिकेला “भक्कम पाठिंबा” असल्याचे पुन्हा सांगितले.