Sonam Killed Husband Raja Raghvanshi: इंदोरमधील नवविवाहित दाम्पत्य सोनम व राजा सूर्यवंशी सध्या माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहे. राजा सूर्यवंशीची मेघालयमध्ये हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून २ जून रोजी त्याचा मृतदेह सापडला. मात्र, तोपर्यंत बेपत्ताच असणारी सोनम आता सापडली आहे. मेघालयमधून बेपत्ता झालेली सोनम उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये सापडल्यामुळे या प्रकरणातलं गूढ वाढू लागलं आहे. मेघालय पोलिसांनी राजाची हत्या सोनमनंच केल्याचा दावा केला आहे. मात्र, तिच्या वडिलांनी उलट पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. त्यातच आता सोनमनं गाझीपूरमधून सर्वात आधी तिच्या भावाला फोन केल्याचं स्पष्ट झालं आहे.
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, सोनम रघुवंशीनं बेपत्ता झाल्यानंतर पहिल्यांदाच तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यात तिवनं तिचा चुलत भाऊ गोविंद याला फोन केला होता. सोनमचे वडील देवी सिंह यांनी यासंदर्भात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत माहिती दिली आहे.
सोनमचा भावाला फोन, वाचवण्याची केली विनंती
“मला सोनमचा चुलत भाऊ गोविंदचा फोन आला होता. गोविंदनं मला सांगितलं की सोनम उत्तर प्रदेशमधील एका ढाब्यावर सापडली आहे. मी पहाटे ५ वाजता फोनचा आवाज ऐकून उठलो. गोविंद तिकडून म्हणाला, आपली मुलगी सापडली आहे. खूप रडत आहे. ती म्हणाली, दादा मला वाचव (भैय्या मुझे बचा लो). गोविंदनं यानंतर तिला ढाब्यातल्या एका खोलीवर थांबायला सांगितलं. त्यानं पोलिसांना फोन केला आणि नंतर पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतलं”, असं देवी सिंह म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
११ मे रोजी सोनम व राजा रघुवंशीचा विवाह झाला. २० मे रोजी दोघेही मेघालयला फिरण्यासाठी गेले आणि २३ मे पासून दोघेही बेपत्ता झाले. २ जून रोजी मृतदेह सापडल्यानंतर राजा रघुवंशीची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. त्याच्या मृतदेहाशेजारी स्थानिकांकडून वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जाणारी धारदार दाव सापडली. यानेच राजाची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर आता सोनमदेखील सापडली असून तिनंच पतीची हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनीदेखील एक्सवरील पोस्टमध्ये तीच माहिती दिली आहे.
एकमेकांच्या पसंतीनेच विवाह
दरम्यान, दोघांचा विवाह एकमेकांच्या पसंतीनेच झाल्याची माहिती देवी सिंह यांनी दिली आहे. “दोघांनी एकमेकांचा बायोडेटा पाहिल्यानंतर आणि एकमेकांची भेट घेतल्यानंतरच त्यांचा विवाह झाला होता. ते दोघे एकमेकांना भेटले आणि पसंती दर्शवली. त्यामुळे सोनमनं हे केलंय हा पोलिसांचा दावा मला मान्यच नाहीये. आमची मुलं असं कसं करू शकतात?” असा उद्विग्न सवाल सोनमच्या वडिलांनी केला आहे.
गोविंदनंच राजाच्या भावालाही फोन केला
सोनम गाझीपूरमधील एका ढाब्यावर सापडल्यानंतर गोविंदनंच राजाचा भाऊ विपीन रघुवंशीला फोन करून त्यासंदर्भात माहिती दिली. यासंदर्भात विपीन म्हणाला, “गोविंदच्या बोलण्यावर माझा विश्वास बसला नाही. मी तिला बघण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा गोविंदनं मला दुसऱ्या एका नंबरवरून फोन केला आणि सोनमचा चेहरा व्हिडीओ कॉलवर दाखवला”.
सोनमवरील आरोपांबाबत विपीनला नंतर समजलं
दरम्यान, विपीननं यानंतर स्थानिक पोलीस स्थानकात फोन केल्यानंतर त्याला सोनमवरील आरोपांबाबत माहिती मिळाली. “हे पचवणं फार अवघड आहे. आम्हाला असं वाटत नाही की सोनमनं हे केलं असेल. स्वत: सोनम जोपर्यंत तिच्या तोंडाने हे सांगत नाही, तोपर्यंत यावर विश्वास ठेवण्याची आमची इच्छा नाही”, अशी प्रतिक्रिया मृत राजा रघुवंशीचा भाऊ विपीननं दिली आहे.
“हे अरेंज मॅरेजच होतं. पण या विवाहात ते दोघे आनंदी होते. ही त्यांचीच इच्छा होती. त्यांच्यावर लग्नासाठी कुणीही सक्ती केलेली नव्हती. लग्नाच्या खरेदीसाठी सासूबरोबर जाताना सोनम खूप आनंदी होती. शिलाँगला फिरायला जाणं ही त्या दोघांची कल्पना होती. सोनमनं राजावर यासंदर्भात कोणतीही बळजबरी केली नाही. राजाचं कुणाशीही शत्रुत्व नाही. शिवाय, त्याच्या मागावर पोलीसदेखील नव्हते”, असंही विपीननं सांगितलं आहे.
दरम्यान, राजा रघुवंशीची आई उमा रघुवंशीनं मात्र सोनमनंच शिलाँगला जाण्यासंदर्भात राजाला गळ घातल्याचं म्हटलं आहे. “लग्नानंतर ते दोघे चार दिवस कुटुंबाबरोबर राहिले. त्यानंतर सोनमनं राजाला शिलाँगला नेण्यासंदर्भात सांगितलं. तिनं माझ्या मुलाला शिलाँगची तिकिटं बुक करायला सांगितलं. आमच्यापैकी कुणीही आधी शिलाँगला गेलेलं नव्हतं. त्यामुळे तिथली आम्हाला काही माहिती नव्हती. पण तिनं राजाला तिथे जाण्यासाठी राजी केलं. तिचं कुटुंब गेल्या वर्षी शिलाँगला जाऊन आलं होतं”, असं उमा रघुवंशी म्हणाल्या.
सोनमची पार्श्वभूमी…
दरम्यान, लग्नाआधी सोनमसंदर्भात माहिती काढल्याचं उमा रघुवंशी म्हणाल्या. “आम्ही तिची माहिती काढली होती. तिचे वडील म्हणाले की ती कामावर जाते आणि थेट घरी येते. फारशी कुणाशी बोलत नाही. लग्नानंतर ती वरच्या मजल्यावर राहात होती. जेवणासाठी खाली येत होती. आमच्यात तेव्हा फारसा संवाद झाला नाही. आम्हालाही तिला प्रायव्हसी द्यायची होती. पण एक सून म्हणून तिचं माझ्याशी चांगलं वर्तन होतं. ती मला आई म्हणायची. आम्ही स्वप्नातही असा विचार केला नव्हता की सोनम असं काही करू शकेल. जर सोनमनं खरंच असं काही केलं असेल, तर तिला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी”, असं उमा रघुवंशी म्हणाल्या.