Sonam Raghuvanshi Raj Kushwah Plan: सोनम रघुवंशी उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये पोलिसांसमोर शरण आल्यानंतर या प्रकरणातले अनेक नवनवे खुलासे पोलिसांकडून केले जात आहेत. त्यात सोनम रघुवंशीनं तिचा प्रियकर राज कुशवाह याच्या मदतीने पती राजा रघुवंशीची हत्या केल्याचा गंभीर दावाही आहे. मात्र, आता सोनमच्या अटकेनंतर राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचे अनेक नवे कंगोरे पोलिसांकडून जाहीर केले जात आहेत. त्यातून राजा रघुवंशीच्या हत्येचा कट कसा रचला गेला, प्रत्यक्ष हत्या कशी झाली आणि त्यानंतर काय घडामोडी घडल्या, याचं संपूर्ण चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे.

राज कुशवाह… हत्या प्रकरणाचं नवं वळण!

११ मे रोजी सोनम आणि राजा रघुवंशीचं लग्न झालं. दोघांच्या सहमतीनंच लग्न झाल्याचा दावा दोन्हीकडच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. काही दिवस सासरी राहिल्यानंतर २० मे रोजी सोनम रघुवंशी पतीसह फिरायला मेघायल येथील शिलाँगला गेली. यावेळी सोनमनंच शिलाँगचं पूर्ण नियोजन केल्याचा दावा राजाच्या आईनं केला आहे. २३ मे पासून दोघेही अचानक बेपत्ता झाले. २ जूनला थेट राजा रघुवंशीचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर सोनमचा शोध सुरू झाला. ८ जून रोजी रात्री उत्तर प्रदेशमधल्या गाझीपूरमध्ये एका ढाब्यावर सोनम सापडली. पण आता या चर्चेत आत्तापर्यंत कुठेच नसलेला राज कुशवाह समोर आला.

सोनमनं राज कुशवाह याच्याशी संगनमत करूनच पती राजा रघुवंशीची मेघालयमध्ये हत्या घडवून आणल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. मध्य प्रदेशच्या क्राईम ब्रांचनं ही माहिती दिल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात दिलेल्या सविस्तर वृत्तात नमूद केलं आहे.

सोनमनंच राज कुशवाहला लोकेशन पाठवलं

मेघालयमध्ये असताना सोनमनंच ते दोघे नेमके कुठे आहेत, ते कळवण्यासाठी लोकेशन राज कुशवाहला पाठवलं. राज कुशवाहनं सुपारी दिलेल्या भाडोत्री मारेकऱ्यांनी त्या लोकेशनच्या सहाय्याने सोनम व राजा रघुवंशी यांचा शोध घेतला आणि तिथे पोहोचून राजाची हत्या केली. पण इकडे राज कुशवाह मात्र नामानिराळा राहून इंदोरमध्येच थांबला. मेघालयमध्ये पोलीस सोनमचा शोध घेत असताना, राजाचा मृतदेह सापडल्यानंतर राज कुशवाह चक्क तिच्या कुटुंबीयांसमवेतही धीर देताना दिसून आला.

“आरोपींनी मेघालयमध्ये आधी राजाची हत्या करून नंतर त्याचा मृतदेह पोहोचण्यासाठी अवघड अशा ठिकाण टाकला. घडामोडींवर लक्ष ठेवता यावं म्हणून राज कुशवाह इंदोरमध्येच दोघांच्या कुटुंबीयांच्या आसपास राहिला. हत्येच्या काही दिवस आधी सोनम व राज कुशवाह सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे राजवरचा आमचा संशय बळावला”, अशी माहिती क्राईम ब्रांचच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.

कोण आहे राज कुशवाह?

राज कुशवाहबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. राज कुशवाह एका प्लायवूड कंपनीत कामाला आहे. ही कंपनी सोनमच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. सोनम एका कंपनीत एचआर विभागात कामाला होती. दोन वर्षांपूर्वीच राज कुशवाह आणि सोनम रघुवंशीची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. कुशवाह सोनमच्या घराजवळच राहात होता. पण हल्लीच तो नंदबाग नावाच्या भागात राहायला गेला होता. राजा रघुवंशीची हत्या करणारे मारेकरी याच परिसरात राहात होते. कुशवाहनं विशाल चौहान, आकाश राजपूत व आनंद कुर्मी या मारेकऱ्यांना इथेच हत्येची सुपारी दिल्याचंही क्राईम ब्रांचच्या या अधिकाऱ्याने सांगितलं.

हत्येआधी नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी आधी ट्रेनने गुवाहाटीला पोहोचले. तिथून ते मेघालयला गेले. यादरम्यान सोनमनं त्या दोघांचं लाईव्ह लोकेशन राज कुशवाहला पाठवलं. राजनं ते मारेकऱ्यांना पाठवलं आणि त्याच्या मदतीने मारेकरी राजा रघुवंशीपर्यंत पोहोचले. “मारेकरी आधी बिहार, मग गुवाहाटी आणि शेवटी मेघालयला पोहोचले आणि तिथे त्यांनी राजाची हत्या केली. त्यांना ७ दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आलं आहे. चौथा मारेकरी आनंदला अटक मध्य प्रदेशच्या बिना सागर जिल्ह्यातून अटक करण्या आली असून इंदोरला आणण्यात येत आहे”, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश दंडोतिया यांनी दिली.

शिलाँगमधील गाईड ठरला महत्त्वाचा!

दरम्यान, मेघालयमधील गाईडनं पोलिसांना दिलेला जबाब या प्रकरणात महत्त्वाचा ठरला. या गाईडनं सोनम रघुवंशी व राजा यांना तीन अज्ञात व्यक्तींसोबत हत्या झाली त्या ठिकाणाजवळ जाताना पाहिल्याचं सांगितलं. तिघे मारेकरी हिंदीत बोलत होते. त्यामुळे ते स्थानिक नव्हते, असंही सांगितलं. मृतदेहाजवळ धारदार शस्त्र दाव सापडलं. यानंच राजा रघुवंशीची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. हे हत्यार शिलाँगमधील स्थानिक परिसरात आढळत नसल्यामुळे तेदेखील बाहेरूनच आणण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

सोनमच्या हाताखाली काम करत होता राज कुशवाह!

दरम्यान, राज कुशवाहबाबत राजा रघुवंशीचा चुलत भाऊ विपीन रघुवंशीनं दिलेली माहिती अधिकच रंजक ठरली आहे. “राज कुशवाह सोनमच्या हाताखाली काम करत होता. ते सतत फोनवर बोलत असायचे. मी राज कुशवाहला कधीच पाहिलेलं नाही. मी फक्त त्याचं नाव ऐकलंयय. खरंतर सोनम आणि राजा हे फक्त कामाख्या देवीच्या मंदिरात जाणार होते. पण तिथून आपण शिलाँगला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्हाला हे माहिती नाही की त्या दोघांपैकी नेमकं कुणी मेघालयला जाण्याचं नियोजन केलं. त्यांनी परतीची तिकिटंही बुक केली नव्हती”, अशी माहिती विपीन रघुवंशीनं दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिलाँगला जाण्याचं नियोजन सोनमचंच?

दरम्यान, राजाचा भाऊ जरी नियोजनाबाबत खात्रीशीर काही सांगू शकत नसला, तरी राजाच्या आईनं मात्र शिलाँगला जाण्याचा प्लॅन सोनमचाच होता, असा दावा केला आहे. “सोनमनंच त्यांचा फिरण्याचा प्लॅन केला होता. सोनमनं प्रवास व हॉटेलची तिकिटं बुक करण्यासाठी राजाकडून ९ लाख रुपये घेतले होते. शिवाय, सोबत महागडे सोन्याचे दागिने घेण्यासही तिनं राजाला राजी केलं होतं”, असा दावा राजाची आई उमा रघुवंशी यांनी केला आहे. या दाव्यांमधील तथ्य पोलीस तपासून पाहात आहेत.