पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि  तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समूहाला देण्याच्या निर्णयाला बुधवारी मंजूरी दिली आहे. सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समूहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. यावरुनच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार जयराम रमेश यांनी सरकार याच वेगाने कंत्राटं देत राहिलं तर लवकरच भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नाव बदलून ‘अदानी एअरपोर्ट्स ऑफ इंडिया’ असं होईल अशी खोचक टीका केली आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये तीन विमानतळांचा कारभार अदानी समूहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे आता जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत. यावरुनच केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध करताना जयराम रमेश यांनी एक ट्विट केलं आहे.

“आदी अहमदाबाद, लखनऊ आणि मंगळूरु विमानतळं विकली आणि आता जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम. सर्व सहा विमानतळं खासगी कंपनीला विकण्यात आली आहेत. या वेगाने एएआय (एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया) लवकरच ‘अदानी एअरपोर्ट्स ऑफ इंडिया’ नावाने ओळखलं जाईल,” असं जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळाने सध्या मंजूरी दिलेल्या तीन विमानतळांबरोबरच लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हक्कही अदानी समूहाला विकण्यासंदर्भात २०१९ साली फेब्रुवारी महिन्यातच करार झाला होता. लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात  भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या विमानांचे खासगीकरण केल्याने फायदा होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये अदानी समूहाने देशाच्या नागरी हवाई सेवाक्षेत्रात शिरकाव करताना  सहा विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे ५० वर्षांचे कंत्राट मिळाले.  स्पर्धकांच्या तुलनेत अधिक रकमेची बोली लावूनही अदानी समूहाला हे कंत्राट मिळाले.  समूहाने अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, तिरुअनंतपुरम आणि मंगळुरू या पाच विमानतळांच्या परिचलनाचे कंत्राट मिळविले असून त्यासाठी प्रति प्रवासी अनुक्रमे १७७, १७४, १७१, १६८ आणि ११५ रुपये भाडे निश्चित केले. या करारामुळे पुढील ५० वर्षांकरिता या विमानतळांच्या देखभाल तसेच परिचलनाचे कंत्राट अदानी समूहाकडे असणार आहे. अदानीच्या स्पर्धेत दिल्ली आणि हैदराबाद विमानतळाचे परिचलन करणाऱ्या जीएमआरची निविदा कमी रकमेची असूनही अदानीची निवड झाली. गुवाहाटी विमानतळ वगळता यादीतील इतर पाच विमानतळांकरिता १० कंपन्यांच्या ३२ तांत्रिक निविदा आल्या होत्या. पैकी कंत्राटविजेत्या अदानीचा आता या क्षेत्रातही शिरकाव झाला आहे. समूह सध्या बंदर, जहाज, ऊर्जा तसेच अन्य पायाभूत क्षेत्रात कार्यरत आहे.