दिल्लीतील जहांगीरपुरीत शनिवारी (१६ एप्रिल) झालेल्या हिंसाचारातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना घडली. या ठिकाणी महिलांनी पोलिसांवर चार ते पाच दगड फेकल्याचं सांगितलं जात आहे. यात एका पोलीस कर्मचाऱ्याला किरकोळ जखमही झाली. संबंधित पोलीस जहांगीरपुरीतील हिंसाचारात गोळीबार केल्याचा आरोप असणाऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी गेले होते. मात्र, तो फरार असल्याने पोलिसांनी त्याच्या मेहुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यानंतर स्थानिक महिलांनी गोंधळ केला.

जहांगीरपुरीतील हिंसाचारानंतर सोशल मीडियावर १७ एप्रिलचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत होता. यात १६ एप्रिलला निळ्या रंगाचा कुर्ता घातलेला व्यक्ती गोळीबार करत असल्याचं दिसत आहे. यानंतर पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेतला. पोलीस आरोपीच्या घरी गेले तेव्हा तो फरार होता. यानंतर पोलिसांनी घरच्यांची चौकशी केली. यावेळी महिलांनी पोलिसांवर दगडफेक केली. या प्रकरणी एका व्यक्तिला ताब्यात घेण्यात आले आहे.

न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र तपासाची मागणी

जहांगीरपुरी हिंसाचाराचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पत्र पाठवून स्वतः दखल घेत न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र तपासाची मागणी करण्यात आलीय. तसेच निष्पक्ष तपास व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समितीचं गठन करण्याची विनंती करण्यात आलीय.

आतापर्यंत २१ आरोपींना अटक

या प्रकरणी दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांची प्रतिक्रिया आलीय. ते म्हणाले, “जहांगीरपुरी घटनेचा प्रत्येक बाजूने तपास करण्यासाठी १४ जणांच्या पथकाचं गठन करण्यात आलंय. आतापर्यंत २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे.” पोलीस स्टेशनला दाखल तक्रारीनुसार, हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याचं रुपांतर हिंसेत झालं.

हेही वाचा : ABVP Vs Left: राम नवमीला जेएनयूमध्ये नक्की काय घडलं? वाचा १० मुख्य मुद्दे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपने या हिंसाचाराला भाजपाला जबाबदार धरलं आहे. दिल्ली भाजपाचे प्रमुख आदेश गुप्ता यांनी हिंसाचारातील ८ गुंडांचा सत्कार केल्याचा आरोप आपने केलाय. तसेच यातून भाजपा हिंसाचारासोबत असल्याचा संदेश देत असल्याचंही आपने म्हटलं. दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नुकताच झालेला हिंसाचार समाजाला तोडण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप केला.