India Pakistan Tensions Updates : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्याला देखील भारताने जशास तसं प्रत्युत्तर दिलं. एवढंच नाही तर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक कठोर पावलं उचलत सिंधू जल कराराला देखील स्थगिती दिलेली आहे.

तसेच व्यापार निर्बंध घालून भारताने पाकिस्तानची कोंडी देखील केली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा सिंधू पाणी करारावरून भारताने पाकिस्तानला कडक शब्दांत फटकारलं आहे. ताजिकिस्तानमध्ये शुक्रवारी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हिमनद्यांवरील परिषदेच्या एका सत्राला संबोधित करताना भारताचे पर्यावरण राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. ‘पाकिस्तान दहशतवादाद्वारे कराराचं उल्लंघन करत असल्याचं सांगत पाकिस्तानने इतरांना दोष देणं थांबवलं पाहिजे’, असं म्हणत मंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली.

मंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी म्हटलं की,”पाकिस्तान स्वतः दहशतवादाच्या माध्यमातून कराराचं उल्लंघन करत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हिमनद्यांवरील परिषदेच्या मंचाचा पाकिस्तानने गैरवापर केला असून या मंचाच्या कक्षेत नसलेल्या मुद्द्यांवर अनावश्यक संदर्भ आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्हाला देखील धक्का बसला आहे. मात्र, आम्ही याचा तीव्र निषेध करतो”, असं कीर्ती वर्धन सिंह यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, हिमनदी संवर्धनाच्या पार्श्वभूमीवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्याच्या निर्णयाला एकतर्फी आणि बेकायदेशीर निर्णय असल्याचं म्हटलं होतं. तसेच राजकीय फायद्यासाठी लाखो लोकांचे जीवन ओलिस ठेवता कामा नये. पाकिस्तान हे होऊ देणार नाही. आम्ही कधीही लाल रेषा ओलांडू देणार नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावरून मंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, “सिंधू जल करारावर स्वाक्षरी झाल्यापासून परिस्थितीत मूलभूत बदल झाले हे निर्विवाद सत्य आहे. ज्यासाठी कराराच्या जबाबदाऱ्यांचं पुनर्मूल्यांकन आवश्यक आहे. या बदलांमध्ये तांत्रिक प्रगती, हवामान बदल आणि सीमापार दहशतवादाचा सततचा धोका यांचा समावेश आहे. तसेच पाकिस्तानच्या सीमेपलीकडून होणारा दहशतवाद हा या कराराच्या तरतुदींनुसार त्याचा गैरफायदा घेण्याच्या क्षमतेत अडथळा आणतो. स्वतः कराराचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने कराराच्या उल्लंघनाचा दोष भारतावर टाकणं थांबवावं”, अशा शब्दांत मंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी पाकिस्तानला फटकालं आहे.