भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेले हजरत निजामुद्दीन दर्ग्याचे मौलवी हे पाकिस्तान सरकारच्याच कामानिमित्त गेले होते. त्यांच्याबद्दल आपल्याजवळ गोपनीय माहिती उपलब्ध असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर सय्यद असिफ निझामी आणि नाझिम अली निझामी हे बेपत्ता झाले होते. कराचीमधून मला एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर काळा कपडा टाकण्यात आला होता. त्या ठिकाणी पोहचल्यानंतर मला चहा आणि बिस्किटे देण्यात आली असे असिफ निझामी यांनी म्हटले होते.

ते दोघे खोटे साफ खोटे बोलत आहे असे स्वामी यांनी म्हटले. स्वतःच ते त्या ठिकाणी उतरले आणि आपल्या तथाकथित ताब्यात घेण्याचा त्यांनी बनाव रचला असे स्वामी यांनी म्हटले. ते दोघे देशविरोधी कृत्य करण्यासाठी गेले होते.  त्यांच्याबाबतची स्वतंत्र माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे असे स्वामी यांनी म्हटले.  त्या दोघांचीही चौकशी करण्यात यावी असे त्यांनी म्हटले. सय्यद असीफ निझामी आणि त्यांचे पुतणे नझीम निझामी यांना १४ मार्च रोजी कराचीकडे जाणाऱ्या शाहीन एअरलाईन्सच्या विमानातून उतरवून ताब्यात घेण्यात आले होते.

लाहोरमधील अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन त्यांना पकडण्यात आले होते. या दोन्ही धर्मगुरुंना मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन ताब्यात घेतले होते. ही संघटना अल्ताफ हुसैन यांची आहे. भारतातून गेलेल्या दोन्ही मौलवींचा या संघटनेशी काय संबंध आहे का याचा तपास घेण्यासाठी दोघांना ताब्यात घेण्यात आले होते.

दोन्ही मौलवींच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना साकडे घालण्यात आले होते. स्वराज यांनी पाकचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझीझ यांच्याशी चर्चा केल्यानंतर या दोघांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी सकाळी दोन्ही मौलवी भारतात परतले. दिल्ली विमानतळावरुन दोघेही निजामुद्दीन दर्गा येथे गेले. तिथे स्थानिकांनी हार आणि पुष्पगुच्छ देऊन दोघांचे स्वागत केले.