उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. नेते मंडळींकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर, सत्ताधारी भाजपाने देखील कंबर कसली असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील सभांचा धडका लावला आहे. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी काल तालिबानला उद्देशून केलेलं एक विधान चांगलंच चर्चेत आलं आहे.

“ तालिबानने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कहर केला आहे, पण ते भारताकडे पाहू शकत नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की त्यांनी तसे केले तर एअर स्ट्राईक तयार आहे आणि हे केवळ पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळेच.” असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊ येथे एका भाषणात म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान आणि तालिबानाचा मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, “ यावेळी प्रत्येक व्यक्तीस जागृत करण्याचं काम करायचं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश बलशाली आहे आणि कोणताही दुसरा देश भारताकडे पाहण्याची हिंमत करू शकत नाही. आज तालिबानमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हैराण आहेत, मात्र तालिबान्यांना माहिती हे त्यांनी जर भारताकडे पाहीलं तर एअर स्ट्राईक तयार आहे.”