पीटीआय, हरिद्वार
बलुचिस्तानला पाकिस्तानच्या अवैध ताब्यातून स्वतंत्र करावे, यासाठी बलुचिस्तानच्या निर्वासित सरकारच्या पंतप्रधान नाएला कादरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त राष्ट्रांमध्ये मदत मागितली आहे.‘बलुचिस्तानच्या मदतीसाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये आज हजर राहण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारला संधी आहे. ही संधी कदाचित उद्या मिळणार नाही’, असे कादरी यांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे पत्रकारांना सांगितले. याआधी त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करण्यासाठी हरिद्वारमध्ये गंगेच्या व्हीआयपी घाटावर पूजा केली.
‘एकेकाळी स्वतंत्र देश असलेला बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या अवैध ताब्यात आहे. पाकिस्तान या ठिकाणची खनिज संसाधने लुटत असून, येथील लोकांवर नाना प्रकारचे अत्याचार करत आहे. बलुची मुलींवर बलात्कार करण्यात येत आहेत, तसेच घरे आणि फळबागांना आगी लावण्यात येत आहेत’, असे कादरी म्हणाल्या.