नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या वाटय़ाला येणाऱ्या १० जागांवर बुधवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा झाली. पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या विदर्भामधील ४ जागांचे उमेदवार जवळपास निश्चित झाले असले तरी गडचिरोली व चंद्रपूरचा वाद अद्याप कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या एखाद-दोन दिवसांमध्ये तिसऱ्या यादी जाहीर होण्याची शक्यता असून यात या १० जागांचा समावेश असेल, असे सांगितले जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीची गुरुवारी मुंबईमध्ये बैठक होणार असून जागावाटपाचा तिढा यावेळी सोडवला जाईल. त्याआधी काँग्रेसच्या नेत्यांचा बैठक होईल. त्यात दिल्लीतील बैठकीत निश्चित न झालेल्या उमेदवारांवर चर्चा होऊ शकेल. गडचिरोलीमध्ये नामदेव किरसान व नामदेव उंडी यांच्या नावावर चर्चा झाल्याचे समजते. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार व काँग्रेसचे माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या दोन्ही इच्छुक महिला उमेदवार दिल्लीत दाखल झाल्या आहेत. धानोरकर पक्षाध्यक्ष खरगे यांच्या भेटीसाठी निवासस्थानीही गेल्या होत्या. शिवानी वडेट्टीवारही दिवसभर दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात होत्या. याबाबत विचारले असता, चंद्रपूरमध्ये खूप उमेदवार इच्छुक असल्याचे पटोले यांनी सांगितले. धानोरकर यांचे पारडे जड असले शिवानी वडेट्टीवार यांनीही आपला दावा अद्याप कायम ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. बुधवारच्या बैठकीत या दोन्ही जागांवर तोडगा निघू शकलेला नाही. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी सोडण्यावर महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षाची सहमती झाली आहे. काँग्रेसने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. २०१९ मध्ये ही जागा शिवसेने लढवली होती. मात्र शाहू महाराजांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने जागा सोडण्याची तयारी ठाकरे गटाने दाखवली असली, तरी त्याबदल्यात सांगलीची जागा मागितली आहे. मात्र काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांचा याला विरोध आहे. सांगली संदर्भात निर्णय मुंबईत घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे. हेही वाचा >>>पुरवणी आरोपपत्रांवरून ईडीची खरडपट्टी; जामीन मिळण्याच्या अधिकाराचे हनन- सर्वोच्च न्यायालय ‘वंचित’ महाविकास आघाडीपासून वंचित? वंचित बहुजन आघाडी यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीपासून वंचित राहण्याची शक्यता बळावली आहे. ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खरगे यांना पत्र लिहिले होते. या मुद्दय़ावरही बुधवारी प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे कळते. यासंदर्भात मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. ‘वंचित’ने सात जागांची मागणी केली होती. मात्र, दोन जागा देण्याची तयारी महाविकास आघाडीने ठेवली होती. त्यानंतर ‘वंचित’कडून चार जागांची मागणी केल्याचे सांगितले जाते. सांगली, भिवंडीवर दावा राज्यात काँग्रेस १८ जागा लढवण्याची शक्यता असून सांगली, भिवंडी, मुंबईतील दक्षिण-मध्य या तीन जागांवरही पक्षाने दावा केला आहे. त्यासंदर्भात बुधवारी राज्यातील नेत्यांनी खरगे यांच्याशी चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, वर्षां गायकवाड या नेत्यांनी खरगेंची भेट घेण्याआधी महासचिव मुकुल वासनिक यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर या तिन्ही जागांवर पक्षाने हक्क सोडला नसल्याचे पटोले यांनी सांगितले. मुंबईत दोन जागांची मागणी मुंबईमधील सहापैकी तीन जागांवर काँग्रेसने दावा केला होता. आता काँग्रेसने दोन जागा लढवण्याची तयारी दाखवली आहे. २०१९ मध्ये मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव झाला होता, ही जागा काँग्रेसला दिली जाऊ शकेल. मात्र काँग्रेस दक्षिण-मध्य या मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यास तयार नाही. हा काँग्रेसचा परंपरागत मतदासंघ असून एकनाथ गायकवाड यांनी ही जागा लढवली होती. गेल्यावेळी शिवसेनेचे राहुल शेवाळे विजयी झाले होते, त्यामुळे ठाकरे गटाने या जागेची मागणी केली असून तिथे अनिल देसाईच्या उमेदवारीचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.