काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी अनेक त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या खास शैलीमध्ये गुलाम नबी आझाद यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. केवळ शुभेच्छा देऊन न थांबता आठवले यांनी गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा राज्यसभेवर यावं अशी इच्छाही आठवले यांनी बोलून दाखवली. काँग्रेस तुम्हाला पुन्हा राज्यसभेवर आणणार नसेल तर आम्ही तयार आहोत अशी ऑफरही आठवलेंनी दिली. नक्की पाहा >> Photos: मोदी बोलता बोलता थांबले, पाणी प्यायले, अश्रू पुसले अन्…; पाहा संसदेत नक्की काय घडलं गुलाम नबी आझाद, मीर मोहम्मद फयाज, शमशेर सिंह मन्हास, नाझीर अहमद या चार सदस्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज संसदेमध्ये या खासदारांना निरोप देण्यात आला. यावेली राज्यसभेमध्ये विरोधीपक्ष नेते असणाऱ्या गुलाम नबी आझाद यांना शुभेच्छा देताना आठवलेंनी, "तुम्ही सभागृहामध्ये परत यावं असं वाटतं. जर काँग्रेस तुम्हाला परत आणणार नसेल तर आम्ही तयार आहोत. या सदनाला तुमची गरज आहे," असं म्हटलं. आठवलेंनी दिलेली ऑफर ऐकून गुलाम नबी आझाद यांनाही हसू आलं. You should return to the House. If the Congress doesn't bring you back, then, we are ready to do it. This House needs you: Union Minister and RPI leader Ramdas Athawale during farewell to retiring Congress Rajya Sabha MP Ghulam Nabi Azad pic.twitter.com/ITNxRuLIST — ANI (@ANI) February 9, 2021 मोदींनीही दिल भाषण राज्यसभेचा कार्यकाळ संपत असणाऱ्या सदस्यांसाठी निरोपाचं भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळेस मोदींनी ते स्वत: गुजरातचे आणि गुलाम नबी आझाद हे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री असतानाचा किस्सा सांगितला. "गुजरातचे लोकं जेव्हा काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यामुळे अडकले होते तेव्हा गुलाम नबी आझाद आणि प्रणव मुखर्जी यांनी केलेली मदत मी कधीही विसरणार नाही. गुलाम नबी आझादजी मला सतत तेथील माहिती देत होते. आपल्या कुटुंबातील लोकं तिथे अडकल्याप्रमाणे ते काळजी करत होते," असं मोदी म्हणाले. हे सांगताना मोदींचा कंठ दाटून आला. दहशतवादी हल्ल्याच्या वेळीची आठवण झाल्याने मोदी गहिवरले. पुढे काय बोलावं त्यांना सुचत नव्हतं. भावूक झाल्याने आवाज कापत असल्याने मोदी काही क्षण थांबले, पाणी प्यायले आणि पुन्हा बोलू लागले. "पद, कार्यभार, सत्ता येते आणि जाते. मात्र हे सर्व कसं संभाळावं हे गुलाम नबी आझाद यांच्याकडून शिकलं पाहिजे," असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले. यानंतर मोदींनी गुलाम नबी आझाद यांच्याकडे बोट दाखवून त्यांना सॅल्यूट ठोकला. मोदींनी सलाम केल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनाही अगदी नम्रपणे नमस्कार करत तो स्वीकारला. मोदींनी गुलाम नबी आझाद यांना सॅल्यूट केल्यानंतर सर्वच खासदारांनी बाकं वाजवून मोदींच्या या कृतीचं कौतुक केलं. "मी तुम्हाला कधी निवृत्त होऊ देणार नाही. मी यापुढेही तुमचे सल्ले घेत राहिलं. माझे दरवाजे तुमच्यासाठी कायमच उघडे असतील," अशा शब्दाही मोदींनी गुलाम नबी आझाद यांना दिला. "गुलाम नबी आझाद यांच्यानंतर राज्यसभेच्या विरोधीपक्ष नेत्याचे पद जी व्यक्ती सांभाळेल तिच्यासमोर गुलाम नबी यांच्यासारखं काम करण्याचं आव्हान असेल. कारण गुलाम नबी आझाद हे पक्षाबरोबरच देशाची आणि संसदेचीही काळजी करायचे. त्यांनी कायमच देशाला प्राधान्य दिलं," असंही मोदी म्हणाले. त्यांचा प्रेमळ स्वभाव, शांतता आणि जे काही करु दे देशासाठी करु ही इच्छा त्यांना यापुढेही मार्ग दाखवत राहील. ते जे काही करतात ते उत्तमच करतात, अशा शब्दांमध्ये मोदींनी गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केलं. १५ फेब्रुवारी हा गुलाम नबी आझाद यांच्यासहीत इतर तीन खासदारांचा राज्यसभेचे सदस्य म्हणून शेवटचा दिवस असेल.