चारधाम यात्रेतील केदारनाथ मंदिर आज गुरूवारपासून भक्तांसाठी खुलं करण्यात आले आहे. मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांनी उघडण्यात आला आहे. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पुजाऱ्यांनी विधीवत पूजा केली. हजारो भक्तांच्या उपस्थितीत केदारनाथाला जलाभिषेक, रुद्राभिषेक संपन्न झाला आहे.

सात तारखेला गंगोत्री आणि यमनोत्रीची दारे खुली झाल्यापासून चार धामच्या यात्रेला सुरूवात झाली आहे. ही यात्रा सहा महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रावारी बद्रीनाथ मंदिरही भक्तांसाठी खुलं होणार आहे. चार धाम मंदिरांची दारे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सहा महिन्यासाठी बंद केली जातात. एप्रिल-मे दरम्यान पुन्हा उघडली जातात. हिमवादळामुळे यात्रेच्या मार्गावर बर्फाची चादर पडली आहे.

उन्हाळ्यात उत्तराखंडमध्ये चार धामच्या (गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ) यात्रेला सुरूवात होती. या चार स्थळाला हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाते. गंगा नदीचा उगम गंगोत्री आणि यमुना नदीचा उगम यमुनोत्री हे दोन्ही उत्तर काशी जिल्ह्यामध्ये आहे.

चार धामची यात्रा करताना ही घ्या काळजी

गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही चारही ठिकाणे १०००० फुटांपेक्षा अधिक उंच असल्याने विशेष काळजी घ्यावी लागते. जास्त उंचीवर भूक न लागणे, मळमळणे, डोके जड होणे असे प्रकार होतात. त्यासाठी भीमसेनी कापूर जवळ ठेवावा आणि सतत त्याचा वास घ्यावा. त्यामुळे त्रास कमी होतो. या ठिकाणांना जाताना सगळे घाटरस्ते आहेत. त्यामुळे गाडी लागू नये यासाठीच्या गोळ्या घेणे अनिवार्य ठरते, शिवाय सोबत काही प्लास्टिक पिशव्या ठेवाव्यात. गंगोत्री आणि बद्रिनाथपर्यंत गाडी रस्ता आहे, मात्र यमुनोत्री आणि केदारनाथला चालावे लागते किंवा घोडय़ावरून जावे लागते. त्यासाठी आजपासूनच रोज नियमित चालण्याचा सराव करणे गरजेचे आहे. औषधे आणि गोळ्या, चॉकलेट, टिश्यू पेपर, कोल्ड क्रीम या गोष्टी आपल्या जवळच्या पाउच किंवा पिशवीत ठेवाव्यात. उंचावर कॅमेऱ्याची बॅटरी मंद होते. त्यामुळे आणखी एक बॅटरी लोकरीच्या कापडात गुंडाळून ठेवावी. पोन्चू किंवा रेनकोटसाठी वेगळी पिशवी जवळ ठेवावी. टोपी आणि गॉगल अनिवार्य आहे. आपल्यासोबत कोरडय़ा चटण्या ठेवाव्यात. चवबदल होण्यासाठी उपयुक्त असतात. जास्तीचे कपडे कोरडय़ा पिशवीत घेऊन ठेवावेत, कारण कपडे ओले झाले तर वाळत नाहीत.