गेल्या आठवड्यात अनिल बैजल यांनी दिल्लीच्या उप राज्यपाल पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनिल बैजल यांचा राजीनामा स्वीकारला असून विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. बैजल यांनी वैयक्तिक कारणांमुळे दिल्लीच्या उप राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोमवारी राष्ट्रपती भवनाकडून एक निवेदन जारी करत विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे उप राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

विनय कुमार सक्सेना हे सध्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष आहेत. सक्सेना यांचा जन्म २३ मार्च १९५८ साली झाला असून ते कानपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी राजस्थानमधील जेके ग्रुपमध्ये सहाय्यक अधिकारी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. सलग अकरा वर्षे व्हाईट सिमेंट केंद्रात वेगवेगळ्या पदावर काम केल्यानंतर, १९९५ मध्ये गुजरातमधील प्रस्तावित बंदर प्रकल्पाची देखरेख करण्यासाठी त्यांची जनरल मॅनेजर पदी नियुक्ती करण्यात आली होती. पुढे त्यांनी ढोलेर बंदर प्रकल्पाचे सीईओ आणि संचालक म्हणून काम केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑक्टोबर २०१५ मध्ये KVIC चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, विनय सक्सेना यांनी खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांनी ‘हनी मिशन’, ‘कुम्हार सशक्तिकरण योजना’, ‘लेदर कारागीरांचे सक्षमीकरण’, यांसारख्या अनेक नाविन्यपूर्ण योजनांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.