Presidential Election : विरोधी पक्षांच्या संयुक्त आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यास काश्मीर प्रश्न सोडवण्याला प्राधान्य असेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

”मी राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यास काश्मीर प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी, काश्मीरमध्ये शांतता, न्याय, लोकशाही, पुनस्थापित करण्यासाठी आणि जम्मू आणि काश्मीरमधील विकासात्मक कामे करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यासाठी सरकारला विनंती करेल. तसेच या कामाला माझे प्राधान्य असेल”, असे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे.

यशवंत सिंन्हा हे विरोधी पक्षांच्या संयुक्त आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. बिहारमधील पाटणा येथील कायस्थ कुटुंबात त्यांचा जन्म झाला. यशवंत सिन्हा यांनी १९५२ मध्ये पाटणा कॉलेजिएट स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. तसेच त्यांनी १९५८ मध्ये राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. ते १९६२ पर्यंत पाटणा विद्यापीठात राज्यशास्त्राचे शिक्षक होते. यशवंत सिन्हा हे आयएएस अधिकारी होते. तीन वेळा लोकसभेचे खासदार असण्यासोबतच ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार आणि अर्थमंत्रीही राहिले आहेत.

दरम्यान, १८ जुलै २०२२ रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. यशवंत सिंन्हा यांच्या विरोधात भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी मन मोठे करुन…”; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मूंना पाठिंबा देण्याची आणखी एका शिवसेना खासदाराची मागणी