Independence Day 2023 History: यंदा १५ ऑगस्ट २०२३ रोजी आपला ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या जवानांचाही गौरव करीत देशवासीयांना संबोधित करणार आहेत. १५ ऑगस्टनिमित्त संपूर्ण देशभरात देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित केले जातात आणि ध्वजवंदन केले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की, स्वातंत्र्य दिनासाठी १४, १६ किंवा २० नव्हे, तर १५ ऑगस्ट हाच दिवस का निवडण्यात आला? यासंबंधीचा रंजक इतिहास काय आहे ते पाहू.
१५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. पण, १५ ऑगस्टला असं नेमकं काय घडलं होतं हे फार कमी लोकांना माहीत आहे. भारताचा कारभार चालवणे ब्रिटीशांना परडवणारे नव्हते त्यामुळे १९४६ च्या दरम्यान त्यांनी भारतातून लवकरात लवकर निघून जाण्याचे प्रयत्न सुरु केले. यावेळी १९४६ साली ब्रिटनने भारताला स्वातंत्र्य बहाल करण्याची घोषणा केली.
यानंतर ३० जून १९४७ रोजी ब्रिटिश संसदेने लॉर्ड माऊंटबॅटन यांना संपूर्ण सत्ता भारतीयांकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले. लॉर्ड लुईस माऊंटबॅटन हे ब्रिटिश सरकारमधील अतिशय महत्त्वाचे अधिकारी होते. ज्यांनी दोन्ही जागतिक महायुद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळी भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश सरकारने भारतीय नेत्यांसह चर्चा करण्यासाठी माऊंटबॅटन यांना भारतात पाठवले.
४ जुलै १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याबाबत माउंटबॅटन यांनी ‘ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये भारतीय स्वातंत्र्य विधेयक मांडले होते. या विधेयकाला १८ जुलै १९४७ ब्रिटिश संसदेने तत्काळ मंजुरी दिली. या विधेयकानंतर अखंड भारताची फाळणी झाली, यानंतर १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि १५ ऑगस्टला भारत हा एक देश अस्तित्वात आला.
यामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी पासून भारताला स्वतंत्र देश म्हणून घोषित करण्यात आले. यानंतर ब्रिटीशांनी भारताचा सर्व कारभार भारतीय नेत्यांच्या हाती सोपवला.
का निवडला १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून?
अनेक अहवालांनुसार, १५ ऑगस्ट १९४५ रोजी दुसरे महायुद्ध संपले आणि जपानच्या सैन्याने ब्रिटिश सैन्यासमोर शरणागती पत्करून दोन वर्षे पूर्ण झाली होती. त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटिश सैन्यात अलाईड फोर्सेसचे कमांडर होते. अशा परिस्थितीत त्यांनी हा दिवस विशेष मानला. याच कारणामुळे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून निवडला होता.