What the Civil Defence Mock Drill : २२ एप्रिलला पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांना चार दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केलं. या घटनेचा जगभरातून निषेध नोंदवला जातो आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर पाकिस्तानला नेमकं काय प्रत्युत्तर दिलं जाणार? याची चर्चा रंगली आहे. दरम्यान ७ मे रोजी भारतात युद्ध सराव अर्थात मॉक ड्रील केलं जाणार आहे. मॉक ड्रील म्हणजे नेमकं काय ते आपण जाणून घेऊ.
मॉक ड्रील म्हणजे नेमकं काय?
मॉक ड्रील किंवा युद्धाचा सराव ही पद्धत क्षेपणास्त्र हल्ले, हवाई हल्ले या दरम्यान निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय केलं पाहिजे? कुठली काळजी घेतली पाहिजे? सरकारी यंत्रणांनी कसं कार्यरत राहिलं पाहिजे याचा सराव असतो. हवाई हल्ल्यांचा सायरन वाजला की शहरांमधले दिवे बंद केले जातात. जेणेकरुन शत्रूच्या मिसाईल्सना त्यांची लक्ष्यं दिसू नयेत. तसंच गोंधळ आणि हलकल्लोळ कसा टाळला पाहिजे? याचाही सराव या प्रक्रियेत केला जातो. थोडक्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर किंवा थेट युद्ध सुरु झाल्यानंतर नागरिकांनी काय काळजी घ्यायची आहे? सरकारी यंत्रणांनी काय करायचं आहे? याचा सराव म्हणजे मॉक ड्रील.
महाराष्ट्रात १६ ठिकाणी पार पडणार मॉक ड्रील
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, सार्वजनिक ठिकाणं, शाळा, रेल्वे स्टेशन्स, बस स्थानकं आणि गर्दीच्या भागांमध्ये ७ मे रोजी मॉक ड्रील पार पडणार आहे. आपत्कालिन परिस्थितीत सर्वसामान्य जनता, सुरक्षा कर्मचारी आणि सुरक्षा दलांची तयारी कशी आहे याची पडताळणी करणे हा यामागील उद्देश आहे. भारतातल्या एकूण २५९ ठिकाणी ७ मे रोजी युद्ध सराव अर्थात मॉक ड्रील केलं जाईल. १९७१ नंतर पहिल्यांदाच देशभरात अशा प्रकारचं मॉक ड्रील केलं जातं आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, उरण, तारापूर, थळ, सिन्नर, मनमाड, नाशिक, रोहा, नागोठणे अशा १६ ठिकाणी मॉक ड्रील पार पडणार आहे.
मॉक ड्रीलची प्रक्रिया कशी असते?
१) ठरलेल्या वेळेनुसार अलार्म वाजवला जातो किंवा इशारा दिला जातो लोकांना परिस्थितीविषयी सांगितलं जातं. (उदा. बॉम्बस्फोटाची, युद्धाची, भूकंपाची सूचना दिली जाते)
२) मॉक ड्रीलच्या ठिकाणी असलेल्या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढलं जातं.
३) फायर ब्रिगेड, एनडीआरएफ, पोलीस आणि मेडिकल टीम घटनास्थळी पोहोचतात. सर्व प्रक्रियेचं मूल्यांकन केलं जातं.
४) सगळ्या गोष्टींना किती वेळ लागला, काय कमतरता होती आणि कशात सुधारणेला वाव आहे, हे पाहिलं जातं.
५) सद्यस्थितीत आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याचा सराव आधीच झालेला असणं आवश्यक आहे. मॉक ड्रीलच्या माध्यमातून याची पडताळणी करता येते