What is Wide Ball in Cricket Explained in Marathi: १९ ऑक्टोबर २०२३ रोजी वर्ल्डकप २०२३ मधील भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना पार पडला. भारतानं बांगलादेशवर सात विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीनं त्याच्या कारकिर्दीतलं ४८वं एकदिवसीय शतक झळकावलं. मात्र, भारताचा विजय, विश्वचषकातील खेळी किंवा विराट कोहलीचं शतक यापेक्षाही जास्त चर्चेत आला तो नसूम अहमदनं विराट कोहलीला टाकलेला ४२व्या ओव्हरमधला पहिला बॉल! हा बॉल वाईड होता की नाही? यावर सध्या नेटिझन्समध्ये चर्चा चालू आहे. त्यावरून नेमके वाईड बॉलसंदर्भातले क्रिकेटमधले नियम काय आहेत? इथपर्यंत ही चर्चा आली आहे. हे नियम नेमकं काय सांगतात? आणि त्यात विराटबाबत घडलेल्या प्रसंगासाठी लागू होईल असा काही नियम आहे का? जाणून घेऊया…

नियम आले कुठून?

खरंतर नियम काय आहेत याआधीही हे नियम आले कुठून? हे जाणून घेऊयात. एमसीसी अर्थात मेरिलबोन क्रिकेट क्लबकडून क्रिकेटसंदर्भातली नियमावली तयार केली जाते. जर काही काळानंतर तिचा आढावा घेणं, त्यात सुधारणा आवश्यक असेल तर ती करणं, त्यात नव्याने नियम समाविष्ट करणं किंवा कालबाह्य झालेले नियम रद्द करणं अशा प्रकारच्या अनेक जबाबदाऱ्या एमसीसी पार पाडते. लंडनच्या लॉर्ड्समध्ये या संस्थेचं कार्यालय आहे. या क्लबकडून पहिला नियमांचा ड्राफ्ट १७४४ साली तयार करण्यात आला. ऑक्टोबर २०१७पर्यंत एमसीसीनं सात वेळा नियमांचा आढावा, बदल, त्यात नव्याने भर घातली आहे. २०१७च्या ताज्या प्रतीची तिसरी आवृत्ती १ ऑक्टोबर २०२२ सालापासून म्हणजे अवघ्या वर्षभरापूर्वीपासून अंमलात आली आहे.

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
A woman is taking a selfie as she starts taking a selfie her phone
बापरे! तरुणी कारच्या विंडोबाहेर घेत होती सेल्फी; पुढच्याच क्षणी जे झालं…VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
Benefits of One Watermelon Can Diabetes Patient Eat Tarbooj
एका कलिंगडात दडलंय किती पोषण? डायबिटीस असो वा वजन कमी करण्याचं मिशन, किती व कसं खाल गोड कलिंगड?

क्रिकेट कसं खेळलं जावं, त्यासाठी कोणते नियम लागू असावेत, क्रिकेटच्या वेगवेगळ्या बाजू कोणत्या, त्यासाठी कोणते नियम कोणत्या परिस्थितीत लागू केले जावेत असा प्रकारच्या अनेक नियमांचा त्यात अंतर्भाव आहे. यातच २२व्या क्रमांकाचा नियम हा वाईड बॉल संदर्भातला आहे.

काय सांगतो वाईड बॉलसंदर्भातला नियम?

एमसीसीच्या कोडमध्ये वाईड बॉलसंदर्भात सविस्तर नियमावली देण्यात आली आहे. एखाद्या गोलंदाजानं टाकलेला चेंडू फलंदाजासाठी प्रचलित सामान्य क्रिकेटिंग शॉट्सचा वापर करून टोलवण्याच्याही पलीकडे असेल, तर तो वाईड बॉल ठरतो, अशी या बॉलची साधी सरळ सोपी व्याख्या या नियमावलीत नमूद करण्यात आली आहे. एकदा पंचाची यानुसार खात्री पटल्यावर पंच तो वाईड बॉल असल्याचा निर्णय देऊ शकतात. पण त्यासाठी चेंडू यष्ट्यांच्या पलीकडे गेल्यानंतरच पंचांना हा निर्णय देता येऊ शकेल.

वाईड बॉल दिल्यानंतर निर्णय फिरवता येतो का?

नियमानुसार, पंच वाईड बॉल दिल्यानंतरही निर्णय फिरवू शकतात. जर बॉलला बॅटचा किंवा फलंदाजाचा धक्का लागला असेल आणि ती बाब नंतर लक्षात आली तर पंच लगेच आपला निर्णय फिरवून तो बॉल वैध ठरवू शकतात. तसेच, वाईड दिलेला बॉल नो बॉल होता असं नंतर रिप्लेमध्ये लक्षात आल्यास तो निर्णय फिरवून तो नो बॉल ठरवला जातो.

फलंदाजाच्या हालचालींमुळे होणारा परिणाम

दरम्यान, एखादा चेंडू बॅटरच्या दोन्ही बाजूला आखण्यात आलेल्या रेषेच्या पलीकडून जाऊनही तो वाईड ठरवला जाऊ शकत नाही. जर बॅटर ठरवून चेंडूपासून लांब गेल्यामुळे चेंडू त्याच्या फटक्याच्या टप्प्यातून बाहेर गेला असल्यास किंवा चेंडूच्या दिशेनं फलंदाजही वाईड बॉल रेषेपर्यंत चेंडूच्या जवळ गेल्यास तो वाईड बॉल ठरू शकत नाही. तसेच, अशा परिस्थितीत जर चेंडू बॅटरला स्पर्शून गेल्यास तो वाईड बॉल ठरत नाही.

Ind vs Ban: विराटला वाईड बॉल न देण्याचा अम्पायरचा निर्णय योग्य होता की अयोग्य? चॅटजीपीटीनं सांगितला ‘हा’ नियम!

वाईड बॉलवर एखाद्या फलंदाजाला यष्टिरक्षकाच्या माध्यमातून यष्टिचीत करण्यात आल्यास तो किंवा ती फलंदाज जरी बाद ठरली, तरी वाईड बॉलची एक धाव फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात जमा होते. शिवाय वाईड बॉल कोणत्याही क्षेत्ररक्षकानं न अडवता थेट सीमारेषेच्या पलीकडे गेल्यास आणखी अतिरिक्त धावाही त्या संघाच्या खात्यात जमा होतात. या सर्व धावा वाईड म्हणूनच जमा केल्या जातात.

वाईड चेंडूवर बाद

वाईड चेंडूवर फलंदाज बाद होण्याबाबतही नियमांचा समावेश या नियमावलीत करण्यात आला आहे. त्यात हिट विकेट (फलंदाजाच्या धक्क्याने यष्टिचीत होणे), चेंडू अडवण्यात क्षेत्ररक्षकांना बाधा आणणे, धावचीत होणे आणि यष्टीरक्षकाकडून यष्टीचीत होणे अशा स्थितीत फलंदाजाला बाद ठरवलं जातं.

विराट कोहली प्रकरणात काय योग्य, काय अयोग्य?

दरम्यान, विराट कोहलीला पंचं रिचर्ड केटलबॉरो यांनी ४२व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर वाईड बॉल न दिल्यामुळे त्यासंदर्भातल्या नियमाची चाचपणी चालू झाली आहे. एमसीसीची वाईड बॉलसंदर्भातली नियमावली पाहाता त्यामध्ये अशा थेट प्रकरणाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, फलंदाजानं क्रीजमध्ये हालचाल केल्यामुळे हा चेंडू वाईड ठरवता आला नाही, हा नियम इथे पंच रिचर्ड यांनी लागू केल्याची शक्यता आहे. कारण चेंडू वाईड जात असल्याचं लक्षात येताच विराट कोहली काहीसा बाजूला झाला होता. त्या आधारावर पंच रिचर्ड केटलबॉरो यांनी हा बॉल वैध ठरवला असावा.

चॅटजीपीटीचं काय म्हणणंय?

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या चॅटजीपीटीकडून या प्रश्नावर आलेल्या उत्तराचा फोटो व्हायरल होत आहे. त्यानुसार, क्रिकेटमध्ये मुद्दाम टाकलेला वाईड बॉल वाईड दिला जाऊ शकत नाही. जर अम्पायरला असं वाटलं की बॅटरला फटका मारता येऊ नये, यासाठी वाईड बॉल मुद्दाम टाकण्यात आला आहे, तर तो अयोग्य प्रकार ठरतो आणि त्यासाठी अम्पायर बॉलिंग टीमला दंड करू शकतात. मग तो दंड धावांच्या स्वरूपात असू शकतो किंवा बॉलरची ओव्हर तिथेच थांबवण्याच्या स्वरूपात असू शकतो. मुद्दाम वाईड बॉल टाकणं हे क्रिकेटमधील न्याय्य खेळाच्या नियमांच्या विरोधात आहे, असं नमूद करण्यात आलेलं आहे. मात्र, यासंदर्भात कोणताही वैध आधार अद्याप समोर आलेला नाही.