लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रचार आणि रॅली यांचा धुरळा उडाला आहे. इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए असा सामना रंगला आहे. अशातच एका प्रचारसभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे भावनिक झाल्याचं पाहण्यास मिळालं.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?

“मी राजकारणातून संन्यास घेणार नाही. देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार. एखाद्या पदावरुन निवृत्ती घेतली जाऊ शकते. मात्र आपल्या तत्त्वांपासून आणि सिद्धांतापासून कधीही निवृत्ती घेऊ नये. भाजपा आणि संघाच्या विचारधारेचा पराभव करण्यासाठीच मी राजकारणात आलो.” असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

मतदान कुणालाही करा पण अंत्ययात्रेला..

“काँग्रेसच्या उमेदवाराला तुम्ही मत दिलं नाहीत तर मला वाटेल की कलबुर्गीत माझं काहीही स्थान राहिलेलं नाही. मी तुमचा विश्वास जिंकू शकलो नाही. मी तुम्हाला एक आवाहन करु इच्छितो की भले तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला मत द्या किंवा देऊ नका, मात्र तुम्हाला माझ्या अंत्यसंस्काराला यावं लागेल, त्यावेळी नक्की या.” असं म्हणत खरगे भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं. अफजलपूर येथील सभेत खरगे बोलत होते.

हे पण वाचा- “मोदींमध्ये जर हिंमत असेल, तर त्यांनी ‘हे’ करावं”, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं जाहीर आव्हान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेच्या २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र २०१९ मध्ये ते पराभूत झाले होते. कलबुर्गी हा त्यांचा जिल्हा आहे. त्यातील अफजलपूर या ठिकाणी रॅली दरम्यान बोलत असताना खरगे भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं. इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खरगेंचा विचार व्हावा अशी काही काँग्रेस नेत्यांची इच्छा होती. मात्र याबाबतचा प्रस्ताव हा अंतिम होऊ शकला नाही. आता खरगे काँग्रेसचा प्रचार करत आहेत. त्यांच्या भाषणादरम्यान ते भावनिक झाल्याचं पाहण्यास मिळालं.