Maharashtra Vidhan Sabha Exit Poll Updates: विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज (२० नोव्हेंबर) मतदान पार पडलं. आता या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार असल्यामुळे या निकालाकडे जनतेचं लक्ष लागलं आहे. राज्यात कोणाचं सरकार येणार? महाविकास आघाडीचं सरकार येणार की महायुतीचं सरकार येणार? हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र, याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, आज मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीला जास्त जागा मिळतील आणि महायुतीचं सरकार सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तसेच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता या एक्झिट पोलच्या अंदाजावर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजावर शिवसेना ठाकरे गटाची प्रतिक्रिया आली आहे. ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे की एक्झिट पोलचे सर्व्हे काहीही आले तरी महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा दानवे यांनी केला आहे.

हेही वाचा : Maharashtra Exit Poll 2024 : राज ठाकरे किंगमेकर ठरणार? काय आहे एक्झिट पोल्सचा अंदाज?

अंबादास दानवे काय म्हणाले?

एक्झिट पोलच्या अंदाजांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं की, “आम्ही काही एक्झिट पोल पाहिले आहेत आणि ऐकले आहेत. मात्र, ज्या प्रकारे आम्ही जमिनीशी जोडलेलो आहोत आणि आम्ही अनेक ठिकाणी पाहत आहोत. महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. एक्झिट पोल काहीही आले तरी लोकांनी महायुतीला हटवण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीचा सुपडा साफ होईल. आता सर्व्हे काहीही आले तरी महाविकास आघाडीचं सरकार येईल”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

भाजपाची प्रतिक्रिया काय?

एक्झिट पोलच्या अंदाजांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा-तेव्हा त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होतो. यावेळी देखील आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार मतदानाची आकडेवारी चांगल्या प्रकारे वाढली आहे. त्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला त्याचा नक्कीच फायदा होईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार गटाची प्रतिक्रिया काय?

एक्झिट पोलच्या अंदाजांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं की, “मी निवडणुकीच्या आधीच म्हटलं होतं की, लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील जनतेत मोठा बदल झालेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कांद्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात तापलं होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. मात्र, त्यानंतर पंतप्रधान मोदींची चर्चा केल्यानंतर त्यांनी कांद्यावरील निर्यातबंदी हटवली. त्यामुळे शेतकरी खूष झाले. त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना एका रुपयांत विमा दिला. आमच्या सरकारने राज्यातील लाडक्या बहि‍णींना योजनेच्या माध्यमातून मदत केली. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीवेळी विरोधकांनी भाजपावर संविधान बदलणार असल्याचा प्रचार केला होता. पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलाव आला. हेच कारण आहे की एग्झिट पोलच्या अंदाजांवर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होण्याचा अंदाज आहे. तसेच मला दखील पूर्ण विश्वास आहे की, महाराष्ट्रात १०० टक्के महायुतीचं सरकार स्थापन होईल”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.