लोकसभा निवडणुकीसाठी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदी महायुतीचे नेते उपस्थित होते. यावेळी सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासह राहुल गांधीवर हल्लाबोल केला. तसेच विखे पाटील यांची मुळं इतकी खोलवर आहेत की महाविकास आघाडीचे कुणीही आले तरी ते उखडू शकत नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी आघाडीवर केली.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी जमली म्हणजे सुजय विखेंचा विजय पक्का आहे. खरं म्हणजे विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचं बीज रोवलं आणि बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याचे वटवृक्ष केलं. आता ही परंपरा सुजय विखे पुढे चालवत आहेत. सुजय विखे हे या मतदारसंघातील प्रश्न ते संसदेत मांडतात. त्यामुळे येथील मतदारही सुशिक्षित उमेदवाराच्या मागे उभे राहतील. सुजय विखेंच्या नावातच जय असल्यामुळे त्यांचा पराजय होणं अशक्य आहे. आता आपल्याला फक्त त्यांचे लीड वाढवायचं आणि विरोधकांच्या ‘लंके’चं दहन करायचं आहे”, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर केली.

हेही वाचा : भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेनं भावना गवळी, हेमंत पाटलांचं तिकीट कापलं? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “मोदी गॅरंटीवर लोकांचा विश्वास आहे. बाकीच्या सर्व गॅरंटी फेल झाल्या आहेत. फक्त एकच गॅरंटी येथे चालती ती म्हणजे मोदी गॅरंटी. इंडिया आघाडीच्या इंजिनमध्ये माणसांना बसण्यासाठी डब्बे नाहीत. मात्र, नरेंद्र मोदींच्या इंजिनला डब्बेच डब्बे आहेत. त्यामुळे आता आपल्याला सुजय विखे यांना दिल्लीला पाठवायचे आहे. नरेंद्र मोदींच्या नखाची सरदेखील इंडिया आघाडीला येणार नाही”, असा टोला त्यांनी लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीवर निशाणा

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये नो लंके, येथे फक्त विखे. ड्रामा करुन लोक निवडून येत नाहीत. त्यासाठी काम करावं लागतं. लोकांच्या दु:खात सहभागी व्हावं लागतं. विखे पाटील परिवार किती वर्षांपासून येथे काम करत आहे. या ठिकाणी विखे पाटलांची मुळं इतकी खाली गेले आहेत की महाविकास आघाडीचं वरुन कुणी आलं तरी ते उखडू शकत नाहीत”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरच्या सभेतून महाविकास आघाडीवर केला.