लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचं मतदान १९ एप्रिलला होणार आहे. त्यासाठी विदर्भातील पाचही मतदारसंघात सर्व राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. दुसरीकडे एमआयएमनं मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार प्रचार सुरू केला आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकास्र सोडलं. पुढील महिन्यात १३ मे रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?

ओवैसींनी यावेळी बोलताना चंद्रकांत खैरेंवर टीका केली. “ते म्हणतात आम्ही हजारो कोटी घेतले. जरा तरी लाज वाटू द्या. तुम्ही भाजपामुळे निवडणूक जिंकून आलात. उद्या जर मोदी तुमच्याकडे बघून फक्त हसले, तरी तुम्ही औरंगाबाद विकायला तयार व्हाल. पण एक काम तर औरंगाबादकरांनी केलं. त्यांनी या माणसाला मुस्लिमांविषयी बोलायला भाग पाडलं. सगळे भाऊ-भाऊ आहेत असं बोलायला भाग पाडलं”, असं ओवैसी म्हणाले.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील लढतीवर भाष्य करताना ओवैसींनी सर्वच पक्षांवर खोचक टीका केली. “आता दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, एक भाजपा आणि अर्धी काँग्रेस असे साडेपाचजण इम्तियाज जलील यांच्याविरोधात लढायला आले आहेत”, असं ओवैसी म्हणाले.

“ही आग आपण शांत करू”

ठाकरे गटाला मिळालेल्या मशालीच्या चिन्हावरून असदुद्दीन ओवैसींनी टोला लगावला. “२० वर्षांपासून हे बोलत होते की खान पाहिजे की बाण. आता यांचं काय निवडणूक चिन्ह आहे? जास्त फेकाफेकी केली तर हेच होतं. प्रत्येक निवडणुकीत खान-बाण केलं, मग निसर्गही म्हणाला घ्या. सगळं निघून गेलं. यांच्या हाती मशाल आली. पण मशालीपासून सावध राहा. मशालीत आग आहे. या आगीला संपवायचं आहे. हे या आगीने घरं जाळू इच्छितात. ही आग आपण विझवणार आहोत”, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

ABP-Cvoter Survey: बारामतीमध्ये पुन्हा सुप्रिया सुळेच? Opinion Poll मध्ये अजित पवारांसाठी निराशाजनक अंदाज!

“तुमचा दी एंड झालाय”

दरम्यान, यावेळी ओवैसींनी चंद्रकांत खैरैंवरही खोचक टीका केली. “२० वर्षांपासून एका माणसाला औरंगाबादनं यशस्वी केलं. काय केलं त्यांनी? काहीच नाही. शिवीगाळ करत होते. अपमान करत होते. २०१८ ला काय झालं होतं मला माहिती आहे. कोण दंगली करण्याचा प्रयत्न करत होतं हे मला माहिती आहे. २० वर्षांत एखादं मूल तरुण होऊन लग्नही करेल. पण यांनी २० वर्षांत औरंगाबादला फक्त मागे नेलं. फक्त द्वेषाच्या गोष्टी केल्या. आज येऊन म्हणतात माझी शेवटची निवडणूक आहे. तुमची शेवटची निवडणूक २०१९ ला होती. तुमचा दी एंड झालेला आहे”, असं ओवैसी म्हणाले.