काही दिवसांपूर्वी नवी मुंबईमधील खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने १५ लोकांचा बळी घेतला. महाराष्ट्रात तरी एकाचवेळी उष्माघाताने एवढे मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असावी. देशभरात याआधीही उष्माघातामुळे अनेक मृत्यू झालेले आहेत. पण ज्या युरोपला आपण थंड प्रदेश समजतो, तिथेही उष्माघातामुळे काही हजार बळी गेले आहेत. ही बाब धक्कादायक आहे. गतवर्षी युरोपने असामान्य तापमानाचा सामना केला. काही देशांमध्ये विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली. ज्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये १५ हजार लोकांचा मृत्यू झाला, अशी धक्कादायक आकडेवारी जागतिक हवामान संस्थेने दि. २१ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या अहवालामधून समोर आली आहे. एखाद्या ऋतूमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

युरोपने मागच्या काही काळात अनेक उष्णतेच्या लाटांचा सामना केला. प्रत्येक वर्षी दर तीन महिन्यांनी एकदा उष्णतेची लाट आलेली आहे. २०२२ च्या उन्हाळ्यामध्ये स्पेनमध्ये जवळपास ४,६०० मृत्यू झाले आहेत. जर्मनीमध्ये ४,५००, युनायटेड किंग्डममध्ये २,८०० (६५ हून अधिक वय असलेले), फ्रान्समध्ये २,८०० आणि पोर्तुगालमध्ये १,००० मृत्यूंची नोंद करण्यात आली, अशी माहिती जागतिक हवामान संस्थेच्या वर्ष २०२२ च्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

Malaysia Military Helicopters Crash
मलेशियामध्ये दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेत भीषण धडक; १० जणांचा मृत्यू, घटनेचा व्हिडीओ समोर
due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?

हे वाचा >> विश्लेषण: युरोपच्या होरपळीमागील कारण काय? उष्णतेची ही लाट अभूतपूर्व कशी?

युरोपमध्ये २०२२ साली काय झाले?

युरोपमधील अनेक देशांमध्ये मागच्या वर्षी विक्रमी उच्च तापमानाची नोंद झाली. जर्मनीमधील हॅम्बर्गमध्ये देशातील सर्वाधिक ४० अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. स्वीडन हा थंड तापमानासाठी ओळखला जाणारा देशही या वेळी अधिक उष्ण होता. स्वीडनमध्ये मागच्या वर्षी ३७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. ‘ला नीना’चा प्रभाव कायम असूनही तापमान उच्च राहिल्याचे जागतिक हवामान विभागाने सांगितले आहे. ‘ला नीना’मुळे पृथ्वीचे तापमान थंड राहण्यास मदत होत असते.

२०२२ साली जगाचे सरासरी तापमान पूर्वऔद्योगिक काळापेक्षा १.५ अंश सेल्सियसने वाढलेले दिसले. १८५०-१९०० मधील तापमानाच्या नोंदीवर ही सरासरी काढण्यात आली आहे. जागतिक हवामान संस्थेने सध्या २०२२ सालचा तात्पुरता अहवाल दिला आहे. या अहवालात पूर्वऔद्योगिक काळातील सरासरी आणि आताची तापमानवाढ हाच धागा पकडण्यात आलेला आहे. २०२२ साल संपायला दोन महिने आसताना इजिप्तमध्ये हवामानबदल परिषदेत हा तात्पुरता अहवाल सादर करण्यात आला होता.

हे ही वाचा >> घेता घेता एक दिवस वसुंधरेचे ‘देणारे’ हात घ्यावेत..

मागील वर्षात काय स्थिती होती?

आतापर्यंत सर्वात उष्ण वर्ष म्हणून २०१६ ची नोंद करण्यात आली होती, ज्या वेळी पूर्वऔद्योगिक काळापेक्षा जगाचे सरासरी तापमान हे १.२८ अंश सेल्सियसने वाढलेले दिसले. हा आकडा १.५ अंश सेल्सियस तापमानवाढीच्या अगदी जवळ येऊन ठेपला, जो संपूर्ण जगाला नको होता. २०१५ ते २०२२ ही सलग आठ वर्षे मागच्या १७३ वर्षांमधील सर्वाधिक तापमानाची नोंद असलेली वर्षे म्हणून नोंदविली गेली आहेत. २०२२ सालाची नोंद आता, जगातील पाचवे किंवा सहावे सर्वात उष्ण वर्ष, अशी करण्यात आली आहे, असेही जागतिक हवामान संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

हे ही वाचा >> २०२० मधील हवामानातील बदलाचा भारताला ६५ हजार कोटींचा फटका

२०२१ या वर्षात जागतिक तापमानवाढीला तीन हरितगृह वायू- कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड यांचे वाढलेले प्रमाण कारणीभूत ठरले. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचा स्तर ४१५ पीपीएमच्या (पार्टिकल पर मिलियन) पलीकडे गेला आहे. काही वर्षांआधीच ४०० पीपीएमची पातळी ही धोकादायक मानली होती आणि या पातळीखाली कार्बन डायऑक्साईडचा स्तर राहावा यासाठी प्रयत्न केला जात होता. सध्या ही वाढ शक्य तितकी रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मिथनेचाही वातावरणातील स्तर वाढलेला आहे. मिथेन वायू देखील कार्बन डायऑक्साईडपेक्षा कमी धोकादायक नाही. २०२१ साली मिथेनचे प्रमाण १९०८ पीपीबी (पार्टिकल पर बिलियन) एवढे झाले आहे. २०२०-२१ मध्ये मिथेनमध्ये १८ पीपीबीची वाढ नोंदविण्यात आली. जी एका वर्षातील सर्वाधिक वाढ आहे, असेही जागतिक हवामान संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हवामानबदलांच्या परिणामामुळे जगभरातील ९५ दशलक्ष लोकांना याआधीच विस्थापित व्हावे लागले आहे, या गंभीर बाबीकडेही या अहवालाने लक्ष वेधले आहे. काही देशांमध्ये हवामानबदलांमुळे त्या त्या भागातील लोकांना त्याच देशात किंवा राज्यात इतरत्र विस्थापित व्हावे लागले आहे. तर काही ठिकाणी हवामानबदलांमुळे लोकांना नाइलाजाने आपला देश सोडून इतर देशांमध्ये आसरा शोधावा लागला, असेही अहवालात सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा >> कुतूहल : ‘एल निनो’ आणि ‘ला निना’

भारतात काय आहे परिस्थिती?

‘ला नीना’चा प्रभाव आता ओसरत आला असून त्याची जागा आता पूर्वानुमानानुसार ‘एल निनो’ काही महिन्यांमध्ये घेईल. त्यामुळे २०२३ हे वर्ष २०२२ पेक्षा अधिक उष्ण असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘एल निनो’मुळे उन्हाची तीव्रता वाढणार असून काही भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतात फेब्रुवारी महिन्यात थंडी अपेक्षित असते, मात्र या वर्षी फेब्रुवारी महिन्यातही उन्हाचे चटके बसत होते. मार्चनंतर एप्रिल आणि पुढील काही महिन्यांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने या वर्षी पावसाचे प्रमाण सामान्य असेल, असे सांगितले आहे. मात्र तरीही ‘एल निनो’च्या प्रभावामुळे कदाचित पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.