Covid 19 Cases india coronavirus : पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्ये चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या करोना विषाणूनं संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. या महामारीत लाखो भारतीयांना आपले प्राण गमावावे लागले. त्याशिवाय देशाला टाळेबंदीचा सामनाही करावा लागला. करोना विषाणू नेमका कशामुळे उद्भभवला या संदर्भातील तपास अद्यापही प्रलंबित आहे. यादरम्यान, भारतात पुन्हा एकदा करोना विषाणूनं डोकं वर काढलं आहे. करोनामुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या कमी असली तरी काही भागांमध्ये नव्यानं वाढलेल्या संसर्गाच्या लाटेमुळे प्रशासन अलर्ट झालं आहे. दरम्यान, भारतातील कोणकोणत्या राज्यांत करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत? करोनामुळे पुन्हा टाळेबंदीचा सामना करावा लागणार का? हे जाणून घेऊ…

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार हाँगकाँग व सिंगापूर यांसारख्या देशांमध्ये करोनानं बाधित झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सिंगापूरनं या विषाणूचा थेट संबंध JN.1 या व्हेरियंटशी असल्याचं म्हटलं आहे. भारतामध्येही मागील काही आठवड्यांत करोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार, देशात सध्या करोनाची २५७ सक्रिय प्रकरणं आहेत. मुंबई, चेन्नई व अहमदाबाद या शहरांमध्ये रुग्णसंख्येत किरकोळ; पण सातत्यपूर्ण वाढ होत आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासनाने निरीक्षण वाढवले आहे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत.

महाराष्ट्रात करोनाचे किती रुग्ण आढळले?

देशातील करोना विषाणूच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. राज्य आरोग्य विभागानुसार, मे महिन्यात एकट्या मुंबईत करोनाच्या ९५ नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. विशेष बाब म्हणजे संपूर्ण राज्यात जानेवारीपासून केवळ १०६ प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यापैकी ५२ रुग्णांना करोनाची सौम्य लक्षणं आहेत; तर १६ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही रुग्णांना परळ येथील केईएम आणि अंधेरी-मरोळ परिसरातील सेवन हिल्स या रुग्णालयांत हलविण्यात आलं आहे.

आणखी वाचा : Rainfall Pattern : उन्हाळ्यात पाऊस पडण्याचं प्रमाण का वाढलंय? नेमकी काय आहेत यामागची कारणं?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इन्फ्लुएन्झासारखी लक्षणे (ILI) किंवा गंभीर श्वसन संसर्ग (SARI) असलेल्या सर्व रुग्णांची आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे. राज्यात करोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागानं मंगळवारी जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. दोन्ही रुग्ण मुंबईतील असून, त्यामधील एक ५९ वर्षीय रुग्ण कर्करोगानं बाधित होता आणि तर दुसरी १४ वर्षीय मुलगी मूत्रपिंडाशी संबंधित आजारानं ग्रस्त होती. दोघांवरही आधीपासूनच रुग्णालयात उपचार सुरू होते.

पुण्यात करोनाची नेमकी काय परिस्थिती?

पुण्यात सध्या करोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. शासकीय रुग्णालयांत करोनाचा एकही सक्रिय रुग्ण नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापालिकेनं नायडू रुग्णालयात ५० खाटा राखीव ठेवल्या आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे म्हणाल्या, “शहरात मे महिन्यात फक्त एकच रुग्ण होता, जो आता पूर्णपणे बरा झाला आहे. सध्या महापालिकेच्या रुग्णालयांत करोना चाचण्या होत नसल्या तरी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल”.

तमिळनाडूमधील करोनाचे किती सक्रिय रुग्ण?

तमिळनाडूमध्येही करोना विषाणूने हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. पुडुचेरीत करोनाचे १२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. चेन्नईतील डॉक्टरांचे म्हणणं आहे की, हंगामी फ्लूमुळे बाधित झालेले रुग्ण करोना बाधित निघत आहेत. “दोन आठवड्यांपूर्वी आमच्या पॉझिटिव्ह नमुन्यांपैकी ६० टक्के नमुने इन्फ्लूएंझा ए किंवा बीमधील होते आणि आता ते करोनाबाधित निघत आहेत”, असे ग्लेनेगल्स हेल्थ सिटी रुग्णालयाचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. सुब्रह्मण्यम स्वामीनाथन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं. “तमिळनाडूची वैद्यकीय यंत्रणा कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहे. गरज भासल्यास करोनासंदर्भातील नियम जाहीर करू. आमची निरीक्षण यंत्रणा मजबूत आहे. नागरिकांनी शांत राहावं”, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

कर्नाटकमध्येही करोना विषाणूचे वाढताहेत रुग्ण

महाराष्ट्र राज्यापाठोपाठ कर्नाटकमध्येही करोना विषाणूच्या रुग्णांमध्ये किरकोळ वाढ झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी १६ सक्रिय रुग्णांची पुष्टी केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १२ मेनंतर राज्यात करोनाचे आठ नवीन रुग्ण आढळून आले आहेत; परंतु, डेक्कन हेराल्डच्या रिपोर्टनुसार, मे महिन्यात कर्नाटकमध्ये करोनाचे एकूण ३० रुग्ण सापडले आहेत. या सर्व रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे असून, कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासलेली नाही. सध्या काळजी करण्याची कोणतीही गरज नाही; मात्र प्रत्येकानं खबरदारी घ्यायला हवी, असं आरोग्य विभागानं सांगितलं आहे.

हेही वाचा : Pakistan Terrorists : कोण आहे आमिर हमजा? त्याच्यावर हल्ला कुणी केला? भारताच्या कट्टर शत्रूंना कोण संपवतंय?

गुजरातमध्ये करोनाचे किती रुग्ण आढळले?

गुजरातमध्येही करोना विषाणूने पुन्हा एकदा शिरकाव केला आहे. अहमदाबादमध्ये महिन्याभरानंतर करोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, अहमदाबादमध्ये एकाच दिवसात करोनाचे सात नवीन रुग्ण आढळून आले आहेत, ज्यामध्ये भोपाळ येथील एका १५ वर्षीय मुलगा, गोटा येथील एका दोन वर्षीय मुलीचा समावेश आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये नारोळ येथील २८ वर्षीय पुरुष, दानिलिमडा येथील ७२ वर्षीय महिला, बहरामपुरा येथील ३० वर्षीय पुरुष व नवरंगपुरा येथील ५४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. सर्व रुग्णांचे आपापल्या घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांचे नमुने नवीन व्हेरियंट तपासणीसाठी जीनोमिक सीक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनामुळे पुन्हा लॉकडाऊन लागणार का?

देशभरात करोना विषाणूचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पुन्हा टाळेबंदी लागू होणार अशा अफवांना ऊत आला आहे. मात्र, करोनाची परिस्थिती नियंत्रणात असून, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. फक्त प्रत्येकानं खबरदारी घ्यायला हवी. गर्दीच्या ठिकाणी गरज भासल्यास मास्कचा वापर करावा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. सध्या करोनाचा संसर्ग अत्यंत सौम्य प्रमाणात असल्याचं दिसून येत आहे. बाधित झालेल्या बहुतेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासलेली नाही. तरीही आरोग्य मंत्रालय सतर्क असून, परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी योग्य त्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.