-आसिफ बागवान

ॲपल आणि गुगल या तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्या. जागतिक बाजारपेठेत निर्विवाद वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने दोन्ही कंपन्यांत सतत स्पर्धा सुरू असते. यातून दोन्ही कंपन्यांतून विस्तवही जात नाही. मात्र, आता मेसेजच्या देवाणघेवाणीतून गुगल आणि ॲपल यांच्यात नवीन वाद पेटण्याची चिन्हे आहेत. ॲपलची मेसेज सेवा कालबाह्य असल्याची टीका करत गुगलने चक्क त्याविरोधात मोहीम छेडली आहे. यामागे नेमके कारण काय, त्यावर ॲपलची प्रतिक्रिया काय अशा प्रश्नांचा घेतलेला वेध…

गुगलचा ॲपलवर आरोप काय आहे?

गुगल आणि ॲपल यांच्या वादाच्या केंद्रस्थानी ‘शॉर्ट मेसेज सर्व्हिस’ अर्थात ‘एसएमएस’ सुविधा आहे. आयफोन वापरकर्ता आणि अँड्रॉइड फोन वापरकर्ता यांच्यातील मेसेज देवाणघेवाणीत अडथळे येत असून याला ॲपलची कालबाह्य यंत्रणा जबाबदार असल्याचा थेट आरोप गुगलने केला आहे. आयफोन आणि अँड्रॉइड वापरकर्त्यानी एकमेकांना पाठवलेल्या लघुसंदेशांमधील मजकूर तुटक येणे, व्हिडिओ धूसर येणे, ग्रूप चॅट अचानक बंद पडणे, ‘पोचपावती’(रीड रीसिट) न मिळणे असे प्रकार नेहमीच घडत असल्याचा गुगलचा आरोप आहे. ॲपल एसएमएससाठी कालबाह्य यंत्रणा वापरत असल्याने असे घडत असल्याचेही गुगलने म्हटले आहे.

आयफोन, अँड्रॉइड मेसेजमध्ये फरक काय?

आयफोनमधून मेसेजच्या देवाणघेवाणीचे काम ’आयमेसेज’ (iMessage) मार्फत होते तर, अँड्रॉइड फोनमध्ये मेसेजिंगसाठी ‘आरसीएस’ यंत्रणेचा वापर करतात. ‘रिच कम्युनिकेशन सर्व्हिसेस’ अर्थात ‘आरसीएस’ ही अद्ययावत मेसेज यंत्रणा असून इतर चॅटिंग ॲपप्रमाणे तिचे बहुतांश कार्य चालते. यामध्ये इमोजी, व्हिडिओ पाठवणे या गोष्टी झटपट करता येतात. शिवाय वायफायद्वारेही मेसेज पाठवता येतात.

‘आयमेसेज’ची यंत्रणा जुन्या पद्धतीनुसार एसएमएस आणि एमएमएस यांच्या देवाणघेवाणीनुसारच काम करते. यातून उच्च दर्जाचे व्हिडिओ, ऑडिओ पाठवण्याची व्यवस्था नाही. यालाच गुगलने आक्षेप घेतला आहे. ‘आयमेसेज’मुळे अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्त्यांमधील संदेशांची देवाणघेवाण अद्ययावतपणे होत नाही, असे गुगलचे म्हणणे आहे.

‘ॲपल’ यंत्रणा अद्ययावत का करत नाही?

ॲपल ही खरे तर अद्ययावत तंत्रज्ञानाचा तातडीने अवलंब करणारी कंपनी आहे. मात्र, ‘आयमेसेज’च्या बाबतीत कंपनीने जाणीवपूर्वक जुने धोरण अवलंबले आहे. ‘आयमेसेज’ची यंत्रणा २०११ साली कार्यान्वित करण्यात आली. ॲपलच्या आयपॅड, आयफोन, मॅक या सर्व उपकरणांवर ती कार्यरत आहे. ॲपलच्या सर्वच उत्पादनांमध्ये ग्राहकांची सुरक्षितता आणि गोपनीयता यांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात येते. ‘आयमेसेज’ची रचनाही त्या पद्धतीनेच केली गेली आहे. ‘आयमेसेज’ आयफोनची सुरक्षित तटबंदी कायम ठेवून वापरकर्त्यांत संदेशांची देवाणघेवाण घडवून आणते. त्यामुळे ती जुनाट असली तरी, ती भक्कम असल्यामुळे ॲपलने ती कायम ठेवली आहे. ‘आरसीएस’ सारख्या यंत्रणेशी आपली मेसेज यंत्रणा संलग्न करायची म्हणजे, एकाप्रकारे अँड्रॉइड यंत्रणेला आपल्या आयओएस यंत्रणेत शिरू देण्यासारखे होईल, अशी ॲपलची भूमिका आहे. त्यामुळे ॲपल ‘आरसीएस’चा अवलंब करत नाही.

गुगलच्या विरोधामागचे खरे कारण काय?

‘वापरकर्त्यांना होणारा त्रास’ या कारणावरून गुगल ॲपलवर टीका करत आहे. मात्र, या विरोधामागचे खरे कारण वरील परिच्छेदाचा पुढचा भाग आहे. ॲपलच्या आयफोनची सर्वात भक्कम बाजू काय असेल तर, त्यांची सुरक्षितता, अभेद्यपणा. गुगलच्या अँड्रॉइड स्मार्टफोनना कितीही केले तरी, हा अभेद्यपणा साधता येणार नाही. याचे कारण अँड्रॉइड ही यंत्रणाच मुळी मुक्त तंत्रज्ञानावर बेतलेली आहे. ‘आरसीएस’ हादेखील अशाच खुल्या तंत्रज्ञानाचा भाग आहे. ॲपलने ‘आरसीएस’सारख्या तंत्रज्ञानाचा मेसेजिंगकरिता वापर केल्यास आयफोनचे प्रमुख वैशिष्ट्यच गळून पडेल. हेच गुगलला हवे आहे.

ॲपलपर्यंत मेसेज पोहोचवण्यासाठी थेट मोहीम?

ॲपलने ‘आरसीएस’चा अवलंब करावा, यासाठी गुगलने याआधी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, ॲपलने त्याला दाद दिली नाही. म्हणूनच गुगलने आता ‘ गेट द मेसेज’ (#GetTheMessage) ही मोहीम छेडली आहे. या मोहिमेत गुगलने केवळ आपल्या वापरकर्त्यांनाच नव्हे तर जगभरातील ‘सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर’नाही कामाला लावले आहे. मात्र, ॲपलने अद्याप तरी त्यावर कोणतीही  प्रतिक्रिया दिलेली नाही.