पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय सैन्यदलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू व काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली गेली. यात पाकिस्तानी लष्करी तळांचा समावेश नसल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दहशतवादी तळांना लक्ष्य करण्याची ही मर्यादित स्वरूपाची लष्करी कारवाई होती. यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यान नव्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविली जाते. यानिमित्त दोन देशांमधील आजवरच्या युद्धांचा हा आढावा.

१९४७ – काश्मीरचे पहिले युद्ध

ब्रिटीशांच्या अधिपत्याखालील भारताचे हिंदुबहुल भारत आणि मुस्लीमबहुल पाकिस्तानमध्ये विभाजन झाल्यानंतर काही महिन्यांत उभय तरुण राष्ट्रांमध्ये १९४७ मध्ये जम्मू-काश्मीर संस्थानासाठी पहिले युद्ध झाले. काश्मीर नरेशांनी कुठे सामील व्हायचे, याचा निर्णय घेतलेला नव्हता. याच काळात काश्मीरवर ताबा मिळविण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीर संस्थानच्या काही सैन्याला फितूर करून काश्मीरमध्ये घुसखोरी केली. पाकिस्तानचे मनसुबे लक्षात घेऊन काश्मीरचे महाराजा हरीसिंह यांनी भारतात सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये पूर्ण युद्ध झाले. युद्धात निर्णायक विजय मिळाला नाही. मात्र भारताने काश्मीरचा दोन तृतीयांश भाग आपल्या ताब्यात घेतला तर, पाकिस्तानने सुमारे एक तृतीयांश प्रदेश बळकावला. १९४८ मध्ये युद्ध संपण्यापूर्वी हजारो लोक मारले गेले.

१९६५ – पहिले मोठे युद्ध

पाकिस्तानी सैन्यदलांनी जम्मू-काश्मीर ताब्यात घेण्यासाठी चालवलेल्या ऑपरेशन जिब्राल्टर मोहिमेची परिणती १९६५ च्या युद्धात झाली. जिब्राल्टर बंदरातून स्पेनवरील आक्रमणाशी तुलना करण्यासाठी या मोहिमेला जिब्राल्टर असे सांकेतिक नाव देण्यात आले. परंतु, पाकिस्तानी शासक आयुबखान यांची ही योजना फसली. भारतीय सैन्यदले पूर्ण क्षमतेने मैदानात उतरली. १७ दिवस संघर्ष सुरू ठेवला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात रणगाडे आणि चिलखती वाहनांचा वापर झाला. सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्या मध्यस्तीने हे युद्ध संपले. तोपर्यंत पाकिस्तानला ४०० रणगाडे गमवावे लागले. हजारो लोक मारले गेले. ताश्कंदमधील वाटाघाटी जानेवारी १९६६ पर्यंत सुरू होत्या. दोन्ही सैन्यांनी युद्धादरम्यान ताब्यात घेतलेले प्रदेश परत केले. सैन्यही मागे घेतले.

१९७१ – पाकिस्तानचा मानहानिकारक पराभव

भारतीय सैन्याने लढलेले अद्वितीय युद्ध म्हणून १९७१ चे युद्ध गणले जाते. लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या युद्धात भारताने निर्णायक विजय मिळवत सभोवतालचा भूगोल बदलला. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्या संघर्षाची परिणती या युद्धात झाली. भारतीय हवाई दलाच्या तळांवर पाकिस्तानकडून हल्ले झाले. भारतीय सैन्याने अवघ्या १८ दिवसांत ढाकापर्यंत वर्चस्व प्रस्थापित केले. ९३ हजार पाकिस्तानी सैनिक आणि त्यांच्या जनरलना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वाधिक युद्धकैदी सापडलेले हे युद्ध ठरले. या युद्धामुळे पाकिस्तानचे विभाजन होऊन बांगलादेशची निर्मिती झाली. युद्धविरामाच्या विरोधात असणाऱ्या जनरल याह्या खानला राजीनामा द्यावा लागला. पुढील काळात वाटाघाटीनंतर भारत-पाकिस्तानमध्ये सिमला करारावर स्वाक्षरी झाली.

१९८४ – सियाचिनवर स्वारी

जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर भारत-पाकिस्तान दरम्यान झालेला हा पहिलाच संघर्ष आहे. जो सियाचिन संघर्ष म्हणून ओळखला जातो. पाकिस्तानी लष्कराने काश्मीरमधील सियाचिन हिमनदीवर ताबा मिळविण्याची तयारी चालविली होती. याचा सुगावा लागताच भारतीय सशस्त्र दलांनी फारशी पूर्वतयारी नसताना, उबदार कपडे, शस्त्रास्त्रे व निवास व्यवस्थेचा अभाव असताना मेघदूत मोहिमेद्वारे सियाचिनवर ताबा मिळवला. पाकव्याप्त काश्मीरला हा प्रदेश चीनशी थेट जोडण्यापासून प्रतिबंधित करतो. भारतासाठी सामरिकदृष्ट्या हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. या संघर्षानंतर सियाचिन भागात कायमस्वरूपी सैन्य तैनात करीत पाकिस्तानी घुसखोरीला लगाम घालण्याची सज्जता ठेवण्यात आली.

१९९९ – ऑपरेशन विजय

पाकिस्तानी सैन्याने १९९९ मध्ये द्रास, कारगिल, टोलोलिंग, टायगर हिल, मश्कोह खोऱ्यात घुसखोरी केल्यानंतर त्यांना पिटाळून लावण्यासाठी भारतीय सैन्याने १९९९ मध्ये ऑपरेशन विजयद्वारे कारवाईला सुरुवात केली. तोफखाना आणि रॉकेट्सच्या अग्निवर्षावाने तोफखाना दलाने पाकिस्तानी घुसखोरांची तटबंदी उद्ध्वस्त केली. या युद्धात तब्बल सव्वा लाख तोफगोळे, हजारो रॉकेट्स डागली गेले. भारतीय हवाई दलाने सफेद सागर मोहिमेद्वारे घुसखोरांची ठिकाणे भेदली, रसद पुरवठा तोडला, कारगिल संघर्ष जवळपास अडीच महिने चालला. दोन ते अडीच महिन्यांत भारताने आपल्या प्रदेशावर पुन्हा ताबा मिळवला. या युद्धात हवाई दलाच्या हेलिकॉप्टर, मालवाहू विमाने व लढाऊ विमानांनी ७६३१ वेळा उड्डाण केले. मर्यादित युद्धात हवाई शक्तीच्या वापराने मोहीम कमी काळात निर्णायक अवस्थेत पोहोचली.