Israel Iran conflict: इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता एका नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेला (Middle East) अस्थिरतेचा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी पहाटे इस्रायली हवाई दलाने तेहरान आणि इराणमधील विविध लष्करी आणि आण्विक तळांवर हवाई हल्ले केले. या कारवाईनंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ या लष्करी मोहिमेची औपचारिक घोषणा केली. या कारवाईत इराणच्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञ मारले गेल्याचे वृत्त समोर आले आहे.

या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने रात्रीच इस्रायलच्या जेरुसलेम, तेल अवीवसह अनेक शहरांवर १५० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमध्ये थेट लष्करी संघर्ष सुरू झाला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘पर्शियन साम्राज्यापासून इस्लामिक रिपब्लिकपर्यंत’ इराणच्या राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रवासाचा मागोवा घेणं अत्यावश्यक ठरतं.

इराणचा २५०० वर्षांहून अधिक काळाचा राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहास अत्यंत समृद्ध व गुंतागुंतीचा आहे. प्राचीन पर्शियन साम्राज्यापासून ते आधुनिक इराणपर्यंत या भूमीने सत्ता-संघर्ष, धार्मिक क्रांती आणि या देशाची सतत बदलती ओळख अनुभवली आहे. जागतिक इतिहासाच्या पटलावर इराणची भूमिका केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक प्रभावाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाची ठरते. झारथुस्त्राच्या उपदेशांपासून इस्लामिक क्रांतीपर्यंत आणि आधुनिक युरोपीय वसाहतवादाविरोधी संघर्षांपासून ते आजच्या जागतिक भू-राजकीय महत्त्वापर्यंत इराण हा एक सक्रिय आणि परिवर्तनशील देश ठरलेला आहे. म्हणूनच आजच्या बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या इतिहासाचा आढावा घेणं महत्त्वाचं ठरतं.

तत्त्वतः एखाद्या प्रदेशाच्या मानवी इतिहासाची सुरुवात ही अश्मयुगीन कालखंडापासूनच होते. असं असलं तरी साम्राज्याची स्थापना त्या भूभागाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार हे ठरतं. म्हणूनच पर्शियाच्या (इराणच्या) इतिहासात डोकावून पाहताना ३००० वर्ष मागे जावं लागत. इसवी सनपूर्व ५ व्या शतकातील अकेमीनेड या पर्शियन साम्राज्याने (इ.पू. ५५०–३३०) भविष्यातील इराणचा पाया रचला. या साम्राज्याची स्थापना सायरस द ग्रेट (Cyrus the Great) याने केली.

सायरस द ग्रेट हा पर्शियाच्या इतिहासातील सर्वात पराक्रमी राजा होता. त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार पश्चिम आशिया ते इजिप्त व भारताच्या सीमेपर्यंत केला. त्यामुळेच भारताच्या तत्कालीन इतिहासावर अकेमीनेड साम्राज्याचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. या साम्राज्याच्या प्रशासकीय यशामागे असलेल्या ‘सत्रप प्रणाली’मुळेच भारतात राज्य करणारे इंडो सिथियन राजे क्षत्रप म्हणून ओळखले गेले. सायरस हा त्याच्या समानतेच्या धोरणांसाठी ओळखला जात होता. त्याच्या सायरस सिलिंडर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिलेखामध्ये त्याने धार्मिक स्वातंत्र्य, गुलामांना मुक्त करण्याचे आदेश आणि सांस्कृतिक विविधतेचा सन्मान यांसारख्या मूल्यांना प्राधान्य दिले आहे. याच काळात पर्शियात Zoroaster धर्म प्रबळ झाला. ‘अहुरा मझ्दा’ या एकेश्वराच्या उपासनेवर आधारित या धर्मात नैतिकता, सत्कर्म आणि सत्य यांना सर्वोच्च स्थान होते. या धर्माचा अकेमीनेड शासन व्यवस्थेवर पगडा होता.

हेलेनिस्टिक व पार्थियन काळ (३३० इ.पू.–इ.स. २२४ )

परंतु,इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांडरच्या इराणवरील आक्रमणाने अकेमीनेड साम्राज्याचा अस्त झाला आणि पर्शियात ग्रीकांचे सांस्कृतिक पर्व सुरू झाले. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सेल्यूसिड साम्राज्य स्थापन झाले. या ग्रीक वंशाच्या राजसत्तेने इराणमध्ये प्रशासन आणि शहरी स्थापत्यरचनेवर आपला ठसा उमटवला.

इ.स.पू. २४७ साली पर्शियन वंशाच्या अर्सासेस (Arsaces) याने सेल्यूसिड सत्तेविरुद्ध उठाव करून पार्थियन साम्राज्याची स्थापना केली. पार्थियन राजे रोमन साम्राज्याशी सतत संघर्ष करत होते. ही संघर्षाची स्थिती काही वेळा युद्धामध्ये तर काहीवेळा राजनैतिक तडजोडीत परिवर्तित झाली. तरीही पार्थियन राजे ग्रीक-रोमन प्रभावाखाली न झुकता पर्शियन ओळख जपण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे ग्रीकांच्या प्रभावाखाली काहीशा झाकोळलेल्या Zoroaster धर्माचे पुनरुज्जीवन झाले आणि पर्शियन भाषा, वेशभूषा व स्थापत्यशास्त्रात स्थानिक घटकांना पुन्हा स्थान मिळाले. हेलेनिस्टिक प्रभाव असतानाही इराणची सांस्कृतिक व धार्मिक ओळख कायम ठेवण्याचा पार्थियन प्रयत्न इतिहासात महत्त्वाचा ठरतो.

ससेनियन साम्राज्य (इ.स. २२४–६५१)

इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात ससेनियन साम्राज्य हे पार्थियन साम्राज्यानंतर उभे राहिलेले एक अत्यंत प्रभावी पर्शियन साम्राज्य होते. अर्दाशीर पहिला याने पार्थियन सत्तेला उलथवून लावले आणि ससेनियन या नव्या राजवंशाची स्थापना केली. या कालखंडातही Zoroaster धर्माला राजश्रय मिळाला. धर्म आणि राजसत्ता यांची सांगड याच काळात घालण्यात आली. या साम्राज्याने रेशीम मार्गावर नियंत्रण ठेवले आणि चीन ते रोमन साम्राज्या दरम्यान महत्त्वाची व्यापारी भूमिका बजावली. सैन्यशक्तीच्या जोरावर त्यांनी बायझंटाईन साम्राज्याविरुद्ध अनेक युद्धांमध्ये अटीतटीचा सामना केला. परंतु सातव्या शतकात अरब मुस्लीम आक्रमकांच्या आघातांमुळे ससेनियन साम्राज्याचे पतन झाले. याच बरोबर पर्शियातील Zoroaster धर्माचे प्रभावशाली स्थानही ढासळले आणि इराणमध्ये इस्लामचा प्रसार सुरू झाला.

इस्लामिक विजय आणि खलिफत काळ (६५१–१०५५)

इ.स. ७ व्या शतकात अरब मुस्लिमांनी इराणवर आक्रमण करून ते जिंकले आणि त्यामुळे ससेनियन साम्राज्याचा अस्त झाला. या विजयामुळे इराणमध्ये इस्लामचा प्रवेश झाला आणि त्याचा सांस्कृतिक इतिहास कायमचा बदलला. त्या वेळी रशीदून खलिफतकडे अरब सेनेचे नेतृत्व होते. दुसरीकडे, ससेनियन साम्राज्य आधीच बायझंटाईन साम्राज्याशी झालेल्या दीर्घ युद्ध, अंतर्गत संघर्ष आणि आर्थिक संकटांमुळे कमकुवत झाले होते. इ.स. ६३६ मध्ये झालेल्या कादसिया युद्धात, अरब सेनेने ससेनियन सेनापती रोस्तम फर्रुखझाद याचा पराभव केला आणि त्यानंतर राजधानी तेसिफोन (Ctesiphon) जिंकली. त्यानंतर ६४२ मध्ये नहावंदच्या युद्धात ससेनियन सेनेचा पूर्ण पराभव झाला. शेवटचा ससेनियन सम्राट यज्देगर्द तृतीय पळून गेला आणि अखेरीस इ.स. ६५१ मध्ये मारला गेला. यानंतर इराणमध्ये इस्लामी सत्तेने कायमची आपली पाळेमुळे रोवली.

असे असले तरी नव्या इस्लामिक सत्ता-संस्थेमध्ये पर्शियन संस्कृती, भाषा आणि प्रशासकीय प्रणालीने आपले स्थान टिकून ठेवले होते. अब्बासी खलिफतच्या काळात (इ.स. ७५०–१२५८) बगदाद हे इस्लामी जगाचे ज्ञानकेंद्र ठरले होते आणि यामध्ये पर्शियन विद्वानांचा मोठा वाटा होता. अविसेना (Avicenna-Ibn Sina) याच्या तत्त्वज्ञान, वैद्यकशास्त्र आणि विज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा प्रभाव संपूर्ण युरोपवर पडला. अब्बासी राजवटीखाली फारसी भाषा, साहित्य आणि प्रशासन यांचे अस्तित्व फक्त टिकून राहिले नाही, तर त्यांचा विकास झाला. अनेक पर्शियन प्रशासनिक पद्धती आणि शिष्टाचारांचा खलिफतने स्वीकार केला. त्यामुळेच या कालखंडाला ‘इस्लामीकरणाबरोबरच पर्शियन पुनरुत्थान’ असेही संबोधले जाते. सामाजिकदृष्ट्या, पर्शियन लोकांनी नव्या इस्लामिक ओळखीचा स्वीकार करत असतानाही, त्यांनी आपल्या सांस्कृतिक मुळाशी असलेली नाळ जपून ठेवली. हीच संतुलनाची प्रक्रिया पुढील शतकांमध्ये इराणच्या घडणीत निर्णायक ठरली.

 सेल्जुक ते सफविद काळ (१०५५–१५०१)

११ व्या शतकाच्या मध्यापासून तुर्कवंशीय सेल्जुक राजवंशाने इराणमध्ये सत्ता स्थापन केली. राजे तुर्क होते, पण त्यांनी फारसी भाषा, साहित्य आणि शिष्टाचार यांचा स्वीकार केला. यामुळे पर्शियन सांस्कृतिक परंपरेला नवे बळ मिळाले. या काळात फारसी काव्य, विशेषतः फिरदौसी, उमर खय्याम, हाफिज यांसारख्या कवींमुळे साहित्यिक पुनरुज्जीवन घडले. प्रशासन, न्याय आणि राज्यकारभारात फारसी भाषेचा वापर वाढला. इस्लामी सत्ता असूनही, प्रशासनिक व्यवहार आणि सांस्कृतिक वारसा फारसीच राहिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच काळात शिया आणि सुन्नी पंथांमध्ये वैचारिक आणि राजकीय मतभेद अधिक स्पष्टपणे समोर येऊ लागले. सेल्जुक साम्राज्याच्या कारकिर्दीत सुन्नी इस्लाम प्रभावशाली होता, तरी इराणच्या काही भागांमध्ये शिया विचारसरणी हळूहळू मुळं रोवू लागली होती. या वाढत्या तणावाचा परिपाक पुढे सफविद साम्राज्याच्या स्थापनेत झाला, जिथे शिया इस्लामला अधिकृत धर्माचा दर्जा मिळाला. इराण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होत असतानाच, या काळात धार्मिक आणि राजकीय संघर्षांची बीजे रुजली, जी पुढील शतकांतील घटनांना निर्णायक स्वरूप देणारी ठरली.