मंगल हनवते

मुंबई आणि मुंबईकरांना वाहतूक व्यवस्थेचा अत्याधुनिक आणि अतिवेगवान पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मेट्रोची संकल्पना पुढे आली. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे निर्माण करत आहे. कुल्याब्यापासून विरारपर्यंत, सीएसटीपासून बदलापूर, तळोजापर्यंत मेट्रो धावणार आहे. असे असताना आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नायगाव-अलिबाग मेट्रो मार्गिकेच्या व्यवहार्यता अभ्यासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत नायगाव-अलिबाग दरम्यान मेट्रो धावणार आहे. या पार्श्वभूमीवर हा मेट्रो प्रकल्प आहे तरी कसा याबाबत घेतलेला हा आढावा…

developer, parking, Maharera,
पार्किंगबाबत विकासकाने माहिती देणे बंधनकारक! महारेराकडून नवे आदेश
Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
way of dharavi redevelopment is cleared railway land finally transferred to DRP
धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, रेल्वेची २५.५७ एकर जमीन अखेर ‘डीआरपी’कडे हस्तांतरित
bandra worli sea link marathi news,
आजपासून वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील प्रवास महागणार, नवीन पथकर दर लागू

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका एमएसआरडीसीकडे

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीएने विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका बांधण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएने २००८ मध्ये केलेल्या सर्वंकष वाहतूक अभ्यासात या मार्गाची शिफारस करण्यात आली होती. एमएमआरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा पर्याय सुचविण्यात आला होता. मात्र १२८ किमी लांबीची ही मार्गिका बांधण्यासाठी एमएमआरडीएने कोणतीही पावले उचलली नाहीत. अनेक वर्षे हा प्रकल्प कागदावरच राहिला. अखेर राज्य सरकारने १९ ऑगस्ट २०२० मध्ये हा प्रकल्प एमएमआरडीएकडून एमएसआरडीसीकडे वर्ग केला. हा प्रकल्प वर्ग झाल्यानंतर एमएसआरडीसीने तो मार्गी लावण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली.

हेही वाचा >>> कतारने ज्या भारतीयांना सुनावली होती फाशीची शिक्षा, त्यांचीच केली सुटका; नेमकं प्रकरण काय?

बहुउद्देशीय मार्गिका नेमकी आहे तरी कशी?

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका १२८ किमी लांबीची आहे. ही मार्गिका पालघर, ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांमधील वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण आणि पेण या सात तालुक्यांतील एकूण १०४ गावांमधून जाणार आहे. ही मार्गिका जेएनपीए आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडली जाणार आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ०८, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ८४८, कल्याण-मुरबाड-निर्मळ राष्ट्रीय महामार्ग ६१, तळोजा बायपास, मुंबई-बडोदे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ४८, पनवेल-उरण राष्ट्रीय महामार्ग ०४, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६, आणि समृद्धी महामार्ग या महत्त्वाच्या रस्त्यांना, महामार्गांना जोडणार आहे. ही मार्गिका काही ठिकाणी चार पदरी, तर काही ठिकाणी सहा पदरी असणार आहे. तर या मार्गिकेत नऊ आंतरबदल मार्ग असणार आहेत. या मार्गिकेचे नवघर ते बळवली आणि बळवली ते अलिबाग अशा दोन टप्प्यांत काम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ११ पॅकेजमध्ये हे काम केले जाणार आहे. तसेच भूसंपादनही अंतिम टप्प्यात असून येत्या काही महिन्यातच मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

मार्गिकेत मेट्रोची तरतूद?

विरार-अलिबाग ही बहुउद्देशीय मार्गिका असल्याने साहजिकच त्यात मेट्रोचीही तरतूद करण्यात आली आहे. १२८ किमी लांबीच्या या मार्गिकेत ९९मी/१२६ मीटरच्या रुंदीपैकी २६.६० मीटर रुंदीची जागा मेट्रोसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. बहुउद्देशीय मार्गिकेवरील मेट्रो मार्गिका भिवंडीतील खारगाव आणि पेणमधील बळवली दरम्यान प्रस्तावित करण्यात आली आहे. आतापर्यंत ही मेट्रो केवळ प्रस्तावित होती, ही मेट्रो होणार का वा केव्हा होणार यावर कोणताही निर्णय झालेला नाही किंवा त्या दृष्टीने आतापर्यंत कोणतीही पावले उचलली गेलेली नव्हती. मार्गिकेत केवळ मेट्रोसाठी निश्चित अशी जागा राखीव ठेवण्यात येणार होती. त्यामुळे भविष्यात कधी तरी कोणती तरी सरकारी यंत्रणा ही मेट्रो उभारेल अशी शक्यता होती. यासाठी किती वर्षे वाट पाहावी लागेल हाही प्रश्न होता. पण आता मात्र बहुउद्देशीय मार्गिकेवरील मेट्रो मार्गिका प्रत्यक्षात साकारण्यात येणार आहे. अगदी बहुउद्देशीय मार्गिकेच्या पाठोपाठ या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू होण्याची शक्यता आता आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : पाकिस्तानमधील निवडणूक निकालाचा भारताशी संबंधांवर काय परिणाम?

बहुउद्देशीय मार्गिकेवरील मेट्रो मार्गिकेची व्यवहार्यता तपासणी सुरू?

बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामाला येत्या काही महिन्यात सुरुवात होणार असतानाच आता मेट्रो मार्गिकाही मार्गी लागणार आहे. राज्य सरकारने बहुउद्देशीय मार्गिकेवरील मेट्रो मार्गिका मार्गी लावण्याच्या दृष्टीने ठोस पावले उलचण्याचे निर्देश एमएसआरडीसीला दिले होते. त्यानुसार एमएसआरडीसीने मे. मोनार्च सर्व्हेअर अँड इंजिनीयरिंग कन्सल्टंट या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून मेट्रो मार्गिकेच्या व्यवहार्यता तपासणीला सुरुवात केली आहे. पुढील सहा महिन्यांत व्यवहार्यता अभ्यास पूर्ण होणार आहे. त्यानंतर या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा प्रकल्प नेमका कोण राबवणार हे अद्याप ठरलेले नसून याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. असे असले तरी यासाठी एमएसआरडीसी उत्सुक असल्याचे समजते. त्यामुळे ही मेट्रो मार्गिका एमएसआरडीसीने बांधल्यास आश्चर्य वाटायला नको.

नायगाव-अलिबाग अशी धावणार मेट्रो?

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेवरील प्रस्तावित मेट्रो मार्गिकेनुसार भिवंडीतील खारगाव येथून मेट्रो मार्गिका सुरू होणार होती. तर पेणमधील बळवली येथे ही मार्गिका संपणार होती. पण आता मात्र एमएसआरडीसीने वसई तालुक्यातील नायगाव पश्चिम रेल्वे स्थानक येथून मेट्रो सुरू करून ती थेट अलिबागला नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नायगाव-अलिबाग मेट्रोची व्यवहार्यता तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, ही मेट्रो मार्गिका आता १३६ किमी लांबीची असणार आहे. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास सर्वाधिक लांब मेट्रो मार्गिका ठरणार आहे. या मार्गिकेत ४० मेट्रो स्थानके सध्या प्रस्तावित असून यात वाढ होण्याची शक्यता आहे. ही मेट्रो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीएला मेट्रो स्थानकाद्वारे जोडण्यात येणार आहे. या मेट्रोमुळे प्रवाशांना, पर्यटकांना काही मिनिटांत मेट्रोने अलिबागला जाता येणार आहे. त्यामुळे ही मार्गिका महत्त्वाची मानली जात आहे. मात्र यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. व्यवहार्यता अभ्यास, आराखडा, आवश्यक ती मंजुरी आणि त्यानंतरची पुढील सर्व काही कार्यवाही पूर्ण करून मेट्रो सेवेत दाखल होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. पण असे असले तरी आता मेट्रो अलिबागपर्यंत पोहचणार हे मात्र नक्की.