Monsoon Slow Down Reason : दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात मोसमी वाऱ्यांचे आगमन १३ दिवस आधीच झाले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर वाढत असल्याचं पाहून शेतकऱ्यांनीही खरीप हंगामातील मशागतीची कामे आटोपती घेतली. मात्र, गेल्या आठवड्यापासून मुंबई व आजूबाजूच्या परिसरात पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, जून महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांत सांताक्रूझ वेधशाळेत केवळ ९.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर कुलाबा वेधशाळेत फक्त ८.२ मिमी पावसाची नोंद झाली. दरवर्षी जूनमध्ये पडणाऱ्या पावसापेक्षा ही नोंद सरासरी १० मिमीने कमी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मुंबईत पावसाचा जोर का ओसरला? त्यामागची नेमकी कारणं काय? हे जाणून घेऊ…
दरवर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात काही दिवस पडणारा वळवाचा पाऊस यावर्षी अजिबात पडणार नाही, अशी निरीक्षणे सुरुवातीला नोंदविण्यात आली होती. मात्र, यंदा मेच्या पहिल्याच आठवड्यात वळवाचा पाऊस इतका पडला की, त्या पावसाच्या पाण्यात ही निरीक्षणे पार धुऊन गेली. विशेष बाब म्हणजे, १९१८ नंतर पहिल्यांदाच मुंबईत इतका विक्रमी पाऊस झाला. ६ मे रोजी मुंबईतील कुलाबा वेधशाळेत ५०३.२ मिमी, तर सांताक्रूझ वेधशाळेतही ३७८.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. परंतु, त्यानंतर पावसाचा जोर ओसरल्याचं दिसून आलं. तसं पाहता, जून महिन्यात मुंबईत सरासरी ५३७ मिमी पावसाची नोंद होते.
मुंबईत मुसळधार पावसाने दडी का मारली?
मुंबईमध्ये मान्सूनच्या काळात पडणाऱ्या मुसळधार पावसावर काही प्रमुख घटकांचा प्रभाव असतो. त्यामध्ये पश्चिमी वारे हे महत्त्वाचे असून ते मोठ्या प्रमाणात आर्द्रता घेऊन येतात, ज्यामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होते. याशिवाय मान्सून ट्रफ आणि सोमाली जेट यांसारख्या हवामान प्रणालीही या जोरदार पावसामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मान्सून ट्रफ ही एक लांबट स्वरूपाची कमी दाबाची पट्टी आहे, जी पाकिस्तानमधील उष्णतेमुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रापासून ते थेट बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली असते. ही प्रणाली मान्सूनच्या हवामानचक्रातील एक अर्ध-स्थायी वैशिष्ट्य मानली जाते.
आणखी वाचा : Agro Terrorism : करोनानंतर चीनचा भयंकर कट? बुरशीची तस्करी केल्याप्रकरणी दोघांना अटक; काय आहे प्रकरण?
पावसासाठी पोषक वातावरण का नाही?
विशेष म्हणजे जेव्हा ही ट्रफ दक्षिणेकडे सरकते, तेव्हा त्या परिणामस्वरूप अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळतात, त्यामुळे या हवामान घटकावर बारकाईने लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक ठरते. सोमाली जेट हा समुद्रसपाटीपासून सुमारे एक ते दोन किमी उंचीवरून वाहणारा वारा आहे. या वाऱ्याचा प्रवाह दक्षिण गोलार्धातून सुरू होऊन विषुववृत्त ओलांडतो आणि मे महिन्याच्या दरम्यान पूर्व आफ्रिकेपर्यंत पोहोचतो. त्यानंतर तो अरबी समुद्रात प्रवेश करतो आणि अखेर जूनच्या सुरुवातीला भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषतः महाराष्ट्र, गोवा आणि केरळ परिसरात दाखल होतो. या वाऱ्याच्या प्रवाहामुळे हवामानात आद्रता येते आणि पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे सोमाली जेटचा प्रवाह हेही मुसळधार पावसामागील एक महत्त्वाचे कारण मानले जाते.
मुंबईसह परिसरात सध्या मोसमी पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही हवामान प्रणाली सध्या सक्रिय नाही, असे भारतीय हवामान विभागाच्या एका शास्त्रज्ञाने सांगितले. पावसाला पोषक ठरण्यासाठी “पश्चिमेकडील दमदार वारे, समुद्रकिनाऱ्याजवळील ट्रफ किंवा बळकट सोमाली जेट यांसारख्या परिस्थितीचा अभाव असल्यामुळे मुंबईत पावसाचा खंड पडला आहे असंही ते म्हणाले. सध्या मुंबईत अधून मधून पडणाऱ्या पावसाचा हलक्या सरी केवळ हवामानातील आर्द्रतेमुळेच पडत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईत सध्या फक्त हलक्या सरींचा अंदाज
मुंबईत मे महिन्याच्या २४ ते २७ तारखांच्या दरम्यान जोरदार पावसाला कारणीभूत ठरलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आता संपुष्टात आला आहे, असे मुंबईस्थित हवामान ब्लॉग ‘Vagaries of Weather’ चे संचालक राजेश कपाडिया यांनी सांगितले. “मोसमी पावसाला अनुकूल ठरणारी मान्सून ट्रफसारखी कोणतीही प्रणाली अस्तित्वात नसल्यामुळे सध्या मुंबईत फक्त हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय हवामान विभागातील हवामानशास्त्रज्ञांच्या मते, दक्षिण पश्चिम मान्सूनमध्ये कोरडा आणि ओला या दोन प्रकारच्या कालखंडांचा अनुभव येतो, जे सक्रिय हवामान प्रणालींवर अवलंबून असतात. गेल्या वर्षीही जून महिन्यात ९ तारखेपासून लवकर मान्सून सुरू झाल्यानंतर काही काळ पावसामध्ये खंड पडल्याचे दिसून आले होते. सध्या मुंबईत मुसळधार पावसाने विश्रांती घेतली असून पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Operation spyder web: रशियावरील भयावह ड्रोन हल्ल्यामागचे मास्टरमाइंड जोडपे, काय आहे नेमकं हे प्रकरण?
पावसाचा खंड नेमका कशामुळे पडला?
मुंबई आणि उपनगरामध्ये पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या ७ जूनपर्यंत परिसरात मुसळधार पावसाचे प्रमाण कमी असेल, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. “सध्या अशी कोणतीही मोठी हवामान प्रणाली अस्तित्वात नाही, जी लगेच जोरदार पावसाचा अंदाज देऊ शकेल. आम्ही हवामान मॉडेलवर लक्ष ठेवून असून, पावसाच्या तीव्रतेतील वाढ कधी होईल याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुसळधार पावसाला कधी सुरुवात होईल?
राजेश कपाडिया यांच्या मते, राज्यात ७ जूननंतर मोसमी वाऱ्यांचा वेग वाढू शकतो. पावसाचा सध्याचा खंड किमान ९ जूनपर्यंत कायम राहू शकतो. मात्र, ७ किंवा ८ जूनपासून मौसमी वाऱ्यांना बळकटी मिळेल आणि मुसळधार पावसाला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) दीर्घकालीन हवामान अंदाजात असं म्हटलंय की, मुंबईसह देशाच्या बहुतांश भागांमध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.