देशाची राजधानी दिल्लीमधील प्रदूषणाची वाढती समस्या पाहता, तेथे पुन्हा एकदा ‘सम-विषम वाहन क्रमांक’ (ऑड-इव्हन) प्रयोग राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत १३ ते २० नोव्हेंबरदरम्यान दिवाळीच्या दिवसांमध्ये सम-विषम वाहन क्रमांक योजना लागू केली जाणार आहे. दिल्लीत सध्या हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) अतिवाईट आणि धोकादायक अशा दोन श्रेणींमध्ये आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे हा हवा निर्देशांक धोकादायक पातळी ओलांडून आणखी गंभीर होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) सादर केलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी दिल्लीमधील हवा गुणवत्ता निर्देशांक ४२१ वर पोहोचला होता; ज्यामध्ये पीएम २.५ या प्रदूषकाचे घटक अधिक होते. मागच्या काही दिवसांपासून दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) हा सतत ४५० च्या वर राहिलेला आहे. हा निर्देशांक ५० ते १०० च्या दरम्यान असणे चांगले मानले जाते. त्याहून अधिक निर्देशांक गेल्यास वायुप्रदूषणाचा त्रास होण्यास सुरुवात होते. अशा वेळी याआधी लागू केलेल्या सम-विषम योजनेचे परिणाम काय होते? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवा निर्देशांक मोजण्याचे टप्पे आकडेवारी आणि त्याला विशिष्ट रंग देऊन सांगितले आहेत. या निर्देशांकाच्या सहा श्रेणी आहेत. त्यामध्ये ० ते ५० चांगली, ५० ते १०० समाधानकारक, १०० ते २०० मध्यम प्रदूषित, २०० ते ३०० वाईट, ३०० ते ४०० अतिशय वाईट व ४०० ते ५०० धोकादायक पातळी असल्याचे सांगितले गेले आहे. याहून अधिक एक्यूआय वाढल्यास तो अतिधोकादायक पातळीच्या पुढे जाईल, असेही सांगितले जात आहे.

Thane, ST, bogus certificate,
ठाणे : बोगस प्रमाणपत्राच्या आधारे एसटी महामंडळात नोकरी
11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

हे वाचा >> वायू प्रदूषण : कापडी, सर्जिकल मास्क कुचकामी ठरतात, मग कोणता मास्क वापरणे योग्य ठरेल?

दिल्लीत सम-विषम वाहन क्रमांक योजना लागू केली जाण्याची ही मागच्या सात वर्षांतील चौथी वेळ आहे. प्रत्येक वर्षी हिवाळ्याची चाहूल लागल्यानंतर दिल्ली आणि आसपासच्या परिसरात प्रदूषणाची समस्या डोके वर काढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर तातडीचा उपाय म्हणून सम-विषम योजनेकडे पाहिले जातेय.

सम-विषम योजना काय आहे?

दिल्लीमध्ये जेव्हा सम-विषम (ऑड-इव्हन) योजना लागू केली जाते; तेव्हा वाहनाच्या क्रमांकानुसार ते वाहन त्या रस्त्यावर कधी धावणार हे ठरविले जाते. ज्या वाहनांच्या नंबर प्लेटवरील शेवटचा क्रमांक विषम आहे, ती वाहने विषम तारखेला (१३, १५, १७ व १९ नोव्हेंबर) रस्त्यावर धावतील आणि ज्या वाहनांचा शेवटचा क्रमांक सम आहे, ती वाहने सम तारखेला (१४, १६, १८ व २० नोव्हेंबर) रस्त्यावर उतरतील. या योजनेमुळे जवळपास निम्मी वाहने रस्त्यावर उतरण्यापासून रोखली जाऊ शकतात, असा कयास असतो. या योजनेमुळे रोजच्या हवा गुणवत्ता निर्देशंकात काही प्रमाणात घट होईल, अशी आशा दिल्ली सरकारने व्यक्त केली आहे.

२०१६ साली पहिल्यांदा ही योजना लागू केली. त्या वर्षी दोन वेळा हा प्रयोग झाला. त्यानंतर २०१९ साली पुन्हा एकदा प्रदूषणावर मात करण्यासाठी या योजनेचा अवलंब केला गेला. या योजनेतून काही वाहनांना अपवाद म्हणून वगळण्यात आले आहे. जसे की, सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सी, महिला वाहनचालक (सुरक्षेचा उपाय म्हणून), इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहने आणि दुचाकी. या वर्षी जाहीर केलेल्या योजनेसाठी अद्याप नवी नियमावली जाहीर झालेली नाही.

दिल्ली वाहतूक विभागातील सूत्रांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये सध्या ७५ लाख वाहने दररोज रस्त्यावरून धावतात. त्यापैकी खासगी चारचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. सम-विषम प्रयोग केल्यामुळे रोज जवळपास १२.५ लाख वाहने रस्त्यावरून कमी करता येतील. त्यात इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहनांचा समावेश केला गेलेला नाही. दिल्ली एनसीआर क्षेत्रात वाहन नोंदणी असलेली किंवा बाहेरील राज्यांतील जवळपास २० लाख वाहने दिल्लीत वाहतूक करतात.

दिल्ली सरकारच्या अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालयाने ३१ मार्च २०२२ रोजी ‘दिल्ली सांख्यिकी हस्तपुस्तिका, २०२२’ प्रकाशित केली होती. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये नोंदणीकृत चारचाकी वाहन व जीपची संख्या २०,५७,६५७ आहे आणि मोटारसायकल व स्कूटरची संख्या ५१,३५,८२१ एवढी आहे. उर्वरित ऑटोरिक्षा, टॅक्सी, बसेस, मालवाहू वाहने, ट्रॅक्टर इत्यादी वाहनांची संख्या ७७,३९,३६९ एवढी आहे.

दिल्लीतील प्रदूषणासाठी वाहनातून होणारे उत्सर्जन कारणीभूत?

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या संकटासाठी अनेक बाबी जबाबदार आहेत. दिल्लीच्या भौगोलिक रचनेमुळे तिथल्या वातावरणात प्रदूषके अडकून राहतात. हिवाळ्याची चाहूल लागताना जेव्हा तापमानाचा पारा घसरतो आणि मंद वारे वाहण्यास सुरुवात होते, तेव्हा हवेतील प्रदूषक घटक जमिनीवर स्थिरावण्याऐवजी हवेतच राहतात आणि त्यामुळे दिल्लीमध्ये दाट धुके पसरल्याचे कुप्रसिद्ध चित्र दिसते.

दिल्लीलगत असलेल्या पंजाब आणि हरियाणा राज्यात रब्बी पिकांच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणात पेंढ्या जाळल्या जातात. खरिपाचे पीक काढून घेतल्यानंतर शेतातल्या तण स्वरूपातील पेंढ्या जाळल्यामुळे पुढच्या रब्बीच्या पिकांसाठी शेत मोकळे होते. वाहनांतून बाहेर पडणारा धूर, रस्त्यावरील धूळ यांसारखे बारमाही प्रदूषणाचे स्रोत असताना, दिवाळीच्या आसपास शेतात आग लावल्यामुळे आणि वातावरणातील परिस्थिती बदलल्यामुळे प्रदूषणाच्या पातळीचा गुणाकार होत जातो.

पर्यावरण आणि हवामान बदल या विषयाला वाहिलेल्या सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्न्मेंट (CSE) या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, मागच्या वर्षी शेतांमध्ये लावलेल्या आगींमुळे हवेमध्ये पीएम २.५ या सूक्ष्म कणांचे प्रमाण ४० टक्क्यांवर पोहोचले होते. या वर्षी आगीमुळे ३, ४ व ५ नोव्हेंबर रोजी हवेतील पीएम २.५ या सूक्ष्म कणांचे प्रमाण अनुक्रमे ३५, २० व २१ टक्क्यांवर पोहोचले होते, अशी माहिती भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या आकडीवारीतून समोर आली.

असे असले तरी शेतामध्ये आगी या वर्षातून फक्त काहीच दिवस लावल्या जातात. पूर्ण वर्षाचा विचार केल्यास दिल्लीतील वायुप्रदूषणासाठी याचा वाटा तीन टक्क्यांच्याही खाली आहे. अनेक अभ्यासकांनी सुचविल्यानुसार, दिल्लीचे मोठ्या प्रमाणातील वायुप्रदूषण हे स्थानिक कारणांमुळे उदभवत आहे. पीएम २.५ सूक्ष्म कणांचे वार्षिक प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी शहरातील वाहने योगदान देतात.

वाहनांमधून नायट्रोजन डाय-ऑक्साइड (NO2) यासारखे प्रदूषणकारी घटकही उत्सर्जित केले जातात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंदाजानुसार मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी नायट्रोजन डाय-ऑक्साइडचे (NO2) प्रमाण ६० टक्के अधिक असल्याचे लक्षात आले आहे.

प्रदूषणाचे संकट लक्षात घेता, सम-विषम योजनेचा लाभ होईल?

चीन, मेक्सिको व फ्रान्स या देशांमध्येही वायुप्रदूषण कमी करण्यासाठी सम-विषम वाहन क्रमांक योजनेचा अवलंब केला गेला आहे. त्याचा प्रभाव कितपत पडला, हा विषय तिथेही चर्चेत राहिलेला आहे. २०१९ साली सम-विषम योजना लागू केल्यानंतर त्याचा कितपत प्रभाव पडला हे पाहण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने दिल्ली आणि लगतच्या गुरुग्राम, गाझियाबाद व नोएडा या एनसीआर क्षेत्रातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक तपासला. त्याअगोदर या ठिकाणी सम-विषम योजना लागू करण्यात आलेली नव्हती.

या तपासातून निष्पन्न झाले की, सम-विषम योजना लागू केलेल्या राजधानी परिसरात सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरलेला आढळून आला.

सम-विषम योजना लागू करण्याआधी २३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१९ या दिवसांत दिल्लीतील सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३६९.५ एवढा होता. सम-विषम योजना लागू केल्यानंतर ४ ते १५ नोव्हेंबरदरम्यान सरकारी निर्देशांक ३२८.५ इतका नोंदविला गेला. याचा अर्थ निर्देशांकामध्ये ४१ गुणांची घसरण पाहायला मिळाली. याच कालावधीत गुरुग्राममधील एक्यूआय ७.६ गुणांनी वाढला होता. तर त्याच वेळी नोएडा (१२.३) व गाझियाबाद (१३.६) एवढ्या गुणांची घसरण पाहायला मिळाली.

तथापि, ही फक्त आकडेवारी आहे; मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वायुप्रदूषणाच्या बाबतीत वैयक्तिक उपायांचा कितपत परिणाम होतो, हे निश्चित करणे कठीण आहे.