सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा(STR)मधील वाघांच्या लोकसंख्येचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्यातील वन विभाग लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून (TATR) वाघांचे स्थलांतर करणार आहे. एसटीआरमधील सह्याद्री कोकण वन्यजीव कॉरिडॉर आणि गोवा, कर्नाटकमधील जंगले पुरेशी सुरक्षित आणि मानवी उपद्रवांपासून मुक्त असल्यामुळे प्रकल्पाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असे तज्ज्ञांना वाटते. वन्यजीव कॉरिडॉर म्हणजे नेमके काय आणि व्याघ्र संवर्धनातील त्यांची भूमिका काय यावर एक नजर टाकू यात.

सरकार एसटीआरमध्ये वाघांचे स्थलांतर करण्याचा विचार का करत आहे?

उत्तर पश्चिम घाटात असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा(STR)ची स्थापना जानेवारी २०१० मध्ये झाली आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यांपर्यंत त्यांची हद्द पसरली. त्यात चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश होतो. शिकारी आणि बदलत्या अधिवासामुळे या प्रदेशात वाघांची संख्या ऐतिहासिकदृष्ट्या कमी झाली आहे. एसटीआर राखीव अभयारण्य केल्यानंतरही वाघांची संख्या वाढली नाही, कारण प्रजनन करणाऱ्या वाघांनी राखीव भागात वसाहत केली नाही. एसटीआरच्या हद्दीत वाघांच्या उपस्थितीचे फोटो कमी आहेत आणि पद मार्गांच्या पुराव्याने सात ते आठ वाघांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाली आहे.

वाघांची लोकसंख्या वाढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एसटीआरच्या दक्षिणेकडे असलेल्या जंगलांमधून गोवा आणि कर्नाटकातील वाघांना इथे आणणे आहे. त्यामुळे वन्यजीव कॉरिडॉर मजबूत होऊ शकतो. परंतु वाघांच्या संख्येत वाढ होण्यास अनेक वर्षे लागू शकतात. परिणामी, अल्पकालीन परिणामांसाठी वाघांचे स्थलांतर निवडण्यात आले आहे.

व्याघ्र पुनर्प्राप्तीसाठी स्थलांतर हा सर्वोत्तम मार्ग आहे का?

२००८ पासून भारतात व्याघ्र स्थलांतर प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सरिस्का व्याघ्र प्रकल्प २००८ आणि पन्ना व्याघ्र प्रकल्प २००९ हे यशस्वी व्याघ्र पुन:प्रवेश आणि स्थलांतर प्रकल्पांचे साक्षीदार आहेत. ओडिशातील सतकोसिया व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच देशाचा पहिला आंतर राज्य स्थलांतर प्रकल्प होता.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे माजी सदस्य सचिव आणि प्रकल्प टायगरचे अतिरिक्त महासंचालक अनुप नायक म्हणतात की, स्थानांतरण उपक्रम आतापर्यंत संमिश्र स्वरूपाचे होते. खरं तर ते अंतिम उपाय म्हणून हाती घेतले पाहिजेत. “स्थानांतरण निवडण्यापूर्वी इतर उपलब्ध पर्यायही तपासून पाहिले पाहिजेत. अधिवास सुधारणा, शिकार वाढवणे, व्याघ्र कॉरिडॉरचे बळकटीकरण आणि दक्षता सुधारणांचे मूल्यांकन केले पाहिजे,” असेही नायक म्हणाले. स्थानांतरण प्रकल्पाच्या दीर्घकालीन आणि शाश्वत यशासाठी टायगर कॉरिडॉर महत्त्वपूर्ण आहेत, असेही नायक सांगतात. “स्थानांतरणानंतरही कॉरिडॉर मजबूत झाले आहेत आणि ते मोठ्या त्रासांपासून मुक्त आहेत, याची खात्री करणे आवश्यक आहे.” सातकोसियामध्ये नायक म्हणाले की, स्थानांतरण प्रकल्प अयशस्वी होण्यामागे खराब व्यवस्थापन हे एक प्रमुख कारण आहे. २०१८ मध्ये कान्हा येथून एक नर आणि एक मादी वाघ पुन्हा दाखल होण्यापूर्वी सातकोसिया व्याघ्र प्रकल्पातील स्थानिकांनी या योजनेला हिंसक विरोध केला होता.

स्थानांतरणानंतर लगेचच सुंदरी या वाघिणीने एका स्थानिक महिलेला ठार मारले आणि नंतर एक माणूस वाघाच्या हल्ल्याला बळी पडला. त्यामुळे वनविभागाच्या विरोधात हिंसक निदर्शने झाली. नंतर महावीर हा नर वाघ सापळ्यात अडकल्याने मृत्युमुखी पडला, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. वाघ त्यांच्या नवीन अधिवासात फिरतात आणि नैसर्गिकरीत्या त्यांनी आजूबाजूला भक्ष्य शोधणे अपेक्षित आहे, असंही नायक पुढे म्हणाले.

वन्यजीव कॉरिडॉर संरक्षणामध्ये कोणती भूमिका बजावतात?

कॉरिडॉर हे मूलत: निवासस्थान आणि मार्ग यामधील दुवा असतात, जे वन्यजीव लोकसंख्येला जोडतात आणि वाढवतात, जे मानवी वसाहती आणि पायाभूत सुविधांच्या कामांमुळे विखुरलेले आहेत. वाघांच्या लोकसंख्येच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी ते महत्त्वपूर्ण आहे, कारण ते वन्यजीवांना संरक्षण करण्यास मदत करतात. वाघ आपल्या क्षेत्रात इतर कोणाला येऊ देत नाहीत. तसेच अनेकदा ते जोडीदार आणि अन्नाच्या शोधात लांबचा प्रवास करतात. असे करीत असताना ते वन्यजीव कॉरिडॉरचा वापर करतात आणि अनेक मानवी भागातून प्रवास करतात. कॉरिडॉरने संवर्धनामध्ये बजावलेली भूमिका महत्त्वाची असून, ती धोरणात्मक निर्णयांमध्येदेखील समाविष्ट केली गेली आहे.

हेही वाचाः विश्लेषण : रोहित वेमुला दलित नव्हता? तेलंगणा पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधील दाव्याने खळबळ का उडाली?

काही प्रकल्पांमध्ये वाघ आणि इतर वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी अंडरपास आणि वन्यजीव क्रॉसिंग यांसारखे उपाय राबवले जातात. कान्हा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांदरम्यान वाघांच्या स्थलांतरित मार्गाचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ७ वर ओव्हरपास बांधणे हे कॉरिडॉरच्या संरक्षणासाठी शमन उपायांचा अंतर्भाव करण्याचे एक उदाहरण आहे. वाघ नियमितपणे जंगल ओलांडण्यासाठी महामार्गाच्या खाली असलेल्या कॉरिडॉरच्या जागेचा वापर करतो. २०१४-१५ मध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थे(WII)ने देशातील ३२ प्रमुख व्याघ्र कॉरिडॉरवर नजर ठेवली आहे, शिवालिक टेकड्या आणि गंगेचे मैदान, मध्य भारत आणि पूर्व घाट, पश्चिम घाट आणि उत्तर पूर्व टेकड्या याचासुद्धा समावेश आहे.

सह्याद्री-कोकण कॉरिडॉरचे महत्त्व काय?

सह्याद्री-कोकण कॉरिडॉर किंवा सह्याद्री-राधानगरी-गोवा-कर्नाटक कॉरिडॉर उत्तर पश्चिम घाटातील वाघांच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण आहे. हा कॉरिडॉर कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्राला गोव्याच्या मध्यभागी असलेल्या जंगलांना जोडतो, ज्यामुळे राधानगरी वन्यजीव अभयारण्य, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संवर्धन राखीव जागा आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या प्रदेशात वाघ जोडले जातात.

हेही वाचाः विश्लेषण : मणिपूर हिंसाचाराची वर्षपूर्ती… शाश्वत शांतता नांदणार कधी? 

मानवी वर्चस्व असलेल्या वसाहती आणि विकासाच्या हालचालींमुळे या कॉरिडॉरचे अनेक ठिकाणी तुकडे होतात, ज्यामुळे वाघांच्या हालचालींना धोका निर्माण होतो आणि मानव-प्राणी संघर्षाची शक्यता वाढते. वाघांचे सह्याद्रीत स्थलांतर करण्याचे नियोजन अधिकारी करत असताना हा कॉरिडॉर मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कर्नाटकातील चोर्ला घाटातील म्हादेई संशोधन केंद्राचे संचालक निर्मल कुलकर्णी यांनी सांगितले की, काली व्याघ्र प्रकल्पातील वाघ नियमितपणे गोव्याकडे जातात आणि जेथे शिकार कमी आहे. गोव्याच्या संरक्षित भागात आता सात ते आठ वाघ आहेत. मात्र, राज्याच्या वनविभागाने व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याच्या मागणीला विरोध केला आहे. “ खरं तर हे कॉरिडॉर केवळ वन्यजीवांसाठीच नाही तर गोवा आणि कर्नाटकमधील या जंगलांच्या आसपास राहणाऱ्या समुदायांच्या जलसुरक्षेसाठी देखील महत्त्वाचे आहेत. हे महत्त्वाचे पाणलोट क्षेत्र आहे. येथे वाघांचीही पूजा केली जाते. या समस्येचे व्यवस्थापन करण्यासाठी आम्हाला महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक यांच्यात अधिक चांगल्या समन्वयाची गरज आहे,” असेही निर्मल कुलकर्णी म्हणाले.