अहमदाबाद ते लंडनदरम्यान झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात जवळपास २७४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुणाचीही ओळख पटणं हे मोठं आव्हान प्रशासनासमोर सध्या आहे, त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए सॅम्पल्स घेऊन शक्य तेवढ्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आव्हान आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह ओळख पटण्यापलीकडे जळालेले असल्याने अधिकाऱ्यांनी ओळख पटवण्यासाठी २०० हून अधिक नमुने गोळा केले आहेत. डीएनए चाचण्या गुजरातमधील गांधीनगर इथल्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्सेस विद्यापीठात केल्या जातील. ओळख पटल्यानंतर मृतदेहांचे अवशेष त्यांच्या कुटुंबीयांकडे दिले जातील. या आव्हानात्मक प्रक्रियेबाबत काही फॉरेन्सिक तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
डीएनए नमुन्यांची तपासणी कशी केली जाते?
फरीदाबाद इथल्या अमृता हॉस्पिटलमधील आण्विक जीवशास्त्रज्ञ आणि क्लिनिकल शास्त्रज्ञ डॉ. मौसमी सूर्यवंशी यांनी सांगितले की, “सुरुवातीचे २४ ते ७२ तास हे ट्रायज अर्थात अपघातग्रस्तांना उपचार आणि संभाव्य जीवनरक्षक हस्तक्षेपांसाठी महत्त्वाचे असतात. असं असताना जेव्हा मृत्यू मोठ्या प्रमाणात होतात, तेव्हा फोरेन्सिक पुनर्प्राप्ती, ओळख आणि अवशेषांचे योग्य व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित केले जाते.
“पूर्णपणे जळलेले मृतदेह असंख्य आव्हाने निर्माण करतात. विमान इंधनाच्या आगीमुळे होणारे उच्च तापमान अनेकदा चेहऱ्याचे वैशिष्ट्य, बोटांचे ठसे आणि अगदी दातातील नोंदीदेखील नष्ट करतात, त्यामुळे पारंपरिक ओळख पद्धती यावेळी प्रभावी ठरत नाहीत. अशा प्रकरणांमध्ये, डीएनए प्रोफाइलिंग हा ओळख पटवण्यासाठीचा एकमेव विश्वसनीय पर्याय ठरतो.”
दरम्यान, उष्णतेने खराब झालेल्या ऊती किंवा हाडांमधून डीएनए गोळा करण्यासाठी प्रगत फॉरेन्सिक क्षमता आणि वेळ आवश्यक असतो. “ही एक लॉजिस्टिक आणि भावनिकदृष्ट्या क्लिष्ट अशी प्रक्रिया आहे,” असे सूर्यवंशी यांनी सांगितले.
फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, सध्याची परिस्थिती पाहता पथके डीएनए प्रोफाइलिंगवर अवलंबून आहेत. जेव्हा बघून ओळख किंवा बोटांचे ठसे घेणे अशक्य असते तेव्हा ही सर्वात विश्वासार्ह पद्धत मानली जाते. ओळख प्रक्रिया अपघातस्थळापासून सुरू होते. जिथे फॉरेन्सिक पथके मानवी अवशेष काळजीपूर्वक मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. हाडाचा प्रत्येक तुकडा, ऊतींचा नमुना किंवा वैयक्तिक वस्तू प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी गोळा केली जाते आणि जतन केली जाते. २५० हून अधिक मृतदेह हाताळण्यासाठी अनेक एजन्सींमध्ये समन्वयदेखील महत्त्वाचा ठरतो. आपत्ती प्रतिसाद पथके, फॉरेन्सिक प्रयोगशाळा, स्थानिक रुग्णालये, कायदा अंमलबजावणी आणि विमान कंपनी. सूर्यवंशी यांनी असेही स्पष्ट केले की, मृतदेहांना शवागार किंवा रुग्णालयात नेण्यापूर्वी प्रथम क्रमांक दिले जातात, त्यांचे छायाचित्र काढले जाते आणि मॅपिंग केले जाते.
डीएनए प्रक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे:
- डीएनए नमुने गोळा करणे
- कुटुंबियांचे डीएनए नमुने गोळा करणे
- डीएनए मॅचिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळजवळ ७२ तास
- गंभीररित्या जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाचे अनेकदा डीएनए घेणे कठीण
- डीएनए प्रोफाइलिंग हा ओळख पटवण्यासाठीचा एकमेव विश्वसनीय पर्याय
रुग्णालयात फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट, मानववंशशास्त्रज्ञ आणि डीएनए तज्ज्ञांसह एक मल्टी-डिसिप्लिनरी टीम (ज्यांना अनेक शाखांमधील ज्ञान आहे) शवविच्छेदन करते. तसंच ते डीएनए नमुने गोळा करतात आणि ऑर्थोपेडिक इम्प्लांट किंवा दंत संरचना हे उर्वरित ओळखकर्त्यांचे विश्लेषण करते. त्याच वेळी नातेवाईकांच्या मुलाखतीही घेतल्या जातात, जेणेकरून शवविच्छेदनपूर्व माहिती संकलित केली जाईल. यामध्ये कपडे, व्रण, वैद्यकीय इतिहास किंवा डीएनए नमुने अशा वस्तू ज्या क्रॉस-रेफरन्सिंगसाठी आवश्यक आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रतिष्ठित प्राध्यापक शेखर मांडे यांनी फॉरेन्सिक प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “तज्ज्ञांची टीम प्रथम मृतांचे अवशेष जसे की कपडे, जळालेले शरीर, हाडे आणि इतर जैविक साहित्य गोळा करते आणि नंतर त्यांच्यापासून डीएनए वेगळे करते.”
“विमान अपघातात या प्रक्रियेला थोडा जास्त वेळ लागू शकतो, कारण मृतदेह अनेकदा गंभीररित्या जळालेले असतात. एकदा डीएनए काढल्यानंतर डीएनए फिंगरप्रिंटिंग केले जाते. ही एक अशी पद्धत आहे, जी मृत व्यक्तीच्या डीएनएची कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या संदर्भ नमुन्यांशी तुलना करून एखाद्या व्यक्तीची विशिष्ट ओळख पटवते,” असे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) माजी महासंचालक आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाचे (DSIR) माजी सचिव मांडे म्हणाले. “ही एक आव्हानात्मक, गुंतागुंतीची, वेळखाऊ आणि संवेदनशील प्रक्रिया आहे”, असेही ते म्हणाले.
ज्या प्रकरणांमध्ये उच्च तापमानामुळे न्यूक्लियर डीएनए खराब होतो अशावेळी शास्त्रज्ञ बहुतेकदा मायटोकॉन्ड्रियल डीएनएकडे वळतात, जो अधिक उष्णता-प्रतिरोधक आणि मातृत्वाच्या वारशाने मिळतो. डीएनए प्रोफाइल तयार झाल्यानंतर त्याची जुळवणी सुरू होते.
पुण्याच्या राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. आकांक्षा चतुर्वेदी यांनी सांगितले की, “मानवी डीएनए प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र असतो. प्रत्येक पालकाकडून अंदाजे ५० टक्के वारशाने मिळतो.”
“फिंगरप्रिंटिंगनंतर मॅचिंग करण्यासाठी तपशीलवार विश्लेषण केले जाते, ज्याच्या आधारे मृताच्या नातेवाईकांना ओळखता येते आणि माहिती दिली जाऊ शकते.” शिवाय नमुने कुटुंबातील सदस्यांकडूनही गोळा केले जातात. साधारणपणे रक्त किंवा गालाचे स्वॅब किंवा पीडितेच्या वैयक्तिक वस्तूंमधून म्हणजे टूथब्रश किंवा कंगवा यामधून घेतले जातात. अचूक मॅचिंग होण्यासाठी फॉरेन्सिक सॉफ्टवेअर आणि सांख्यिकीय साधनांचा वापर करून या नमुन्यांची तुलना केली जाते. मात्र, ही प्रक्रिया जलद किंवा सोपी नाही.

किमान ७२ तास
शवविच्छेदनस्थळी असलेल्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले की, डीएनए मॅचिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळजवळ ७२ तास लागतील. “ही एक वेळखाऊ आणि बारकाईने करण्याची प्रक्रिया आहे आणि साधारण ७२ तासांचा वेळ यासाठी खूपच कमी आहे”, असे चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले.
“जळलेल्या किंवा खराब झालेल्या अवशेषांच्या बाबतीत आव्हान लक्षणीयरीत्या वाढते. अशावेळी डीएनएचे तुकडे होऊ शकतात. असं असताना जोपर्यंत मृतदेह पूर्णपणे नष्ट होत नाहीत, तोपर्यंत सकारात्मक ओळख पटविण्यासाठी पुरेसे अनुवांशिक साहित्य मिळवणे शक्य असते”, असेही त्या म्हणाल्या.
प्रत्यक्षात अवशेषांची स्थिती, फॉरेन्सिक पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि नोंदवलेल्या बेपत्ता व्यक्तींच्या संख्या हे पाहता सर्व प्रक्रियेला अनेक आठवडे ते अनेक महिने लागू शकतात अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली आहे. “मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना शांत करण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत असताना दुसरीकडे फॉरेन्सिक शास्त्रज्ञांचे कामही सुरूच आहे. “प्रत्येक टप्प्यावर कणव आणि अचूकता हातात हात घालून चालते, कारण हे फक्त मृतदेह नाहीत तर ते कुणाचे तरी खूप जवळचे, प्रिय लोक आहेत”, असे सूर्यवंशी यांनी म्हटले. बंगळुरूमधील स्पर्श रुग्णालयातील सल्लागार, पॅथॉलॉजिस्ट डॉ. दीपा महेश यांनी म्हटले की, “७२ तासांचा कालावधी हा प्रक्रियेचा एक अगदी सुरुवातीचा टप्पा आहे, पूर्ण ओळख नाही. अवशेषांचे प्रमाण आणि गुणवत्ता महत्त्वाची आहे. योग्य डीएनए ओळखण्यासाठी जास्त कालावधी लागेल.