देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या दोन्ही शहरांमध्ये गेल्या आठवड्यात अवघ्या २४ तासांच्या आत नोंदवले गेलेले तापमान चर्चेचा विषय ठरले. या शहरांमध्ये सरासरी कमाल तापमानाची एक मर्यादा आहे, पण त्याहीपेक्षा अधिक म्हणजे ५० अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाल्यानंतर स्वयंचलित हवामान केंद्र प्रकाशात आले. या सेन्सरमधील त्रुटी चुकीच्या तापमानासाठी कारणीभूत ठरल्याचे स्पष्टीकरण हवामान खात्याकडून देण्यात आले. त्यामुळे या केंद्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

कोणत्या ठिकाणी तापमानाची अधिक नोंद?

नवतपाच्या आधीपासूनच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटा होत्या आणि नवतपाच्या काळात या लाटा आणखी तीव्र झाल्या. दरम्यान, २९ मे रोजी भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत ५२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यावेळी शतकातील हे सर्वाधिक तापमान असल्याचे सांगण्यात आले. नंतर त्याच दिवशी मुंगेशपूर येथील स्वयंचलित हवामान केंद्राने काही त्रुटींमुळे अधिकचे तापमान नोंदवण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर २४ तासांतच ३० मे रोजी नागपुरात ५६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. शहरातील रामदास पेठेतील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या २४ हेक्टर जागेवरील स्वयंचलित हवामान केंद्राने ही नोंद केली. मात्र, याठिकाणीसुद्धा त्रुटींमुळे तापमान अधिकचे नोंदवण्यात आल्याचे हवामान खात्यानेच सांगितले.

हेही वाचा >>>विश्लेषण: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ इतके थंड का असतात?

स्वयंचलित हवामान केंद्राची गरज का?

ब्रिटिशांनी आपल्याकडे हवामान निरीक्षणाच्या नोंदी करण्यास सुरुवात केली आणि निरीक्षणाची पद्धत विकसित केली. त्यानुसारच आजही निरीक्षणे घेतली जातात. यात तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, पावसाचा अंदाज, वादळ अशी सर्व निरीक्षणे घेऊन अंदाज नोंदवले जातात. मात्र, भारतीय हवामान केंद्रांचे जाळे पुरेसे नाही. हवामानात अनेक बदल होत असतात. कुठे पाऊस पडतो, कुठे कमी पडतो, कुठे जास्त पडतो. एकाच शहरात ही वेगवेगळी परिस्थिती देखील असू शकते. अशा वेळी मानवी हस्तक्षेप करून निरीक्षण घेणे शक्य नसते. म्हणूनच स्वयंचलित हवामान केंद्रे उभारावी लागतात. ज्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी कमी होऊन हवामान खात्यावरचा ताण कमी होतो.

स्वयंचलित हवामान केंद्रासमोर आव्हाने काय?

स्वयंचलित हवामान केंद्राची कामगिरी ही त्यात लागलेल्या इलेक्ट्रॉनिक्स सेन्सरवर अवलंबून असते. त्यामुळे त्यात थोडाही बिघाड झाला, तर पुढचे सर्व गणित चुकते. विशेषतः उष्णतेची लाट असेल तर अशा परिस्थितीत सेन्सरमध्ये बिघाड होण्याची शक्यता अधिक असते. दिल्ली, नागपूर, मुंगेशपुर, भीरा, रायगड ही अशी काही शहरे आहेत, ज्या ठिकाणी त्या परिसरातील स्थानकापेक्षा अतिशय विचित्र पद्धतीने तापमानाची निरीक्षणे नोंदवण्यात आली. स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करताना ठिकाण महत्त्वाचे असते. अनेकदा ते सरकारी कार्यालयावर, भर चौकात, मोठ्या शेतामध्ये किंवा प्रभावग्रस्त जागेवर लावले जातात. ज्यामुळे या केंद्रातून येणारी तापमानाची निरीक्षणे आणि हवामान केंद्राने घेतलेल्या तापमानाच्या निरीक्षणामध्ये मोठी तफावत आढळते. बरेचदा संदेश देण्याच्या प्रक्रियेत होणारा बिघाड, उपकरणे चोरीला जाणे, वीजपुरवठा नसणे यामुळेही हवामानची निरीक्षणे नोंदवणे कठीण होते.

हेही वाचा >>>‘ईश्वरसाक्ष’ की ‘गांभीर्यपूर्वक’? जेव्हा शपथेमधील शब्दांवरुन संविधान सभेत झालं होतं रणकंदन!

स्वयंचलित हवामान केंद्र कसे काम करते?

इलेक्ट्रॉनिक सेन्सरच्या माध्यमातून स्वयंचलित हवामान केंद्राचा पूर्ण कारभार चालतो. ज्या ठिकाणी हे केंद्र स्थापित करण्यात आले आहे, त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील हवामानाचे निरीक्षण ते नोंदवते. त्यानंतर ही माहिती पुण्यातील स्वयंचलित हवामान केंद्राला पुरवली जाते. ती केंद्राच्या संकेतस्थळावर अद्ययावत होते. जमिनीच्या पृष्ठभागावरील वातावरणाची ते नोंद घेते. तापमानासह आर्द्रता, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा ही सर्व निरीक्षणे नोंदवून प्रत्येक तासाला ही माहिती हवामान केंद्राच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्याचे ते काम करतात. थोडक्यात वास्तविक वेळेतला तपशील हे केंद्र देते.

भारतात स्वयंचलित हवामान केंद्र कधी?

१९७४-७५ या वर्षात आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहाद्वारे पहिल्यांदा हवामानविषयक माहिती पोहोचवण्यात आली. त्यानंतर १९७९-८० या वर्षात इस्रोसोबत मिळून भास्कर उपग्रहाद्वारे तपशील गोळा करण्यात आला. उपग्रहाने प्रसारित केलेली माहिती श्रीहरीकोटा रॉकेट रेंज येथील ‘अर्थस्टेशन’वर पोहचत होती. त्यानंतर भारतीय हवामान केंद्राने भारतात सुमारे १०० तपशील गोळा करणारे केंद्र स्थापन केले. त्याची गुणवत्ता ढासळल्याने १९९७ साली मायक्रोप्रोसेसरवर आधारित १५ अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्रांचे जाळे उभारण्यात आले. या केंद्रातील निरीक्षणे नोंदवण्यासाठी भारतीय हवामान खात्याने काही अल्गोरिदम तयार केले. १९९८ ते २००५ या कालावधीत चाचणी आणि मूल्यमापनानंतर समाधानकारक परिणाम दिसून आले. त्यानंतर तांत्रिकदृष्ट्या हे केंद्र विकसित करण्यात आले. त्यातून बाहेर येणारा तपशील नोंदवण्यासाठी पुण्यात एक केंद्र तयार करण्यात आले. २००६-२००७ मध्ये संपूर्ण भारतात १२५ स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन करण्यात आली. २००८-२०१२ मध्ये ५५० आणि आता सध्याच्या स्थितीत भारतात ७९५ स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rakhi.chavhan@expressindia.com