मुंबईत रविवारी पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. मात्र यावेळी मुंबईतील आवाजाची पातळी कमी नोंदवली गेली. गिरगाव चौपाटी आणि वांद्रे परिसर वगळता उर्वरित मुंबईत विसर्जन शांततेत पार पडले.दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर कच्छी बाजा, बेन्जो, ढोल-ताशा आदींचा गजर होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र प्रत्यक्षात पाच दिवसांच्या गणेश विसर्जनादरम्यान मुंबईत कुठेही ध्वनी प्रदूषण वाढल्याचे आढळले नाही.

‘आवाज फाउंडेशन’च्या अहवालानुसार मुंबईत सर्वाधिक ११५.६ डेसिबलपर्यंत आवाजाच्या पातळीची नोंद झाली आहे. गिरगाव चौपाटीजवळील बाबुलनाथ चौकाजवळ आवाजाच्या पातळीची ही स्थिती होती. वांद्रे येथील लकी जंक्शन परिसरात ११२.२ डेसिबल इतक्या आवाजाच्या पातळीची नोंद झाली.या परिसरात ढोल-ताशांमुळे काहीसा आवाज वाढला होता.

हेही वाचा : गृहमंत्री अमित शाहांनी सहकुटुंब घेतलं ‘लालबागचा राजा’चं दर्शन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही हजर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र मागील काही वर्षांच्या तुलनेत आवाज कमीच असल्याचे ‘आवाज फाउंडेशन’च्या सुमेरा अब्दुलाली यांनी सांगितले. वांद्रे, गिरगाव चौपाटीपाठोपाठ लिंकिंग रोड येथे १०९.४ डेसिबल आवाजाच्या पातळीची नोंद झाली. गणेश विसर्जनानिमित्त गिरगाव चौपाटी आणि शिवाजी पार्क येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते.मात्र या ठिकाणी आवाज कमी असल्याचे निदर्शनास आले. शिवाजी पार्क येथील आवाजाची पातळी ८२.५ डेसिबल अशी होती तर गिरगाव चौपाटीवर ८२.० डेसिबल इतका आवाज होता. सर्वात कमी ७३.१ डेसिबल इतकी आवाजाची पातळी जुहू चौपाटी येथे नोंदविण्यात आली आहे.