पावसाचे वेध केव्हाच लागलेत. उन्हाच्या होरपळीनंतर येणारा पाऊस सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. या पावसाळ्याचा आनंद मनमुराद लुटण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. काहींना आनंद लुटताही येतो. पण काहींना मात्र कधी कधी काही समस्यांचा किंवा आपत्तींचा सामना करावा लागतो. अशा समस्या किंवा आपत्तींच्या वेळी मदतीचा हात पुढे करणाऱ्या या काही हेल्पलाइन्स.
कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीच्या प्रसंगी मदत करणाऱ्या हेलपलाइनचा संपर्क क्रमांक आहे – ११२. हा क्रमांक आपण आधीच माहीत करून घेतला आहे. तर पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीतही याच क्रमांकावर संपर्क साधू शकता. अतिवृष्टीमुळे पूर, इमारत कोसळणे, झाडे पडून दुर्घटना, पुराच्या पाण्यात माणसे, प्राणी अडकणे, अशा किंवा अन्य स्वरूपाच्या आपत्तींच्या वेळी या क्रमांकावर संपर्क साधल्यास तातडीने मदत मिळते. कोणत्याही प्रकारच्या दूरध्वनीसंचावरून आणि विशेष म्हणजे मोबाइलमध्ये पैसे नसतानासुद्धा हा दूरध्वनी क्रमांक लागतो.
मुंबईलगतच्या ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात आणीबाणीच्या प्रसंगी पोलिसांशी संपर्क साधायचा झाल्यास हेल्पलाइनसाठीचे व्हॉटस् अ‍ॅप क्रमांक आहेत – ठाणे जिल्हा शहर विभाग – ९७६९७२४१२७, ठाणे जिल्हा ग्रामीण विभाग – ७०४३१००१११, ७०४५१००२२२, पालघर जिल्हा पोलीस – ९७३०८११११९, ९७३०७११११९.
बृहन्मुंबई महापालिकेची २४ तास विनामूल्य सुरू असणारी हेल्पलाइन आहे – १०८. पावसाळ्यातील आणीबाणीच्या परिस्थितीत या क्रमांकावर संपर्क साधावा.
पावसाचा अंदाज येण्यासाठी चौकशी करायची असल्यास वेधशाळेच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २२१५०४३१.
चाकरमान्या मुंबईकरांसाठी पावसाळ्यात चिंतेचा ठरणारा विषय म्हणजे लोकल. लोकल्स व्यवस्थित सुरू आहेत का हे जाणून घेणे मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचे असते. त्यांच्यासाठी या हेल्पलाइन्स अणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक. मध्य रेल्वे – १८००२१४५०२. पश्चिम रेल्वे – १८००२१२४५०१. या क्रमांकांवर आपण मिस्ड कॉल द्यायचा, क्षणार्धात आपल्याला रेल्वेकडून मेसेज येतो. त्यात त्या क्षणी असलेल्या लोकलच्या स्थितीची माहिती असते.

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com