कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या एका उपक्रमास महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून ‘उदयोन्मुख’ केंद्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्या अंतर्गत सुमारे ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही माहिती केंद्राचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख यांनी दिली आहे.

ते म्हणाले, विद्यापीठांची प्राथमिक, उदयोन्मुख, नेतृत्वकर्ता अशी विभागणी केली असून उदयोन्मुख प्रकारात शिवाजी विद्यापीठाच्या केंद्राचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ३५ तर दोन टप्प्यांत मिळून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवोपपक्रमांची सुरुवात, विविध कार्यक्रम, कार्यशाळा, नवीन सहकार्य संधींचे विकसन, रोजगार निर्मितीस प्रोत्साहन आणि नवोपक्रमांना बाह्य संस्थांकडून निधी प्राप्तीस प्रोत्साहन इत्यादी उपक्रम केंद्राकडून राबवण्यात येणार आहेत.

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, ग्रामीण भागातील नवकल्पना निर्माण करणाऱ्या, युवकांना, नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे. त्यांना ‘प्रयोगशाळा ते बाजारपेठ’ असे मूर्त स्वरूप देणे शक्य होणार आहे.