कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीच्या प्रस्तावासाठी प्रक्रिया सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीवेळी केली.कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्यासंदर्भात पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेना समन्वयक सत्यजित कदम यांनी मुंबईत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सचिवांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. हद्दवाढी संदर्भातील ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली. त्यांनी सांगितले की,
हद्दवाढ होण्याबाबत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी शहराशी एकरूप झालेली गावे हद्दीमध्ये घेण्याबाबत पत्रे पाठवायची आहेत. त्यानुसार महानगरपालिकेच्या आयुक्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करून संबंधित ग्रामपंचायतींना ही नोटीस काढतील. संबंधित गावांची भूमिका आल्यानंतर हा प्रस्ताव शासनाला सादर होईल.
ग्रामीण भागाचा विरोध कायम
दरम्यान, मुंबईतील बैठकीस माझ्यासह आमदार महाडिक, आमदार अशोक माने उपस्थित नव्हते. या चर्चेतून हद्दवाढीबाबत निर्णय झाला असे म्हणता येणार नाही. हद्दवाढीमध्ये समाविष्ट होणाऱ्या गावातील विधानसभा लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. हद्दवाढीला ग्रामीण भागातील जनतेचा विरोध आहे. त्यांची भूमिका म्हणजे आमची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून असणार आहे. त्यानुसार कोल्हापूरच्या हद्दवाढीला आमचा विरोध आहे, असे आमदार चंद्रदीप नरके यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.