कोल्हापूर : गेल्या ५० वर्षापेक्षा अधिक काळ चित्रपट, नाट्य, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचा राजर्षी शाहू पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही घोषणा केली. यावेळी विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उप पोलीस अधीक्षक सुवर्णा पत्की उपस्थित होते.राजर्षी शाहू महाराजांच्या १५१ व्या जयंती दिनी समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान करणाऱ्या व्यक्तीस १९८४ पासून हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. जब्बार पटेल यांनी ‘थिएटर ॲकॅडमी’ नावाची प्रायोगिक नाटकांसाठीची नाट्यसंस्था स्थापन करून मराठी रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाची कामगिरी बजावली. ‘अशी पाखरे येती’ या नाटकाचे दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केल्यावर त्यांनी पुढे दोनच वर्षांनी सन १९७२ मध्ये ‘घाशीराम कोतवाल’ हे राजकीय परिप्रेक्षातील क्रांतीकारी नाटक सादर केल्यावर त्यास जागतिक स्तरावर प्रचंड प्रसिद्धी, मान्यता मिळाली. त्यांचा ‘सामना’ हा पहिलाच मराठी चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला होता. पु. ल. देशपांडे यांचे ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक तसेच ‘जैत रे जैत’, ‘सिंहासन’, ‘उंबरठा’, ‘एक होता विदुषक’, ‘मुक्ता’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण’ ही त्यांची चित्रपट निर्मिती रसिकांच्या पसंतीस उतरली. पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, स.मा. जोशी, पं. कुमार गंधर्व इत्यादी माहितीपटांची दखल घेतली गेली. अनेक सांस्कृतिक संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाची जबाबदारी निभावली आहे.